श्री दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज

Content


 

प. पु. परमहंस श्री दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज

सत्पुरुष: प. पु.परमहंस श्री दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज
गुरू: प पु शंकर स्वामी, नृसिंहवाडी वाडी येथे सन्यास दीक्षा  १९६४ - ६५
समाधी: १५ सप्टेंबर २०१०

 

गेल्या यांच सहा हजार वर्षांत अनेक संस्कृति प्रत्यक्षात आल्या पण त्यांच्या पैकी "भारतीय संस्कृति" एक अतिप्राचीन, महान संस्कृति असून, अनेक चढउतार तिच्या आयुष्यात आले तरी अजून पर्यंत तिचा प्रभाव भारतीयांच्या हृदयात टिकलेला आहे त्याचे खरे कारण म्हणजे तिच्या अंतरंगात "अध्यात्म विद्येला" सर्वश्रेष्ठ स्थान आहे. वास्तविक पाहता मानवी जीवनाला योग्य वळण देऊन माणसाला खऱ्या अथनि माणूस बनवण्याचे काम संस्कृतिच करित असते.

सध्याच्या काळात “विज्ञान संस्कृति” ने आपला संसार थाटून समाजाचे व्यवहारिक जीवन जरी बदलून टाकले आहे तरी एक प्रकारची अशांती, अपूर्णता, अतृप्ती सतत् माणसाला घेरून टाकते आहे. बरेचसे सनातन प्रश्न- मी कोण, माझा खरा संबंधी(आप्त) कोण, मानवी जीवनाचे अंतीम ध्येय कोणते, हे विज्ञानाच्या शिखरावर आरूढ झालेल्या आजच्या मानवाला सुटलेले नाहीत. ह्या कारणाने देहाच्या सुखसोयी असून सुद्धा माणसाच्या मनाला खरे समाधान लाभलेले नाही. जेथे समाधान नाही, तेथे शांती कशी असणार, ती असूच शकत नाहीं.

देहाच्या गरजा भागल्यानंतर फक्त अध्यात्म चिंतनानेच मनुष्याला जीवनाचा खरा अर्थ समजू शकतो. अर्थ समजला की त्याचे प्रश्न सुटतात आणि मग ब्रह्मविद्येच्या उपासनेने त्याला पूर्ण शांतीचा प्रत्यक्ष अनुभव येतो, हा आत्मतत्वाचा बोध किंवा आत्म साक्षात्कार सत्याचा शोध घेणाऱ्या भारतीय ऋषी मुनींना उपनिषदकाली झाला. ब्रह्मविद्येची ही परंपरा भारतामधे आजपर्यंत सतत् चालली आहे. ही "ब्रह्मविद्या" ज्याच्या ठिकाणी साकार त्याला "सदगुरु" किंवा "संत" म्हणतात म्हणून संत हेच भारताचे आदर्श पुरुष होय. ही विद्या गुरु-शिष्य पराम्परेनेच आजपर्यंत अव्याहत चालू आहे व पुढे ही चालू राहील व "सदगुरु वाचोनी सापडेना सोय ! धरावे ते पाय आधी!!" हृयाची पूर्ण प्रचिती येईल.

बाह्यांगाने पाहिले तर संत व सामान्य माणसाच्या जीवनात विशेष फरक दिसेलच असे नाही पण दोघांच्या अंतरंगात मात्र जमीन आसमानाचा फरक असतो. सामान्य माणसाचे मन कर्म करताना फळाच्या आशेत गुंतून पडते तर संतांचे मन "सच्चिदानंद ब्रह्म" ची साक्षात अनुभूति असल्यामुळे कर्तव्या पुरतेच कर्मांत राहून कर्माचे फळ भगवंताला अर्पण करुन (हरि अर्पणम्), स्वतः वेगळे राहतात अर्थात सामान्य माणसाला देहबुद्धीमुळे अशांति, असमाधान राहते तर संतांचे जीवन आत्मबुद्धीमुळे शांति, समाधान व परमानंदाने भरून जाते.

