श्री नारायणस्वामी (समाधी सन-१८०५)

श्री नारायणस्वामी
श्री नारायणस्वामी 

जन्म: गार्ग्य गोत्री देशस्थ ब्राह्मण, उपनाव जोशी, जन्मदिवस ज्ञात नाही
कार्यकाळ: -१८०५
संप्रदाय: दत्त संप्रदाय
गुरु: श्री नृसिंह सरस्वती
समाधी: चैत्र वद्य अमावस्या, इ.स.१८०५, वैकुंठी विमानातुन गेले

श्रीनारायणस्वामी – पूर्वाश्रमात विसापूर ग्रामनिवासी गार्ग्य गोत्री देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, महाराष्ट्रीय. उपनाव जोशी. पूर्ववयात विद्या व सदाचारसंपन्न असल्याने त्या प्रांतात विद्वन्मान्य होते. पहिली पत्नी परलोकवासी झाल्यावर कोल्हापूर प्रांतातील तारळे गावातील श्री. रामदीक्षित गुळवणी यांच्या कन्येबरोबर त्यांचा दुसरा विवाह झाला व त्यांना विश्वंभर नावाचा पुत्र झाला. याप्रमाणे सुखाने त्यांचा संसार चालला होता. एकदा पुण्यात विद्वत्सभेत शास्त्रार्थात त्यांचा पराभव झाल्याने त्यांना अत्यंत खिन्नता प्राप्त झाली. पुन:शास्त्रात असा पराभव न व्हावा म्हणून अधिक अध्ययन करण्याकरता घरदार सोडून ते काशीला गेले व त्या ठिकाणी चांगल्या गुरूच्या जवळ राहून गुरूंची उत्तम सेवा करून सर्व शास्त्रांत पारंगत झाले.

श्रीनारायणस्वामींचा शास्त्राध्ययन करण्याचा उद्देश गुरूंनी ओळखून त्यांच्याजवळ ‘वादामध्ये कोणाचाही पराभव करणार नाही’ अशी गुरुदक्षिणा मागितली. ती आज्ञा मान्य करून श्रीनारायणस्वामी आपल्या गावी परत आले. त्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या व काही वर्षांनी पत्नी स्वर्गवासी झाली. पुत्राला विद्याभ्यासासाठी पुण्याला ठेवून आपल्या दोन मुलींसह कोल्हापूरला श्रीजगदंबेच्या सेवेला ते राहिले. भगवतीने संतुष्ट होऊन त्यांना नरसोबाच्या वाडीला जाऊन श्रीदत्ताची आराधना करण्याची आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणे श्रीकृष्णपंचगंगेच्या संगमावरील श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडीत मुलींसह राहून श्रीदत्ताची उपासना करू लागले.

ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या पारमार्थिक इतिहासामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे स्थान ध्रुवपदाप्रमाणे अढळ आहे. त्याप्रमाणे संतश्रेष्ठ नारायण स्वामींचे श्रीक्षेत्र नृसिंहवाडीतील स्थान ध्रुवाप्रमाणे अढळ आहे. श्री दत्तात्रेयांनी या आपल्या अंतरंग एकमेवाद्वितीय शिष्याला व त्यांच्या उत्कट भक्तीला प्रसन्न होऊन ‘अग्रपूजेचा’ अधिकार बहाल करून त्याप्रमाणे आजही दत्तात्रेयांच्या पूर्वी त्यांची पूजा केली जाते.

नारायण स्वामींचा जन्म विलासापूर (कर्नाटक) गावातील गार्ग्य गोत्री जोशी कुटुंबात झाला. उपनयना नंतर वेदशास्त्रांचा सांगोपांग अभ्यास केला. नेहमी ब्रह्मकर्मात रमणाऱ्या स्वामींनी, ‘जन्मभर अपराजित राहीन’, अशी महत्त्वाकांक्षा मनाशी ठेवून काशी क्षेत्री प्रयाण केले. तेथील सद्गुरूंच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेतले आणि ‘आजन्म कोणाशीही वाद घालणार नाही’ असा संकल्प केला. त्यांचा हा संकल्प म्हणजे त्यांची गुरुदक्षिणाच होती. त्यामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. सद्गुरूंच्या आशीर्वादाने अत्यानंदित झालेले नारायणशास्त्री कोल्हापूरात आल्यानंतर ते वाडीस श्रीदत्त दर्शनास आले. कृष्णा पंचगंगा तीरावरील निवासी भक्तकामकल्पद्रुम श्री नृसिंहसरस्वती महाराज तुमच्यावर कृपा करून स्वत:च तुम्हाला चतुर्थाश्रमाची दीक्षा देऊन कृतार्थ करतील. या महालक्ष्मीच्या आशीर्वादाप्रमाणे विरक्त वृत्तीने व दत्तभक्तीने प्रेरित झालेले हे विद्वानशास्त्री, वाडीत पादुकारूपाने वास्तव्य करणाऱ्या नृसिंह सरस्वतींचे शिष्य बनले.

