श्री क्षेत्र कुरवपूर (कुरगड्डी)

स्थान: आंध्र प्रदेशात कृष्णा स्टेशन पासून २७ कि. मी. अंतरावर बेट 
सत्पुरूष: श्रीपादश्रीवल्लभ 
विशेष: तपोभूमी, ध्यानधारणा, उपासनेसाठी उत्तम ठिकाण    
पादुका: श्रीपाद श्रीवल्लभ पादुका

श्रीक्षेत्र कुरवपूर - श्रीपाद मंदिर महाद्वार
श्रीक्षेत्र कुरवपूर - श्रीपाद मंदिर महाद्वार

उपासनेच्या माध्यमातून आत्मिक बळ मिळवून मानवी जीवनातील कर्तव्ये पूर्ण करत परमेश्वराची प्राप्ती करणे हा दत्त उपासनेचा मार्ग आहे. महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा सर्वाधिक प्रसार झाला. या कारणास्तव महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध दत्तस्थाने आहेत. दत्त उपासनेला श्री नृसिंहसरस्वतींमुळे दत्त संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात. ‘कुरवपूर’ हे त्यांचे अक्षय निवासस्थान होय.

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’

या मंत्राचा उच्चार होताक्षणी नजरेसमोर येते ते ‘श्री क्षेत्र कुरवपूर’ या मंत्राचा उगम ज्या ठिकाणी झाला तेच ते प्राचीन स्थान. ही तपोभूमी मानली जाते.

दत्तभक्तांचा वेद समजला जाणाऱ्या ‘गुरूचरित्र’ या मंत्र ग्रंथांतील अध्याय ५ ते १० हे प्रथम दत्तावतार यांच्याविषयी आहेत. भगवान दत्तात्रेय यांनी सुमती व आपलराज यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या पोटी जो प्रथमावतार संपन्न केला ते श्रीपादवल्लभ होय. वयाच्या सोळाव्या वर्षी माता-पित्यांचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वरला गेले व तेथून श्रीशैल पर्वतावर जाऊन तेथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले. नंतर फिरत फिरत ते कुरवपूर येथे आले. तेथे बावीस वर्षे तपश्चर्या करून इथूनच ते अंतर्धान पावले.

कुरवपूर क्षेत्र स्वातंत्र्यापूर्वी निजाम राज्यात होते. सध्या ते कर्नाटकात रायचूर जिल्ह्यात येते. कुरूगुड्डी या छोट्या खेडयाजवळ कृष्णा नदीचे नैसर्गिकरीत्या दोन भाग झाले आहेत व पुढे ते दोन भाग एकत्र आले आहेत. जेथे कृष्णेचे दोन भागात विभाजन झाले आहे त्या भागाला ‘कुरगुड्डी बेट’ म्हणतात. हेच ते श्रीपाद श्रीवल्लभांचे स्थान. याच बेटावर दगडांच्या गुहेत श्रीपाद श्रीवल्लभ तपश्चर्या करीत व या गुहेसमोरील मोठया औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीत. बेटावरील दोन-चार घरी माधुकरी मागून ते निर्वाह करीत.

श्रीपद मंदिर - कुरवपूर
श्रीपद मंदिर - कुरवपूर

सकाळी उठल्यावर नदीवर स्नान करून, ते सूर्यनमस्कार घालीत. ते ज्या शिळेवर उभे राहून सूर्यनमस्कार घालीत त्या वेळेची त्यांची शिळेवर पडणारी छाया अजूनही स्पष्ट दिसते. त्यांच्या पावलांच्या खुणाही त्या शिळेवर दिसतात. हा परिसर मोठा रम्य आहे. पादुका, मंदिर, आजूबाजूची वनश्री हे सर्व मन प्रसन्न करणारे, त्याचप्रमाणे अंतर्मुख करणारे आहे. कुरवपूर हे स्थान कित्येक वर्षे अज्ञातच होते;  पण श्रीगुरूंच्या शोधात आलेल्या श्री वासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराज यांनी या स्थानाचा शोध लावला. कुरवपूर हे आंध्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरील रायचूर जिल्ह्यातील एक खेडे आहे. चारी बाजूंनी कृष्णामाईच्या प्रवाहांनी वेढलेले हे बेट आहे. पावसाळ्यात कृष्णामाईच्या पुरामुळे आणि उन्हाळयात न सोसणा-या  कडक उन्हामुळे इथे जाणे त्रासदायक होते. डिसेंबर ते फेब्रुवारी हे तीनच महिने इथे प्रवासाला सुखकारक असतात.

