सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपालबाबा महाराज, पिठापुर
सन १९८० साली आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम रेल्वेस्टेशनवर शेकडो वर्षांच्या अखंड समाधीतून उठून एक अवलीया अवतरले. डोक्यावरील जटा कमरेच्या खालपर्यंत हातांच्या नखांच्या भेंडोळ्या, पायांच्या बोटांची नखे वर्षानुवर्षांच्या समाधीतील बैठकीमुळे वरच्या दिशेस वळलेली, दिगंबर काया. प्लॅटफॉर्मवरुन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या नजरेत भरले की, ही आसामी वेगळीच आहे. ही आसामी म्हणजेच अवधूत अवलीया सद्गुरु भगवान श्री श्री श्री गोपालबाबा महाराज!
आसपासच्या सज्जन भक्तांनी श्रीगोपाल बाबांना चहा, सिगारेट, जेवण देण्यास भीतच सुरुवात केली. श्रीगोपालबाबा एका भक्तास म्हणाले की, "मुझे तेरे घरमें बारा साल रहने का है." तो भक्त श्रीगोपालबाबांना आपल्या घरी घेवून गेला व श्रीगोपालबाबा त्याच्या घरी १२ वर्षे राहिले. या फुलाच्या सुगंधाने अनेकभक्त श्रीगोपालबाबांना शोधत येवून दर्शन घेवू लागले. यानंतर बाबांचे वास्तव्य सन १९९३ ते २००० च्या मध्यापर्यंत विशाखापट्टणम् जिल्ह्यातील नरसीपट्टणम् जवळ बलीघटम् येथील पागलपाटी गुरुजी समाधी आश्रमात झाला. सुरुवातीस येथील विश्वस्त बाबांना आश्रमात येवू देण्यास तयार नव्हते. त्यावेळी बाबा येथील जंगलात ऊन, वारा, पाऊसात सहा महिने झाडाखाली बसून राहिले. त्यामुळे लोकांच्या विचारात बदल होवून त्यांनी बाबांना सन्मानपूर्वक आश्रमात घेतले. २००० साली बाबा येथून निघून २००३ सालापर्यंत राजमुद्रीजवळ धवलेश्वरम् येथे भक्ताच्या घरी वास्तव्यास होते. २००३ पासून बाबांचा प्रवास सुरु झाला. विशाखापटणम्, हैद्राबाद, बैंगलोर, राजमुद्री, माणिकनगर (हुमनाबाद), अक्कलकोट, गाणगापूर, सोलापूर, अहमदनगर, शिर्डी असा तो प्रवास होता. २००६ साली बाबांनी राजमुंद्री येथे वास्तव्यास असतांना जवळच्या भक्तांना पिठापूर येथे जावून अन्नदान सुरु करण्यास आदेशीत केले. व 'मेरा टाईम आने के बाद मै पिठापूर आता' असे बाबा बोलले. त्यानुसार भक्तांनी पिठापूर येथील पादगया क्षेत्रात कुकटेश्वर मंदिराच्या मागे मांडव टाकून नित्य अन्नदान केले. मे २००७ साली बाबा बेंगलोर येथे एका भक्ताच्या घरी वास्तव्यास असतांना बाबांनी पिठापूरात वस्त्रदान व विद्यादान सुरु करण्याचा आदेश दिला. त्यानुसार दि. १२-६-२००७ साली भक्तांनी पिठापूरात विनामूल्य शाळा सुरु करुन विद्यादान प्रारंभ केला व त्यावर्षीच्या दत्त जयंती पासून वस्त्रदान सुरु केले.
अन्नदान सुरु होताच, बाबांनी त्यांच्या भक्तास दृष्टांतात पिठापूर बायपास रोडवरील हायटेंशन विद्युत लाईन गेलेली एक शेतजमीन दाखविली व ही जमीन विकत घेण्याची आज्ञा केली. या दृष्टांतात बाबा ७० फुट उंच असून त्यांनी उजव्या हाताने हायटेंशन विद्युत केबल धरून ठेवलेली होती. हे दर्शवून बाबांनी स्वत:चे सामर्थ्य दाखविले. २००७ साली बाबांच्या आदेशाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका घेवून पायी पालखी सोहळा पिठापूर- माणिकनगर- गाणगापूर-अक्कलकोट-शिर्डी येथे आला.पालखी समारोपास बाबा स्वतः अचानक शिर्डीत प्रकटले.