भक्ताच्या मनीची इच्छा जाणून घेणाऱ्या श्री नृसिंहसरस्वतींनी कृष्णा पंचगंगा संगमावर त्यांना घेऊन जाऊन तीन दिवस संगमातील अमरापूर येथे संन्यास दीक्षा दिली. त्यासाठी आवश्यक प्रायश्चित्त देऊन दंड, कमंडलू, काषायवस्त्रादि देऊन ‘नारायण सरस्वती’ असे नाव ठेविले. संन्यासी वेषात गुरुपादुकांच्या दर्शनासाठी मंडपात येऊन पादुकांना परमप्रेमाने दंडवत केला. दंडधारी वेषांत गावात आल्यानंतर पुजारी मंडळी शंकित झाली तेव्हा नृसिंहसरस्वतींनी पुजाऱ्यांना दृष्टांत देऊन सर्व हकिकत कथन केली. त्यानंतर ‘नारायण स्वामी’ हे महापुरूष असल्याची साक्ष पटली व पुजारी मंडळी स्वामींना वंदनीय मानू लागली.

नारायण स्वामींची कीर्ती सर्वत्र पसरली. कोल्हापूरचे छत्रपती त्यांना मानीत असत. पुष्पकारूढ होऊन वैकुंठगमन केल्यानंतर त्यांनी आपले परम शिष्य श्री कृष्णानंद स्वामींना आपल्या पादुका स्थापून त्यांचे नित्य अर्चन करण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे दत्तगुरूंच्या पश्चिम भागी व श्री उत्सवमूर्तीच्या उजव्या बाजूस नारायण स्वामींच्या सुंदर अशा पादुका स्थापन केल्या. म्हणून उत्सवमूर्तीच्या सान्निध्यात त्यांना अक्षय असे ध्रुवपद दिले. आजही नित्य प्रात:काळी श्री दत्तगुरूंच्या पूजेच्या आधी श्रीमन् नारायण स्वामींची पूजा करतात. हे स्थान अतिशय जागृत व कडक आहे. त्यांचे वास्तव्य वाडीत शाश्वत आहे, असे अनुभूतीतून सिद्ध होते.

अग्रपूजाधिकारी श्रीमद् नारायण स्वामींच्यासारख्या अवतारी पुरुषांच्या कृपाशीर्वादाने नरसोबावाडीतील मंडळी त्यांची सेवा करीत आहेत. अशीच सेवा वंशोवंशी आमच्याकडून करून घेऊन निरंतर कल्याण करावे अशी सर्व पुजारी मंडळींची श्रीमद् नारायण स्वामींच्या पवित्र चरणी प्रार्थना असते!

श्रीमन् नारायण स्वामिन् । दयाब्धे तारकपद दायिन ।

‘ईश्वरप्रणिधानाद्वा’ या भगवान् पतंजलीच्या वचनाला सत्य करण्यासाठी भगवान् दत्तात्रेयांनी त्यांच्यावर अनुग्रह केला व त्यांना समाधिसिद्धी प्राप्त झाली. निरंतर ईश्वरचिंतन केल्याने ईश्वर संतुष्ट होतो व त्याच्या अनुग्रहाने समाधी सिद्धी होते. याप्रमाणे नित्य श्रीनारायणस्वामींचा समाधिअभ्यास चालला असता एके दिवशी पहाटे श्रीनारायणस्वामी नित्याप्रमाणे समाधी लावून बसले. त्यादिवशी मुलींना रोजच्या वेळेच्या पूर्वी जाग आली व शौचाला जाण्याकरता मुली वडिलांना हाका मारू लागल्या. श्रीनारायणस्वामींचा समाधिभंग होईल म्हणून श्रीदत्तांनी श्रीनारायणस्वामींचे रूप घेऊन, मुलींना बाहेर नेऊन त्यांचा विधी उरकून, त्यांना अंथरूणावर झोपवून, श्रीनारायणस्वामी समाधीतून उठण्यापूर्वी श्रीदत्तात्रेय अदृश्य झाले. 