पुण्य भूमि व परम पवित्र अश्या भारतवर्षांत भगवंताचे अनेक अवतार होऊन गेले पण भगवान दत्तात्रेय मात्र भक्तांच्या रक्षणासाठी सदैव ह्या भूतलावर वास्तव्य करत असतात. भगवान दत्तात्रेय हे सृष्टिचे सृजन, पालन व संहार करतात. भगवान दत्तात्रेय कृत युगात अत्रि आणि अनुसूया ह्यांच्या तपश्चर्या व भक्तिने प्रसन्न होऊन त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या रूपात अवतरले. हे सर्वांचे आदी व परम-गुरु आहेत. जन्म मरणास कारण असलेले "अज्ञान" त्याचा नाश करून भक्तांना कैवल्यपद देण्यासाठीच हा अवतार झाला. त्यांचे अनन्य भक्तिने स्मरण करताच ते प्रत्यक्ष येऊन भक्तांना सर्व संकटातून मुक्त करून त्यांचे अभीष्ट पूर्ण करतात व शाश्वत सुख पण प्रदान करतात.
भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी आंध्रप्रदेशात पीठापुर क्षेत्री "श्रीपाद श्रीवल्लभ" ह्या नावाने प्रगट झाले. दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय. त्यानंतर कांरजा क्षेत्रात "श्री नृसिंह सरस्वती" ह्या नावाने दूसरा अवतार घेऊन अदभुत चरित्र दाखविले ज्याचे वर्णन सरस्वती गंगाधर रचित "श्रीगुरुचरित्र" ह्या ग्रंथात ओवीबद्ध आहे. हा ग्रंथ म्हणजे पांचवा वेदच. ह्या प्रासादिक ग्रंथाच्या पारायणाने अनेक दत्त भक्तांना संसाररूपी भवसागरातून मुक्ति मिळाल्याची साक्ष आहे. श्रीदत्तगुरुंचा तिसरा अवतार "श्री माणिक प्रभु". हे फार ऐश्वर्यसम्पन्न राजयोगी होते. श्री दत्तगुरुंचा चौथा अवतार, अक्कलकोटचे "श्री स्वामी समर्थ महाराज". ह्यांची अवधूत वृत्ति असे व हे तरुतलवास करत असल्या मुळे "वटवृक्षस्वामी" म्हणून ह्यांची ख्याति होती.

ह्यानंतर परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज म्हणजे स्वयं दर अवतारच. त्याचे संपूर्ण चरित्र म्हणजे श्रीदत्तप्रभूच्या आदेशाचे केवळ प्रतिपालन होते. स्वामी एक महान तपस्वी असून धगधगीत वैराग्य त्यांच्या नसानसात भिनले होते. स्वामी महाराजानी भक्तजनोद्धारणार्थ स्तोत्रादी संग्रह, दत्तपुराण, दत्तमहात्म्य, द्विसाहस्त्री गुरुचरित्र, समश्लोकी गुरुचरित्र इत्यादि संस्कृत व प्राकृत ग्रंथ भांडारच उपासकांच्या हाती दिले. त्यांचे संन्यासी शिष्य श्री दीक्षित स्वामी व श्री दिक्षीत स्वामीचे संन्यासी शिष्य श्री शंकर स्वामी व श्री शंकर स्वामींचे संन्यासी शिष्य म्हणजे आमचे सद्‌गुरु "प. पू. परमहंस श्री दत्तानंद स्वामी महाराज".

प. पू. परमहंस श्री दत्तानंद स्वामी महाराज यांच्या कार्याचा अल्प परिचय

देहधारी भुवि प्राप्तौ यतीरुपेण चात्रिज: | कलौ भक्तां समुद्धर्तु दत्तानंद नमोस्तुते ||

परमहंस श्री दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज हे मूलतः महाराष्ट्राचे असून त्यांच्या पूर्वाश्रमासंदर्भात फारशी माहिती उपलब्ध नाही परंतु काही ज्येष्ठ साधकांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे जन्मगाव बार्शी होते व त्यांच्या वडिलांचे नाव भगवान किंवा भगवंत असावे असे समजते.
युवावस्थेत प.पू. श्री दत्तानंद स्वामी महाराज रॉयल इंडियन एअरफोर्स मध्ये नोकरी करत होते. एअर फोर्स मध्ये त्याकाळी भारतीय लोकांना मिळणारी भेदभावाच्या  वागणूकीविरुद्ध झालेल्या संपामध्ये त्यांनी भारतीय लोकांचे नेतृत्व केले होते, व त्यात यश मिळून भारतीय लोकांना सन्मानाची आणि भेदभावरहीत वागणूक मिळू लागली.

