श्रीमद् गोविंद स्वामी महाराज

जन्म: ज्ञात नाही.
आई/वडील: ज्ञात नाही.
गुरु: ज्ञात नाही.
शिष्य: वासुदेवानंद सरस्वती.
विशेष: निर्याण प्रसंगी वेदांताचे सर्व ज्ञान वासुदेवानंद सरस्वती याना दिले.

नृसिंहवाडी क्षेत्रातील तपोनिधींच्या मालिकेतील श्रीमद् गोविंद स्वामी हे ब्रह्मनिष्ठ महापुरूष होते. त्यांचे ब्रह्मानंदांच्या मठातच वास्तव्य होते. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती हे गोविंद स्वामींना गुरुस्थानी मानत असत. श्रीमद् गोविंद स्वामींचे श्रीवासुदेव शास्त्री (प. प. वासुदेवानंद सरस्वती) च्या वर अकृत्रिम प्रेम होते. श्रीमद् गोविंद स्वामींनी निर्वाणकाळी वेदांताचे रहस्य श्रीवासुदेवशास्त्रींना सांगून त्यांना अनेक दुर्मिळ मौल्यवान ग्रंथ दिले.

श्री गोविंद स्वामींचा अधिकार

नृसिंहवाडीला सनकादिकात गोविंद स्वामी महाराजांचा अर्थात ब्रह्मय्या स्वामी महाराजांचा अधिकार फार मोठा. थोरल्या महाराजांना जे गुरुस्थानी होते त्यांच्या अधिकाराची काय थोरवी वर्णावी ? प्रत्यक्ष दत्त महाराज यांच्याशी बोलत असत. असे जरी असले तरी आज यांच्याविषयी केवळ थोरल्या महाराजांच्या चरित्रात माहिती उपलब्ध आहे, अन्य कुठेही यांचे विषयी माहितीचा आधार नाही. 

अगदी पहिल्यांदा थोरले महाराज जेव्हा नृसिंहवाडीला जाण्याकरिता निघाले तेव्हा बोरगाव मुक्कामी महाराजांना पहिला दृष्टांत झाला. दृष्टांतात सांगणे झाले कि नृसिंहवाडीला गोविंदस्वामी म्हणून मोठे अधिकारी पुरुष आहेत त्यांचे दर्शन घ्यावे. मजल-दरमजल करीत महाराज वाडीला पोहोचले आणि प्रथम दत्त पादुकांचे दर्शन घेऊन गोविंदस्वामींची चौकशी करणार इतक्यात ब्रह्मानंदांचे मठातील माडीवरून गोविंदस्वामी स्वतः खाली येऊन चिरपरिचिताप्रमाणे विचारू लागले, काय वासुदेव शास्त्री केव्हा आला ? चला माडीवर, स्नान वगैरे करून या. 

थोरल्या महाराजांची हि नृसिंहवाडीला पहिलीच भेट होती आणि कोणी त्यांना त्या वेळेस ओळखत नव्हते. नेसलेला एक मळकट पंचा आणि एक पांघरलेला असा त्यांचा वेष पाहून हे ब्राह्मण आहेत का ? असा तेथील पुजाऱ्यांना संशय आला. पुजाऱ्यांनी देवाला पाणी घालू न दिल्याने नुसते दर्शन घेऊन महाराज मुकाट्याने वर येऊ लागले. यावेळी गोविंदस्वामी मठात पोथी वाचत होते. दत्त महाराज गोविंदस्वामींना म्हणाले, पोथी वाचण्याचे सोडून मंडपात काय चालले आहे ते पहा. त्या लांबून आलेल्या ब्राह्मणाला पुजारी पाणी घालू देत नाहीत. हे दत्त महाराजांचे सांगणे होताच गोविंदस्वामी खाली आले. तोवर थोरले महाराज खिन्न चित्ताने वर येत होते. त्यांना गोविंदस्वामी महाराज म्हणाले, शास्त्रीबुवा, पादुकांवर पाणी घातले कि नाही ? यावर घडलेली हकीकत महाराजांनी गोविंदस्वामींना सांगितली. यावर आपला दंड थोरल्या महाराजांचे हाती देऊन गोविंदस्वामी खाली मंडपात आले. थोरल्या महाराजांनी पादुकांवर पाणी घातले आणि पुजारी वर्गाची शंका दूर झाली. 