नित्याप्रमाणे समाधीतून उठल्यावर श्रीनारायणस्वामींनी मुलींना शौचालय जाण्याकरता उठविले तेव्हा मुली म्हणाल्या, “तुम्ही आम्हांला आताच शौचाला नेऊन आणले आणि पुन: कशाला जागे केले?” मुलींनी शौचाला गेलेली ती जागा दाखविल्यावर ती गोष्ट सत्य असल्याची त्यांची खात्री झाली व आपली समाधी भंग होऊ नये म्हणून प्रभूंनीच हे कृत्य केले असे समजून त्यांना अत्यंत दु:ख झाले, देवाकडून अशी सेवा घेणे अनुचित समजून एका मुलीला कोल्हापूर प्रांतातील सोळांकूर या गावी व दुसऱ्या मुलीला त्याच प्रांतातील कापसी या गावी योग्य वरांना देऊन आपण विरक्त होऊन पुन: पूर्वीप्रमाणे ते उपासना करू लागले. 

देवाजवळ संन्यास घेण्याची इच्छा प्रकट केल्यावर योग्य वेळी संन्यास होईल असे देवाचे सांगणे झाले. श्रीनारायणस्वामी नित्य पहाटे संगमावर स्नानाला जात असत. एके दिवशी नित्याप्रमाणे स्नानाला गेले असता पाय घसरून पाण्यात गेले. त्या ठिकाणी श्रीदत्त भगवान श्रीनृसिंहसरस्वतींनी स्वत: प्रणवोच्चारपूर्वक सर्व संन्यासविधी यथाशास्त्र करून त्यांना दंड दिला व श्रीनारायणसरस्वती असे नाव ठेवले. हा सर्व विधी झाल्यावर ज्या ठिकाणी हे पाण्यात गेले होते तेथूनच दंडकमंडलूसह संन्यासीवेषात बाहेर आले. 

त्यांना संन्यासीवेषात पाहून तेथील मठातील महंताना वाटले की, गुरुशिवाय याने स्वत:च संन्यास घेतला आहे. हा भ्रष्ट आहे असे समजून त्यांच्यावर बहिष्कार घातला. श्रीनारायणस्वामी आपल्या खोलीचे दार बंद करून बसत असत. बाहेरून कोणी भक्ताने नमस्कार केल्यास आतून ‘नारायण’ असा शब्द येत असे. ते पाहून हा काय प्रकार आहे हे पाहण्याकरता एके दिवशी रात्री मठाधिपती नारायणस्वामींच्या खोलीच्या दाराच्या बिळातून पाहू लागले. त्या दिवशी शनिवार असल्याने श्रीनारायणस्वामी डोळे मिटून प्रेमाने नृसिंहाचे भजन करीत होते; व एक मोठा सिंह त्यांच्या समोर बसलेला आहे असे त्यांना दिसले. ते पाहून श्रीनारायणस्वामींचा अधिकार फार मोठा आहे असे वाटून ते नारायणस्वामींना शरण गेले व ‘आपला अधिकार न समजल्यामुळे मी आपणाला भ्रष्ट समजलो’ असे म्हणाले, तेव्हा नारायणस्वामींनी त्यांना आपल्या संन्यासाची सर्व हकीगत सांगितली. मठाधिपती त्यांचे शिष्य झाले व कृतकृत्य झाले. श्रीनारायणस्वामी शालिवाहन शके १७२७ चैत्र वद्य अमावस्येला नरसोबाच्या वाडीत सामाधिस्थ झाले. त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव चैत्र महिन्यात अद्याप त्यांचे वंशज नरसोबाच्या वाडीला येऊन करीत असतात. 

परमेश्वराच्या सगुणरूपाची उपासना करून हल्लींच्या काळातही ईश्वरप्रसादाने उपासनाकार ब्रह्मसाक्षात्कार होऊन तो जीवन्मुक्त होतो हे सांगण्याकरता श्रीवासुदेवानंदसरस्वतींनी आपल्या युवाशिक्षेच्या शेवटी श्रीनारायणस्वामींचे संक्षिप्त चरित्र वर्णन केले आहे. 

श्रीनारायण स्वामींचे अनेक अधिकारी शिष्य होऊन गेले त्यात, 

१) जनार्दन स्वामी उपाध्याय तथा श्री कृष्णानंद स्वामी काशीकर 
२) श्री प श काळोस्वामी बामणी 
३) श्री केशवानंद स्वामी
४) श्री विठ्ठल रावजी परंडेकर
५) श्री गुरुभक्त पुजारी (ढोबळे)
६) श्री भोगेश्वर मैराळ उर्फ आबासाहेब माजनालकर
७) नागेशभट्ट जिउभट गुळवणी
८) बाबुराव खंडो कुलकर्णी. इ. इ.