२००८ साली बाबा नवरात्रीत एका भक्ताच्या घरी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अमलापूर येथे होते. बाबांच्या काही भक्त बाबांना पुन्हा विशाखापटणम येथे नेत असतांना पिठापूर बायपास रोडवरुन बाबांची गाडी जात होती.त्यावेळी २००७ साली भक्तास दुष्टातात दाखविलेल्या शेत जमीनीवर बाबांनी गाडी घ्यायला लावली. हीच आजची बाबांची आश्रमाची जागा. हा दिवस होता दि. ९-१०-२००८, विजयादशमी! श्रीगोपालबाबा गाडीतून खाली उतरले व बांधकामाच्या ठिकाणी खुर्ची टाकून बसले. श्रीगोपाल बाबांनी घोषणा केली की, "ये मेरा घर है, अब मुझे यहाँ रहनेका है, यह घर तीन दिनमें बनाओ, अब किराये के मकान में क्यों रहना ?" असे म्हणून श्रीगोपालबाबा पुन्हा गाडीत बसले व पुढे त्यांच्या मुक्कामी जाण्याचा इशारा केला. नंतर हे बांधकाम पूर्ण होई पर्यंत श्रीगोपालबाबा पिठापुरातच राहिल. बांधकाम पूर्ण होण्यासाठी चाळीस दिवसांचा कालावधी लागला. (चाळीस दिवस म्हणजे एक मंडल. या कालावधीचा अध्यात्मिक महिमा श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतामध्ये सविस्तर दिलेला आहे.) कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी (श्रीपादांची माता सुमती महाराणी यांचा जन्मदिवस) २००८ साली श्रीगोपालबाबा कायम वास्तव्यसाठी आश्रमात अवतरले व बोलले की, ''सात साल मेरा शरीर यहाँ काम करेगा". असे बोलून कायम वास्तव्यास राहिले. या कालावधीत श्रीगोपालबाबांनी कधीही पिठापुर सोडले नाही किंवा कोणा भक्ताच्या घरी गेले नाही. आश्रमात वास्तव्यास येताच श्रीगोपालबाबांनी आज्ञा केली की, “अब धुनी चालु करो." धुनी प्रज्वलीत करण्यासाठी श्रीक्षेत्र शिर्डी येथील श्रीसाईबाबांच्या द्वारकामाईतील अखंड धुनीतील मुळ अग्नी आणायला सांगितला, त्यानुसार अग्नी आणताच श्रीगोपालबाबांनी स्वहस्ते त्यात १०८ नारळ अर्पण करुन ९ जानेवारी २००९ रोजी अखंड धुनी सुरु केली. ही धुनी श्रीगोपालबाबांच्या, दत्त भक्तांचे कर्म, प्रारब्ध, व्याधी निवारणाचे कार्य अखंड करते.
श्रीगोपालबाबांच्या आज्ञांनुसार सुरु असलेले तीन कार्यक्रम आश्रमात विस्तारीत करण्यात आले. यातील पहिला मुख्य कार्यक्रम म्हणजे श्रीक्षेत्र पिठापूर परिसरातील गोरगरीब, अनाथ, रुग्ण व गरजु यांना नित्य अन्नदान. यामध्ये दररोज दुपारी १२ ते ३ या वेळेत महाअन्नदान सुरु करण्यात आले. जही ही सेवा अखंड सुरु असुन यामध्ये दररोज ५०० ते ७०० लोकांना अन्नदानाचा लाभ होतो. श्रीगोपालबाबांची दुसरी आज्ञा म्हणजे विद्यादान, यामध्ये गावातील गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आश्रमात मोफत विद्यालय सुरु करण्यात आले. यामध्ये आज २०० विद्यार्थी उच्च दर्जाचे शिक्षण घेत असून त्यांना गणवेश, शालेय साहित्य, वाहतूक व्यवस्था, सकाळी दुध, नाश्ता व दुपारचे जेवण इत्यादी आश्रमामार्फत मोफत पुरविण्यात येते. श्रीगोपालबाबांची तिसरी आज्ञा म्हणजे वस्त्रदान. त्यानुसार प्रत्येक दत्तजयंतीस व विविध ऋतुत पिठापुर परिसरातील व पंचक्रोशीतील गोर गरीबांना वस्त्रदान केले जाते. यामध्ये साड्या, लुंगी, शर्टस्, ब्लॅकेटस्, चपला वितरीत करण्यात येतात व वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांनामार्फत मोफत तपासणी करुन विविध आजारांवर निरनिराळे औषधे मोफत वितरीत केले जातात. श्रीगोपालबाबांच्या नावातच " गोपाल असल्याने आश्रमात सन २०१४ साली श्री गोपालबाबांच्या आज्ञेवरुन गो संरक्षणार्थ गोशाळा सुरु करण्यात आली. यात प्रसिध्द ओंगुल, म्हैसुर, गिर वगैरे भारतीय वर्णाच्या १०० गायींचे रक्षण व पालन करण्यात येत आहे.