नोकरी करत असता, एकदा गुरुचरित्राच्या सप्ताहासाठी सुट्टी न मिळाल्यामुळे त्यांनी नोकरीचा त्याग केला व साधनेसाठी शिर्डीत आले. शिर्डीत श्वेत वस्त्र व जटाधारी ब्रह्मचारी अशा रूपात त्यांचे वास्तव्य असे. १९६४ मध्ये शिर्डीच्या साईमंदिरात असताना त्यांना दृष्टांत झाला कि तुम्ही श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे प.पू श्री शंकर स्वामींची भेट घ्यावी. त्याप्रमाणे प.पू. श्रीदत्तानंद  स्वामी महाराज, श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे, प. पू. श्री शंकरस्वामीं महाराजाना भेटले व दृष्टांताप्रमाणे येथे त्यांना सद्गुरू भेट झाली. प. पू. श्री शंकर स्वामींकडून त्यांनी श्री क्षेत्र नरसोबावाडी येथेच श्रीकृष्णानदीच्या तीरी १९६४-६५ च्या सुमारास विधिवत होमहवन व इतर संस्कारपूर्वक संन्यासाची परमहंस दीक्षा ग्रहण केली.    

त्यानंतर प. पू. श्री दत्तानंद स्वामीमहाराज  अनेक ठिकाणी भ्रमंती करत असत. विनाकारण येणारी उपाधी टाळण्यासाठी, वरकरणी उग्र व संतापी, असे रूप त्यांनी स्वीकारले होते. परंतु भक्तांसाठी अत्यंत प्रेमळ आणि कल्याण करणारी, त्यांचे पाप व संसारातील ताप दूर करून, त्यांची वृत्ती भगवद्भक्ती कडे लागण्यासाठीचा मार्ग प्रशस्त करणारी अशी "कलौ भक्तान समुद्धर्तु" अशी ही यतीमूर्ती असे. 

१९६५ सालच्या सुमाराला महाराज कल्याण येथे आले. तेथे त्यांचा मोठा शिष्य सम्प्रदाय होता. कल्याणला त्यांनी मठाची स्थापना केलेली होती व तेथे नित्य पूजा आरती वगैरे चालत असे. १९६६ च्या सुमाराला त्यांचे बडोदा येथे आगमन झाले व त्यांनी श्री पुरोहित यांचे घरी चातुर्मास केला व तसेच त्यांच्या घरी वासुदेव मठाची स्थापना केली. तथापि त्यांची भ्रमंती सतत चालू असे आणि नागपूर, चांदोंद, गरुडेश्वर इत्यादी ठिकाणी त्यांचे वारंवार येणे जाणे असे.  

त्यानंतर १९६७ साली  प. पू. श्रीदत्तानंद  स्वामी  महाराज यांचे ग्वाल्हेर येथे आगमन झाले व तेथे त्यांनी श्री गुर्जर यांच्या घरी वास्तव्य व मठाची स्थापना केली व अनेकांना मार्गदर्शन केले. त्यांचे पट्टशिष्य प. पू .श्री. तेलंग स्वामी महाराज यांची ग्वाल्हेर मुक्कामीच स्वामींची भेट झाली व १५ फ़ेब्रुवारी १९६९ रोजी त्यांना प. पू. श्रीदत्तानंद  स्वामी  महाराजांकडून अनुग्रह प्राप्त झाला. तदनंतर १९७२ साली  प. पू. श्रीदत्तानंद  स्वामी महाराज भोपाळ येथे आले आणि ३/१९३ अरोरा कॉलनी येथे श्री शिंगवेकर यांच्या घरी मठांची स्थापना केली. तसेच १९९९ च्या सुमारास इंदोर येथे वासुदेव नगर येथे मठ स्थापना केली. दोन्ही ठिकाणी त्यांचा मोठा शिष्य परिवार आहे.

 

इंदौर येथे वासुदेव नगर येथील मठात सन १९८५ पासून दत्तजयंती, गुरुपौर्णिमा व इतर उत्सव  प. पू. श्रीदत्तानंद  स्वामीमहाराजांचे आज्ञेने साजरे होऊ लागले व भक्तांची मांदियाळी होऊ लागली.