नारायण स्वामींचे एक भक्त कुरुंदवाडचे चिवटे यांचेकडे पैशाची वानवा होती. त्यांनी स्वामींना तशी प्रार्थना केली. नारायणस्वामी म्हणाले "उद्या सांबाच्या मागे जे असेल ते घेऊन जा" त्यानुसार सांबाच्या मंदिरामागे पहिले असता. एक जडजवाहीर लादलेला उंट होता. ती संपत्ती घेऊन ते धनवान झाले. काशीहून स्वामींनी आणलेले, त्यांचा नित्य पूजेतील हे लिलाविश्वभर लिंग स्वामींचे आज्ञेनुसार श्री पेटकर स्वामींनी कोल्हापूरच्या मठात स्थापन केले आहे. पण पुढे ते लिंग नृसिह वाडीस दत्तास्थनी देण्यात आले.

श्री नारायण स्वामींचे वंशज सांगली मिरज तासगाव ब्रम्हनाळ या परिसरात विसापुरकार जोशी किंवा उपाध्ये या नावाने आहेत. नारायणस्वामींचे वंशज दीक्षित हे वाडीत नारायणस्वामी उत्सवास येत असतात. एकेकाळी नारायणस्वामी स्थानाचे मोठे ऐश्वर्य होते. दत्त संप्रदायातील वासुदेवानंद सरस्वती, चिदंबर दीक्षित महास्वामी, श्री मिरासाहेब, श्री गुळवणी महाराज यांच्या सारख्या सत्पुरूष  व्यक्तींना ते पूजनिय होते. नारसोबा वाडीत स्वामींचे अग्रस्थान आहे. स्वामींच्या पवित्र आसनांची पुजारी प्रथम पूजन करतात व नंतर मूळ दत्तस्थान उघडून काकडारती होते. असा त्यांचा सन्मान आहे. श्री नृसिंह सरस्वतीची उत्सव मूर्ती ही कायम नारायण स्वामींचे सानिध्या त असते. केवढा हा सन्मान एक शिष्योत्तमाचा !

नारायण स्वामींचा अधिकार

नारायण स्वामी महाराज हे दत्त महाराजांना अतिप्रिय होते, कोल्हापूर येथे देवी मंदिराच्या बाहेर असलेल्या कट्ट्यावर प्रत्यक्ष माता आणि दत्त महाराज त्यांचे भजन ऐकण्यासाठी येत असत इतकी त्यांची योग्यता होती. नृसिंहवाडी येथे एकदा एका कुष्ठ झालेल्या ब्राह्मणाला दत्त महाराजांनी दृष्टांत देत म्हटले, उद्या पहाटे नारायण स्वामी महाराज घाटावर आंघोळीस येतील, त्यांच्या आंघोळीच्या जागेच्या खालच्या अंगाला तू आंघोळ करावीस, तुझे कुष्ठ जाईल. झाले तो ब्राह्मण पहाटेस येऊन नारायण स्वामी महाराजांची वाट पाहत बसला, नारायण स्वामी महाराज नेहेमी प्रमाणे पहाटे आले, आपल्या आधी एक ब्राह्मण येऊन वाट पाहात असल्याचे त्यांना जाणवले, आश्चर्य वाटून त्यांनी ब्राह्मणाकडे चौकशी करताच त्यांना दृष्टांताचा खरा प्रकार समजला, दत्त महाराजांची आज्ञा लाक्षात घेऊन त्यांनी त्या ब्राह्मणाला खालच्या अंगास आंघोळ करण्यास परवानगी दिली, आंघोळ करताच त्या ब्राह्मणाचे कुष्ठ गेले आणि तो महाराजांना नमस्कार करून निघून गेला, नारायण स्वामी महाराजानी वर येत काही विचार केला आणि दंडाला परशु मुद्रा बांधून त्यांनी निघण्याची तयारी केली,  निघताना दत्त पादुकांना वंदन करून निघावे म्हणून ते खाली वंदन करण्यासाठी आले. खाली दत्त पादुकांना वंदन करताच पादुकांजवळून नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बाहेर आले आणि म्हणाले स्वामीजी दंडाला परशु मुद्रा दिसते आहे, कोठे निघालात? नारायण स्वामी महाराज म्हणाले, आपण उपाधी देता त्यामुळे जातो आहे, तेव्हा हसून नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणाले, नाही देणार उपाधी, जाऊ नका! बेत रहित करून नारायण स्वामी महाराज वर आले हे अध्याहृत आहेच.

नृसिंह सरस्वती अतिप्रिय धन्य नारायण यतिराय!

(श्री रोहन उपळेकर यांचे लेखणीतून)

चैत्र अमावास्या, श्रीदत्तप्रभूंची राजधानी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील अग्रपूजेचा मान असलेल्या प. प. श्री. नारायणस्वामी महाराजांचा वैकुंठगमन दिन. 