आश्रमात नित्य सकाळी श्रीगोपालबाबांच्या कपिला गायीची पुजा करुन औदुंबर वृक्षाखाली श्रीपाद श्रीवल्लभांना पंचामृत अभिषेक केला जातो. नंतर श्रीगायत्री होम, श्रीपादांना व अखंड धुनीस नैवेद्य अर्पण करुन नित्य अन्नदानास सुरुवात होते. सायंकाळी आश्रमात श्रीपाद श्रीवल्लभांची पालखी निघते. आश्रमात दर पौर्णिमेस श्रीसत्यदत्तव्रत, श्रीगायत्री हवन वद्य पंचमीस संतान प्राप्तीसाठी ऋषिपुजन होते. तसेच दर शनिवारी सायंकाळी प्रदोषकाळी भक्तजन रक्षणार्थ सर्व ग्रह बाधा पिडा प्रशमनार्थ पार्थिव शिवलिंगास तैलाभ्यंगस्नान व तिलाभिषेक करण्यात येतो. आश्रमात श्रीगुरुपौर्णिमा, श्रीराखी पौर्णिमा, श्रीपाल श्रीवल्लभ स्वामी जयंती महोत्सव, श्री महालय अमावस्या, विजयादशमी, कार्तिक पौर्णिमा, महाशिवरात्री या महत्वांच्या पर्वास उत्सव साजरा करण्यात येतो व महाअन्नदान करण्यात येते.
श्रीपाद श्रीवल्लभ संपुर्ण चरितामृतामध्ये श्रीपादांनी वचन दिले आहे की, ते श्रीक्षेत्र पिठापुर येथे अवधूत रुपात कार्य करतील. आजच्या काळातील तेथील अवधुत म्हणजे श्रीगोपालबाबा महाराज. जे कायम दत्तात्रेयांप्रमाणेच “बालोन्मत्तपिशाच्चवृत्ती” अवस्थेत असत. श्रीगोपालबाबांनी आश्रमात वास्तव्यास सुरुवात केल्यानंतर देश विदेशातून श्रीदत्त भक्तांना दृष्टांतातून दर्शन व आदेश देत श्रीक्षेत्र पिठापूर येथे बोलावून घेतले व त्यांचे हातून जगतकार्यास सुरुवात करुन घेवून विविध जबाबदाऱ्या सोपवून या भक्तांचा सर्व योगक्षेम श्रीगोपालबाबांनी बहन केला. श्रीगोपालबाबा सतत त्यांच्या उन्मनी मौन अवस्थेतच असत. क्वचित प्रसंगी श्रीगोपालबाबा मराठी, इंग्रजी, तेलगु, उर्दु, राजस्थानी, जाट, पंजाबी वगैरे भाषेत येणाऱ्या भक्तांना त्यांच्या भाषेत सांकेतिक बोध देत असत. श्रीगोपालबाबांच्या शारिरीक वयाचा अंदाज कोणासही शेवटपर्यंत बांधता आला नाही. तथापी २५ डिसेंबर २०१० रोजी पौष शु. द्वितियेस श्रीगोपालबाबांनी सांगितले की, “आज मै २५२ सालका हो गया." पौष शु. द्वितिया ही श्रीदत्तात्रेयांचा द्वितीय अवतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जन्मतिथी होय.
सन १४५८ साली माघ वद्य प्रतिपदेस म्हणजेच श्रीगुरु प्रतिपदेस श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्रीशैल क्षेत्रात कर्दळी वनात गमन करते झाले. पुढे ३०० वर्षांनी श्री स्वामी समर्थ अवतारात पुन्हा प्रकट झाले. हा प्रकट दिन म्हणजे पौष शुध्द द्वितिया. श्रीगोपालबाबा म्हणाले त्यादिवशी श्रीस्वामी समर्थांना प्रकट होवून २५२ वर्षे झाली. श्रीगोपालबाबा म्हणत "एक होता है बागलकोट और एक होता है अक्कलकोट. मै अक्कलकोट हूँ." श्रीबाबा सर्वांतर्यामी असून दर्शनास येणाऱ्या तसेच सुदूरच्या गावातील आठवण काढणाऱ्या ज्ञात-अज्ञात भक्तांची, त्यांच्या कुटुंबियांची शिक्षणे, घरे, लग्ने, नोकरी, धंदा, संतती, संपत्ती अशा भौतिक तसेच अध्यात्मिक साधनेबाबत सर्वांगिण काळजी घेतात. श्रीगोपालबाबांसमोर नुसते बसले तरी त्यांना काही सांगावयाची गरज पडत नसे. येणाऱ्या दर्शनार्थीवर कोणते संकट आहे हे त्या दर्शनार्थीलाही माहित नसायचे व श्रीगोपालबाबा क्षणात त्या संकटाचे निरसन करुन त्याची प्रचिती त्या भक्तास देत. मग ते सर्व कुटुंबच दत्तभक्तीत लीन होत असे.