नृसिंहवाडीस असताना रात्री कृष्णामाईवर थोरले महाराज हातपाय धुण्यास गेले. रात्री शेजारतीनंतर खाली दत्त महाराजांपाशी जायचे नाही हा नियम त्यांना ठाऊक नव्हता. स्वामी महाराज खाली गेले तेव्हा शेजारती होऊन गेली होती. द्वार बंद असल्याने आता देवदर्शन होणार नाही तेव्हा प्रदक्षिणा घालून जावे या विचाराने ते प्रदक्षिणा घालण्याकरिता पुढे येताच दक्षिण द्वारापाशी एका भव्य तेजःपुंज संन्यासी महाराजांनी त्यांना दरडावून विचारले, शेजारती झाल्यावर इकडे न येण्याचा नियम तुला माहित नाही काय ? त्यावेळी स्वामी महाराजांनी नमस्कार करून क्षमा मागितली आणि हा नियम ठाऊक नसल्याचे सांगितले. नंतर ते संन्यासी महाराज म्हणजे साक्षात नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज होते असे गोविंद स्वामींकडून समजले.

पंचायतन पूजेबरोबर दत्त पादुकांची पूजा करावी असे गोविंदस्वामींनी थोरल्या महाराजांना सांगितले, पण देवाची इच्छा असेल तसे होईल असे म्हणून थोरले महाराज स्वस्थ राहिले. पुढे काही दिवसांनी पादुका पूजनाचा दृष्टांत झाला आणि थोरल्या महाराजांनी पादुका पूजन सुरु केले. गोविंदस्वामी महाराज हे थोरल्या महाराजांना गुरुस्थानी होते. त्यांचे सांगणे म्हणजेच साक्षात दत्त महाराजांचे सांगणे हा अनुभव अनेकदा थोरल्या महाराजांनी घेतलेला होता. गोविंद स्वामींचा असा फार मोठा अधिकार होता.

गोविंद व मौनी स्वामी हे समकालीन होते. त्यानाही श्री दत्ताचे सांगणे होत होते. प. पु. टेम्बे स्वामींची वाडीत प्रथम कोणाशीच ओळख नव्हती. नेसलेला एक मळकट पंचा व एक पांघरलेला असा वेष असलेले टेम्बे स्वामी ब्राम्हण तरी आहेत की नाहीत? असा पुजाऱ्याना संशय आल्याने त्यांना श्री पादुकांवर पाणी घालू दिले नाही. तेव्हा ते नुसते दर्शन घेऊन मुकाट्याने वर येऊ लागले. इतक्यात श्री गोविंद स्वामींना प्रभूंचे सांगणे झाले की, पोथी वाचण्याचे सोडून मंडपात काय चालले ते पहा. त्या बिचाऱ्या लांबून आलेल्या ब्राम्हणाला पुजारी पाणी घालून देत नाहीत. हे सांगणे झाल्यावर गोविंद स्वामी ताबडतोब उठून खाली आले. वासुदेव शास्त्री खिन्न चित्ताने वर येत होते. त्यांना पाहिल्यावर गोविंद स्वामी म्हणाले 'शास्त्रीबुवा पादुकांवर पाणी घातले की नाही ?' नंतर शास्त्रीबुवानी घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा गोविंद स्वामींनी आपला दंड त्यांचे हाती दिला व ते श्रीच्या  मंडपात आले. नंतर शास्त्री बुआनी गुरुपादुकाना पाणी घातले. त्या वेळी त्यांना गुरुकृपेची अगाध लीला अनुभवता आली. गोविंद स्वामींचा समाधी काळ जवळ आला तेव्हा  शास्त्रीबुवा वाडीतच होते. त्यांना त्यांनी दशओपनिशीद सांगून पूर्ण आशीर्वाद दिला. समाधीचे अधलेदिवशी शास्त्री बुवाना उद्या गोविंदस्वामी देह सोडतील असा द्री्ष्टांत झाला तेव्हा बुआ त्यांचे जवळच बसून राहिले. जेव्हा गोविंद स्वामींचे निर्वाण झाले तेव्हा मौनी स्वामीसारख्या जीवन्मुक्त यतीलाही अतिशय दुःख झाले. नंतर यार्थशास्त्र कृष्णेच्या प्रवाहात स्वामींचा देह विसर्जन करण्यात आला. शेवटी मौनी स्वामींचे आज्ञेनुसार बुवाचे हस्ते समराधन करण्यात आले.

श्रीमद् गोविंद स्वामी ज्या ठिकाणी ध्यानास बसत त्या स्थानाला ‘गोविंदपूर’ म्हणतात. त्या गोविंदपुरावर एक अश्वत्थ वृक्ष आहे. पादुका असलेली दोन-तीन मंदिरे इ. देवांची मंदिरे आहेत.

श्रीमद् वासुदेवानंद सरस्वतींच्या अलौकिक जीवनात श्रीमद् गोविंद स्वामींचे स्थान अढळ आहे.