जगदगुरु श्री तुकाराम महाराजांप्रमाणेच, साक्षात वैकुंठाला गेलेले हे दुसरे विभूतिमत्व होय. ही घटना फार जुनी नाही, इ. स. १८०५ मध्ये घडलेली आहे. या प्रसंगाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे शिष्य श्री. गोपाळस्वामी यांनी त्याचे वर्णन करणारे पद रचलेले आहे. ते "सांगावे, कवणा ठाया जावे |" हे पद श्रीदत्त संप्रदायात विनवणीचे पद म्हणून दररोज आवर्जून म्हटले जाते. तसेच वाडीलाही पालखीसेवेच्या समाप्तीला म्हटले जाते. 

प. प. श्री. नारायणस्वामींवर भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे अपार प्रेम होते. पूर्वाश्रमी श्री. नारायणशास्त्रींची पत्नी निवर्तली होती, त्यांना दोन लहान मुली होत्या. एकदा त्यांनी रात्री मुलींना जेऊ घालून झोपवले व स्वत: समाधी लावून बसले. नेमके त्या मुलींना संडास लागल्याने जाग आली. त्यांनी बाबांना हाक मारली, पण ते तर समाधीत होते. त्यांना ऐकू जाण्याचा प्रश्नच नव्हता. पण भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज चटकन श्री. नारायणशास्त्रींचे रूप घेऊन आले व त्या दोघींना परसाकडेला घेऊन गेले. त्यांची स्वहस्ते शुद्धी केली व पुन्हा आणून झोपवले. सकाळी हा प्रसंग श्री. नारायणशास्त्रींना कळला. प्रत्यक्ष देवांना आपल्यासाठी असे हीन कृत्य करावे लागले, याचे त्यांना अतीव वाईट वाटले. त्यांनी लवकरच आपल्या मुलींना योग्य वर शोधून त्यांची लग्ने लावून दिली व सदगुरुसेवेसाठी मोकळे झाले. त्यांचे कोल्हापूर परिसरात भरपूर वास्तव्य व लीला झालेल्या आहेत.

वाडीला एके दिवशी ते कृष्णेत स्नानाला गेलेले असताना अदभुत घटना घडली. प्रत्यक्ष भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा नदीच्या पात्रातच त्यांना संन्यास दीक्षा दिली. ते नदीत स्नानाला उतरले नारायणशास्त्री म्हणून, पण डोहातून बाहेर आले ते भगवी छाटी घालून व हाती दंड कमंडलू घेऊनच. त्यांनी दुर्गमानगडावर वाघाच्या पायातील काटा काढून त्याला दु:खमुक्त केले होते. त्या भयानक जनावराने गायीसारखे प्रेमळ होऊन त्यांच्याकडून सेवा करून घेतली. दक्षिणेतील साक्षात् शिवावतार श्री. चिदंबर महास्वामींचाही प. प. श्री. नारायणस्वामींवर लोभ होता. तीन महिने त्यांनी स्वामींना आपल्यापाशी ठेवून घेतले होते. त्यांच्या चरित्रातील असे सगळेच प्रसंग अत्यंत भावपूर्ण आणि हृद्य आहेत. योगिराज सदगुरु श्री. वामनरावजी गुळवणी महाराजांच्या घराण्यावर या प. प. श्री. नारायणस्वामींचीच परमकृपा होती. त्यांच्या कृपेनेच गुळवणी वंश चालला व त्यात पुढे श्रीमहाराजांचा जन्म झाला. प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी बारा संस्कृत श्लोकांमधून प. प. श्री. नारायणस्वामींचे चरित्र गायलेले आहे. 

प. प. श्री. नारायणस्वामींचे चरित्र अलौकिक असून प्रासादिकही आहे. सदर ग्रंथ श्री. गुळवणी महाराजांचे शिष्य वै. रामकवींनी रचलेला असून तो पुण्याच्या श्रीवामनराज प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेला आहे. या पंधरा अध्यायी छोटेखानी पोथीमध्ये महाराजांच्या सर्व लीलांचे वर्णन आलेले आहे. योगिराज श्री. गुळवणी महाराजांचे आशीर्वाद लाभलेली ही पोथी प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज अनेक भक्तांना अडीअडचणींमध्ये आवर्जून वाचायला सांगत असत व त्याचे अदभुत अनुभवही लोकांना येत असत.

आज श्रीनृसिंहवाडी येथे श्री नारायणस्वामींचा आराधना उत्सव संपन्न होत असतो. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे त्यांच्यावर इतके प्रेम होते की, आजही श्री मनोहर पादुकांच्या पूजेपूर्वी प. प. श्री. नारायणस्वामींची पूजा होत असते. तसेच देवांची स्वारी (उत्सवमूर्ती) देखील एरवी प. प. श्री. नारायणस्वामींच्याच ओवरीत विराजमान असते. देवांनाही आपल्या या अनन्य भक्ताचा विरह क्षणभर देखील सहन होत नसावा.