पूर्वी एकदा २००७ साली बाबा एका भक्ताच्या बेंगलोर येथील घरुन गाडीने विशाखापटणमूला येत असता रस्त्यात चित्रदुर्गजवळ चिकमंगळूर घाटात दत्तात्रयांचे बाबाबुढनगिरी नावाचे डोंगरावरील स्थानावर रात्री मुक्कामी राहिले. त्यारात्री बाबांजवळ जे दोन भक्त सेवेत होते त्यांना आकाशवाणी ऐकू आली की, तुम्ही ज्यांची सेवा करत आहात ते नित्य सोळा वर्षाचे दिसणारे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत.
बाबा आश्रमात वास्तव्यास आल्यानंतर एका भक्तास दृष्टांत झाला की, शिव-पार्वती, नंदीश्वर, तिरुपती बालाजी व बाबा हे सर्व आकाशाएवढ्या उंचीचे असून स्वर्गीय संगीताच्या साथीत सर्वजण आश्रमात प्रवेश करत आहेत. स्वत: नंदिश्वर त्या संगीताच्या तालावर जोर जोरात आनंदात मान हलवत आहे. हे सर्वजण आश्रमात आले व तिरुपीत बालाजी आश्रमाच्या जागेत प्रतिष्ठापीत झाले व त्याजागेवर दीडलक्ष गुलाब पुष्पे अंथरण्यात आली.
२०१४ साली बाबा आश्रमात खुर्चीवर बसलेले होते. अचानक बाबानी जमीनीला हात लावला व बाबा बोलले की, परमात्मा पांच पैसा दिया तो तिरुपती महापटनम हो गया, परमात्मा यहाँ पाच रुपया दिया है, असे बोलून बाबांनी आश्रमभूमी ही तिरुपती पेक्षा १०० पट आशिर्वादीत असल्याचे सांगितले.
श्रीगोपालबाबा म्हणजे स्वयं श्रीपाद श्रीवल्लभ, कबीरांच्या काळी श्रीगोपालबाबा त्यांचे गुरु स्वरुपात श्रीरामानंद होते. कबीर श्रीसाईबाबा स्वरुपात असतांना श्रीगोपालबाबा महाविष्णु व्यंकुसा गोपालराव माधवराव देशमुख म्हणून त्यांचे गुरु होते. व पिठापुरात श्रीगोपालबाबा त्याच गोपाल या नावाने अवतरले व आपल्या सर्व भक्तांच्या श्रीगुरु रुपाने कार्य करत दि. २० नोव्हेंबर २०१६ रोजी रविवारी, कार्तिक वद्य षष्टीस महासमाधिस्त झाले.
समाधीपूर्वी बाबांनी एका भक्तास दृष्टांत दिला की, बाबांच्या गाडीवर मागच्या काचेवर नाव आहे. पिठाधीपती, श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान, पिठापूर व आवाज आला की, 'पिठाधीपती मर गया.' बाबानी पूर्वीच वेळोवेळी हात लावून समाधीची जागा दाखवून दिली होती. बाबा बोलले होते की, "परमात्मा अब बुढा हो गया. परमात्मा अब रिटायर्ड होता. अब कुंडीमें बैठके काम करनेका टाईम आ गया." झाले.
समाधी पश्चात बाबांनी त्वरीत एका भक्तास आदेश दिला की, माझ्या समाधीजवळ दोन समया लाव. एकास आदेश दिला की, माझ्या समाधीस रोज भस्माने अभिषेक घालत जा. एका भक्तास आदेश दिला की, मी जे भक्तांसाठी सतत कष्ट करतो त्याने माझे अंग दुखीसाठी मला मालीश करत जावे. बाबांच्या पंचधातू मुर्ती स्थापनेनंतर बाबांनी आदेश दिला की, दर शुक्रवारी तिरुपती बालाजीस जसा पूर्णाभिषेक असतो तसाच दर गुरुवारी मला अभिषेक घालत जा. बाबांच्या २०१७ च्या प्रथम ब्रम्होत्सवापूर्वी काहीच दिवस आदी बाबांनी आदेश दिला की, मी गेलो नाही, माझी पुण्यतिथी साजरी न करता माझ्या लग्नाचा ब्रम्होत्सव ९ दिवस साजरा करावा.