प.पू. श्रीदत्तानंद स्वामी महाराजानी १९६५ ते २०१० पर्यंत सतत भ्रमण करून लोकांना आध्यात्मिक मार्गावर अग्रेसर केले. त्यांनी कल्याण, पुणे, मुंबई, नागपूर, अकोला, बडोदा, ग्वाल्हेर, इंदौर , भोपाळ,बडोदा व इतर अनेक ठिकाणी संचार केला. या स्थानी त्यांचा शिष्य परिवार होता व अजूनही आहे.

भाद्रपद शुक्ल अष्टमी (दिनांक १५/०९/२०१०) रोजी   प. पू. श्रीदत्तानंद  स्वामी महाराज ब्रह्मलीन झाले. संन्यासी असल्यामुळे त्यांचे पार्थिव शरीराला यथाविधी, श्री क्षेत्र मंडलेश्वर येथे श्री नर्मदा पात्रात विधिवत जलसमाधी देण्यात आली.

त्यानंतरच्या काळात २००-२५० सदस्यांची नोंदणीकृत संस्था "श्री दत्तानंद सेवा मंडळ ट्रस्टची दिनांक ३१/०५/२०१२  स्थापना झाली असून प. पू. श्रीदत्तानंद  स्वामी महाराजांचे कृपाप्राप्त व प्रपन्न शिष्य श्रीमद सद्गुरु श्री तेलंग महाराज ह्यांच्या मार्गदर्शन व सानिध्यामध्ये गुरुपौर्णिमा, दत्तजयंती तसेच रामनवमी आणि जन्माष्टमी आदी उत्सव अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात.

 

संस्थेचा पत्ता व संपर्क क्रमांक - 

श्री. अवधूत दत्त मंदिर, स्वामी दत्तानंद सेवा मंडळ ट्रस्ट
G357/358 , कालिंदी गोल्ड कॉलनी ,अरविंद मेडिकल कॉलेजसमोर, उज्जैन रोड,  इंदोर (मध्य प्रदेश)
संपर्क क्रमांक : 9685186441, 9329889046,7987262801

प. पू. दत्तानंद स्वामी महाराजांची आरती

ओवाळू आरती श्री सद्‌गुरूराया ब्रम्हस्वरूपी सद्‌गुरूनाथा श्री दत्तानंदा ।।ध्रु.।।


व्रत घेवोनीया जन सेवेचे गृह त्याग करिती । गाणगाभुवनी दत्ता सन्निध्य जाऊनियां बसती योगिंद्राचे स्वरूप होऊनी भ्रमणाला निघती अंतर्यामी तळमळ मोठी बांधव या साठी ||1||ओवाळू..
जागो ज़ागी भक्तजनांचा मेळावा करिती अज्ञानाचे तिमिर सारण्या उपदेशा देती ईशत्वाचे स्वरूप होऊनी मानवांस देती भ्रमांत पडल्या मानवतेला प्रकाशांत घेती ।।2।।ओवाळू..
साक्षात्कार करवूनी भक्तां ईश दर्शनाचा भक्तवरचे संकट टाळी आनंद कंदाचा नारायण दत्तात्रेय स्वामी वासुदेवाचे सतत चालते नाम मुखिया दत्तानंदाचे ।। 3।।ओवाळू..
भजनांवरती बहुत प्रिती भान न समयाचे भक्तवृंद ही सवे गातसे गजर श्रीहरीचे भक्तासंगे आचार धर्मा वरी कटाक्ष फार जरी क्रोधला तरी ते हृदयी आत्मीयता ही फार ।।4।। ओवाळू..
लक्षुनी भिक्षा भक्त आमंत्रिती स्वामीरायाला परी धन्यतो स्वामी मांगे षड्रिपु भिक्षेला ऐश्यापरि ते उद्धरताती आपुल्या भक्तांना त्यांचे चरणी भक्त ठेवीती पदोपदी माथा ।।5।। 

 

ओवाळू आरती श्री सद्‌गुरूराया ब्रम्हस्वरूपी सद्‌गुरूनाथा श्री दत्तानंदा ।।ध्रु.।।

 

P. P. Paramhans Shri Dattanand Saraswati Swami Maharaj