एकदा भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी एका कुष्ठरोग झालेल्या माणसाला स्वप्नात जाऊन सांगितले की, "तू नारायणस्वामींच्या अंगावरून येणाऱ्या पाण्यात स्नान कर, तुझे कुष्ठ जाईल." तो आनंदाने दुसऱ्या दिवशी पहाटे कृष्णेच्या काठी जाऊन वाट बघत बसला. तेवढ्या पहाटे त्याला तिथे पाहून नारायणस्वामींनी त्याला विचारले. त्याने सगळे सरळ मनाने सांगून टाकले. देवांचीच आज्ञा म्हणून नारायणस्वामींनी त्याला आपल्या खालच्या बाजूला स्नान करू दिले. त्याचे कुष्ठही त्यामुळे गेले. कोणाला हे कळू नये म्हणून त्याला त्यांनी सूर्योदयापूर्वी गाव सोडायलाही सांगितले. नंतर नारायणस्वामी आपले स्नान झाल्यावर मनोहर पादुकांसमोर आले खरे, पण त्यांनी दंडाला मुद्रा बांधायला सुरुवात केली. त्याचा अर्थ आता ते तिथून निघून जाणार, असाच होता. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्यांना विचारले, "काय कारण आज मुद्रा बांधायचे?" त्यावर कृतक कोपाने नारायणस्वामी उत्तरले, "आपल्याला आम्ही नकोसे झालेलो आहोत, म्हणून असल्या उपाधी मागे लावायला सुरू केलेले दिसते. तेव्हा आता आम्ही वाडी सोडून जात आहोत." त्यांचे हे उत्तर ऐकून श्री नृसिंह सरस्वती स्वामी म्हणाले, "अहो, असे काय करता? तुम्ही गेल्यावर आम्हांला करमेल का? बरे, नाही लावणार उपाधी काही तुमच्या मागे, पण वाडी सोडून जाऊ नका." देवांचे नारायणस्वामींवर इतके प्रचंड प्रेम होते की, देवांनी सुद्धा त्यांच्या इच्छेसमोर हार मानली. देव-भक्ताचे हे जगावेगळे नाते आपल्या मानवी कल्पनेत बसणारे नाहीच.

प. प. श्रीनारायण स्वामी महाराजांचे अनेक शिष्य विख्यात झाले. त्यात श्री. गोपाळस्वामी, श्री. अच्युतस्वामी व श्री. कृष्णानंद स्वामी (काशीकर स्वामी) हे तीन संन्यासी शिष्य व 'गुरुभक्त' नावाने रचना करणारे श्री. ढोबळे पुजारी हे गृहस्थाश्रमी शिष्य मोठे अधिकारी होते. श्री. गुरुभक्तांच्याच अनेक रचना वाडीला काकड्यापासून शेजारतीपर्यंत म्हटल्या जातात. "दत्तात्रेया तव शरणम् |" व "सावळा सदगुरु तारू मोठा रे |" अशा श्री. गुरुभक्तांच्या काही सुप्रसिद्ध रचना अनेकांच्या नित्यपठणात आहेत. आजच्या पावन आराधना दिनी, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे लाडके शिष्योत्तम प. प. श्री. नारायणस्वामी महाराजांच्या श्रीचरणीं सादर दंडवत प्रणाम.

नारायणस्वामी ! एक सिद्ध दत्तभक्त

(समाधी सन- १८०५)
श्रीनारायणस्वामी-पूर्वाश्रमात विसापूर ग्रामनिवासी गार्ग्यगोत्री ऋग्वेदी देशस्थ महाराष्ट्र ब्राह्मण, उपनाव जोशी. पूर्ववयात विद्या व सदाचारसंपन्न असल्याने त्या प्रांतात विद्वन्मान्य होते. पहिली पत्नी परलोकवासी झाल्यावर कोल्हापूर प्रांतातील तारळे गावातील श्री. रामदीक्षित गुळवणी यांच्या कन्येबरोबर त्यांचा दुसरा विवाह झाला व त्यांना विश्वंभर नावाचा पुत्र झाला. याप्रमाणे सुखाने त्यांचा संसार चालला होता. एकदा पुण्यात विद्वत्सभेत शास्त्रार्थात त्यांचा पराभव झाल्याने त्यांना अत्यंत खिन्नता प्राप्त झाली. पुन: शास्त्रात असा पराभव न व्हावा म्हणून अधिक अध्ययन करण्याकरता घरदार सोडून ते काशीला गेले व त्या ठिकाणी चांगल्या गुरूच्या जवळ राहून गुरूंची उत्तम सेवा करून सर्व शास्त्रांत पारंगत झाले.