समाधीतून श्रीबाबांचे विश्वकुंडलिनी जागृतीचे कार्य अखंड सुरु असून त्याची प्रचिती येणाऱ्या सर्व भक्तजनांस येत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतामध्ये श्रीपादांनी सांगितले आहे की, आगामी काळात पिठापूरात मुंग्याप्रमाणे भाविक दर्शनास येतील. या भाविकांचा आधी भौतिक व अध्यात्मिक भार वहन करण्याचे कार्य श्रीगोपालबाबा समाधीतून अखंडपणे करीत आहेत.
श्रीगोपालबाबांच्या आश्रमातील नित्य अन्नदान, विद्यादान, वस्त्रदान व गोशाळेसाठी आपला सहभाग बँक खात्यात जमा करु शकता.
State Bank of India
Shri Gopalbaba Annasantarpana Trust.
Branch: Pithapuram,
Account No.: 36502382299,
IFSC Code: SBIN0001003
Union Bank of India
Shri Gopalbaba Annasantarpana Trust.
Branch: Pithapuram
Account No.: 043211100002193
IFSC Code: UBIN0804321
विश्वस्त, श्रीगोपालबाबा अन्नसंतर्पण ट्रस्ट,
श्रीगोपालबाबा महाराज आश्रम, पिठापूर.
संपर्क: 9133132498, 9133172498
- हिराचंद गोपालचंद कोठारे
भगवान श्री श्री श्री गोपालबाबा महाराज आश्रम, पिठापुर मधील पुजा विधी कार्यक्रम
अ) दैनंदिन कार्यक्रम
१) पहाटे ४ वाजता काकड आरती व बाबांच्या समाधीची सेवा
२) गोपुजा
३) श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना पंचामृत अभिषेक
४) स्वयंभु नारायण पादुका पुजन
५) गायत्री हवन
६) धुनी महाराज व श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींन महानैवेद्य अर्पण
७) सायंकाळी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची पालखी सेवा
ब) साप्ताहिक कार्यक्रम-
१) गुरुवारी बाबांचा पंचामृताभिषेक
२) शनिवारी सायंकाळी प्रदोष पुजा
क) मासिक कार्यक्रम
१) पौर्णिमा-श्रीदत्त सत्यव्रत व अखंड धुनीला पहाटे १०८० हवन
२) कृष्णाष्टमी-अनघाष्टमी व्रत
३) मासिक शिवरात्री-महारुद्राभिषेक
४) अमावस्या-स्वामींची विशिष्ट पालखी सेवा
५) चित्रा नक्षत्र-श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना रक्षा बंधन व सायंकाळी १०८ दिप प्रज्वलन सेवा
६) शुक्ल पंचमी-संतान प्राप्ती साठी रृषीपुजन
७) प्रत्येक ९ तारखेला पिठापुर सरकारी रुग्णालयात गर्भवती माता तपासणी शिबीरात अन्नदान
ड) वार्षिक कार्यक्रम
१) युगादी-गुडी पाडवा बल प्रतिपदा
२) श्रीराम नवमी
३) श्रीगुरु पौर्णिमा
४) राखी पौर्णिमा
५) श्रीपाद जयंती
६) महालय अमावस्या (या दिनी आश्रमात स्वयंभु अश्वत्थ नारायण पादुका प्रकट झाल्या.)
७) विजया दशमी (श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची वैश्विक कार्यक्रम राबविण्यास भगवान श्री श्री श्री गोपालबाबा महाराजांचे पिठापुर येथे आगमन)
८) कार्तिक शुक्ल त्रयोदशी ते कार्तिक वद्य षष्ठी-भगवान श्री श्री श्री गोपालबाबा महाराज यांचा पुण्यतिथी आराधना ब्रम्होत्सव
९) श्रीदत्त जयंती
१०) महाशिवरात्री
इ) विद्यादान-
गरिब कुटुंबातील २०० मुला मुलींना आश्रमात शिस्तबद्ध व कार्पोरेट पद्धतीची शिक्षण व्यवस्था,
# Shri Gopalbaba Maharaj Pithapur, श्रीगोपालबाबा, Shrigopalbaba
#shrigopalbabamaharaj
#hirachandgopalchandkothare