श्रीनारायणस्वामींचा शास्त्राध्ययन करण्याचा उद्देश गुरुंनी ओळखून त्यांच्याजवळ ‘वादामध्ये कोणाचाही पराभव करणार नाही’ अशी गुरुदक्षिणा मागितली. ती आज्ञा मान्य करून श्रीनारायणस्वामी आपल्या गावी परत आले. त्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या व काही वर्षांनी पत्नी स्वर्गवासी झाली. पुत्राला विद्याभ्यासासाठी पुण्याला ठेवून आपल्या दोन मुलींसह कोल्हापूरला श्रीजगदंबेच्या सेवेला ते राहिले. भगवतीने संतुष्ट होऊन त्यांना नरसोबाच्या वाडीला जाऊन श्रीदत्ताची आराधना करण्याची आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणे श्रीकृष्णपंचगंगेच्या संगमावरील श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडीत मुलींसह राहून श्रीदत्ताची उपासना करू लागले.

‘ईश्वरप्रणिधानाद्वा’ या भगवान् पतंजलीच्या वचनाला सत्य करण्यासाठी भगवान् द्त्तात्रेयांनी त्यांच्यावर अनुग्रह केला व त्यांना समाधिसिद्धी प्राप्त झाली. निरंतर ईश्वरचिंतन केल्याने ईश्वर संतुष्ट होतो व त्याच्या अनुग्रहाने समाधी सिद्धी होते. याप्रमाणे नित्य श्रीनारायणस्वामींचा समाधिअभ्यास चालला असता एके दिवशी पहाटे श्रीनारायणस्वामी नित्याप्रमाणे समाधी लावून बसले. त्यादिवशी मुलींना रोजच्या वेळेच्या पूर्वी जाग आली व शौचाला जाण्याकरता मुली वडिलांना हाका मारू लागल्या. श्रीनारायणस्वामींचा समाधिभंग होईल म्हणून श्रीदत्तांनी श्रीनारायणस्वामींचे रूप घेऊन, मुलींना बाहेर नेऊन त्यांचा विधी उरकून, त्यांना अंथरूणावर झोपवून, श्रीनारायणस्वामी समाधीतून उठण्यापूर्वी श्रीदत्तात्रेय अदृश्य झाले.

नित्याप्रमाणे समाधीतून उठल्यावर श्रीनारायणस्वामींनी मुलींना शौचाला जाण्याकरता उठविले तेव्हा मुली म्हणाल्या, “तुम्ही आम्हांला आताच शौचाला नेऊन आणले आणि पुन: कशाला जागे केले?’ मुलींनी शौचाला गेलेली ती जागा दाखविल्यावर ती गोष्ट सत्य असल्याची त्यांची खात्री झाली व आपली समाधी भंग होऊ नये म्हणून प्रभूंनीच हे कृत्य केले असे समजून त्यांना अत्यंत दु:ख झाले. देवाकडून अशी सेवा घेणे अनुचित समजून एका मुलीला कोल्हापूर प्रांतातील सोळांकूर या गावी व दुसर्या मुलीला त्याच प्रांतातील कापसी या गावी योग्य वरांना देऊन आपण विरक्त होऊन पुन: पूर्वीप्रमाणे ते उपासना करू लागले.

देवाजवळ संन्यास घेण्याची इच्छा प्रकट केल्यावर योग्य वेळी संन्यास होईल असे देवाचे सांगणे झाले. श्रीनारायणस्वामी नित्य पहाटे संगमावर स्नानाला जात असत. एके दिवशी नित्याप्रमाणे स्नानाला गेले असता पाय घसरून पाण्यात गेले. त्या ठिकाणी श्रीदत्त भगवान श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी असून संन्यासाची सर्व तयारी पाहून चकित झाले. श्रीनृसिंहसरस्वतींनी स्वत: प्रणवोच्चारपूर्वक सर्व संन्यासविधी यथाशास्त्र करून त्यांना दंड दिला व श्रीनारायणसरस्वती असे नाव ठेवले. हा सर्व विधी झाल्यावर ज्या ठिकाणी ते पाण्यात गेले होते तेथूनच दंडकमंडलूसह संन्यासीवेषात बाहेर आले.

त्यांना संन्यासीवेषात पाहून तेथील मठातील महंताना वाटले की, गुरुशिवाय याने स्वत:च संन्यास घेतला आहे. हा भ्रष्ट आहे असे समजून त्यांच्यावर बहिष्कार घातला. श्रीनारायणस्वामी आपल्या खोलीचे दार बंद करून बसत असत. बाहेरून कोणी भक्ताने नमस्कार केल्यास आतून ‘नारायण’ असा शब्द येत असे. ते पाहून हा काय प्रकार आहे हे पाहण्याकरता एके दिवशी रात्री मठाधिपती नारायणस्वामींच्या खोलीच्या दाराच्या छिद्रातून पाहू लागले. त्या दिवशी शनिवार असल्याने श्रीनारायणस्वामी डोळे मिटून प्रेमाने नृसिंहाचे भजन करीत होते; व एक मोठा सिंह त्यांच्या समोर बसलेला आहे असे त्यांना दिसले. 

ते पाहून श्रीनारायणस्वामींचा अधिकार फार मोठा आहे असे वाटून ते नारायणस्वामींना शरण गेले व ‘आपला अधिकार न समजल्यामुळे मी आपणाला भ्रष्ट समजलो’ असे म्हणाले. तेव्हा नारायणस्वामींनी त्यांना आपल्या संन्यासाची सर्व हकीगत सांगितली. मठाधिपती त्यांचे शिष्य झाले व कृतकृत्य झाले. श्रीनारायणस्वामी शालिवाहन शके १७२७ चैत्र वद्य अमावस्येला नरसोबाच्या वाडीत समाधिस्थ झाले. त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव चैत्र महिन्यात अद्याप त्यांचे वंशज नरसोबाच्या वाडीला येऊन करीत असतात.
परमेश्वराच्या सगुणरूपाची उपासना करून हल्लींच्या कालातही ईश्वरप्रसादाने उपासकाला ब्रह्मसाक्षात्कार होऊन तो जीवन्मुक्त होतो हे सांगण्याकरता श्रीवासुदेवानंदसरस्वतींनी आपल्या युवशिक्षेच्या शेवटी श्रीनारायणस्वामींचे संक्षिप्त चरित्र वर्णन केले आहे.

नारायणस्वामी महाराजांना श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराजांनी सन्यास दीक्षा दिली आणि संन्याशी स्वरूपात दंडकमंडलु, काषायवस्त्रादि शोभायमान असे स्वामी महाराज गुरुपादुकांच्या दर्शनार्थ मंडपात आले. पाण्याखालील सन्यास दीक्षेची अलौकिक घटना माहीत नसल्याने या वेशात पाहून सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले. आपण सन्यास कोठे घेतला? केव्हा घेतला? आपले गुरु कोण? आदी प्रश्न सर्व जण विचारू लागले. भगवंतांनी केलेली लीला गुप्त ठेवण्याकरिता खेरीज आपली प्रसिद्धी, प्रतिष्ठा मुळीच न व्हावी या करिता नारायण स्वामी महाराजांनी कोणालाही उत्तर दिले नाही.

त्या काळी नृसिंहवाडीत कोणी एक मठाधिपती राहत होते. या मठाधिपतींच्या प्रेरणेने सर्व म्हणू लागले कि आमच्या प्रश्नांची उत्तरे आपण देत नाही तेव्हा आपले वर्तन धर्मशास्त्राविरुद्ध आहे असे मानून आपणावर बहिष्कार घालू. यावर काही प्रतिक्रिया न देता मौन धारण करून नारायण स्वामी महाराज वर आपल्या मठात आले.

नृसिंहवाडीतील सर्वांच्या बहिष्कारामुळे नारायणस्वामी महाराजांचा नित्यक्रम खंडित झाला. या नित्यक्रमात प्रातःकाळी गुरुपादुकांवर कृष्णाजल घालणे, पूजा, प्रदक्षिणा आदी सेवा होत्या. उपासनेत प्रतिबंध आल्याने अतिशय वाईट वाटले तरी नारायणस्वामी महाराजांनी दत्त महाराजांची इच्छा असे मानून आपल्या मठाचे दार लावून एकांतात भगवद्भजन सुरु केले. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराजांचे नारायण स्वामी महाराजांवर इतके प्रेम होते कि नारायण स्वामी महाराज खाली दर्शनास / भेटीस येत नाहीत असे दिसताच श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराजांनी भल्या मोठ्या सिंहाचे रूप घेतले आणि ते नारायण स्वामीमहाराजांचे भजन ऐकायला मठात येऊन बसू लागले.

एकदा तेथील मठाधिपती उत्सुकतेने नारायण स्वामी महाराज एकांतात काय करतात हे पाहण्यासाठी दाराच्या फटीतून पाहू लागले तेव्हा तेथील भल्या मोठ्या सिंहाचे भजन ऐकणारे रूप पाहून त्यांची गाळण उडाली. सर्व प्रकार लक्षात येऊन या मठाधिपतीना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी नारायण स्वामी महाराजांची क्षमा मागितली, शिष्यत्व स्वीकारले.