‘आश्विन वद्य व्दादशी’ हा श्रीपाद श्रीवल्लभांचा तिरोहित होण्याचा म्हणजेच निजानंदगमनाचा दिवस. या दिवशी कुरवपूरला मोठा उत्सव असतो.

रायचूरपासून २९ कि. मीटरवरील ‘आतकूर’ या गावी जाऊन तेथून कुरवपूर बेटावर जाण्यासाठी थोडे चालत कृष्णेच्या काठावर जावे लागते. पलीकडे जाण्यासाठी आता नावेची सोय झाली आहे. कृष्णा नदी पार करण्याचा अनुभव प्रत्येक मोसमात वेगळा असतो.

नदीच्या पात्रात सभोवार अजस्त्र शिळा आहेत. एकामागून एक असे चार प्रवाह ओलांडून आपण पैलतीरी जातो. समोर थेट कुरवपूर गावच्या बुरूजानजीकच्या वेशीवरून पायवाटेने पश्चिमेस डाव्या हाताने आत शेतीच्या बांधावरून थेट श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिरात पूर्व दरवाजाजवळ आपण पोहोचतो. हे बेट साधारण तीन मैल लांब, तीन फर्लांग रूंद असे असून कूर्माकार आहे. बेटावर पुढील स्थळे पाहण्यासारखी आहेत.

श्रीपाद श्रीवल्लभ पादुका - कुरवपूर
श्रीपाद श्रीवल्लभ पादुका - कुरवपूर

श्रीपाद मंदिर

श्रींचे मंदिर ऐसपैस आहे. मंदिराच्या भव्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन दगडी कट्टे आहेत. त्याच्या शेजारी दगडी भिंती आहेत. महाव्दारावर कमान आहे. तिथे वाकून नम्रपणे हस्तस्पर्श करून आत गेल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांना बसण्याकरता दोन देवडया आहेत. भव्य अश्वत्थ (पिंपळ), कडुनिंब वृक्ष असून, त्यांना दगडी पार बांधला आहे. पाराच्या उत्तर बाजूच्या दोन्ही कोपऱ्यांवर घडीव दगडी वृंदावने आहेत. या पारावर दक्षिणाभिमुख दोन मंदिरे असून, एका मंदिरात दक्षिणाभिमुख काळ्या शाळिग्राम शिळेची मारूतीची रेखीव मूर्ती आहे व दुसऱ्या मंदिरात केशवमूर्ती आणि शिवलिंग पादुका आहेत. या पारासमोरच मुख्य पूजास्थान असून, तेथेच श्रीपाद श्रीवल्लभ जप-तप-अनुष्ठानादी कर्मे करत असत. यालाच ‘निर्गुण पीठ’ पार म्हणतात. स्वत: महाराज त्या ठिकाणी अदृश्य असल्यामुळे निराळ्या स्वरूपात पादुका नाहीत. याच ठिकाणी दिव्य अनुभव मिळतात. अर्थात त्यासाठी तेवढी साधना आवश्यक आहे.

पुरातन वटवृक्ष

श्रीपदश्रीवालभ कुरवपूर
श्रीपदश्रीवालभ मूर्ती - कुरवपूर

श्री श्रीपादवल्लभांची अनुष्ठानाची जागा : सदर वृक्ष साधारणपणे ९०० वर्षांपूर्वीचा आहे. याचेच ढोलीमध्ये मोठा सर्प आहे. याच ठिकाणी सोलापूरच्या भक्तमंडळींनी श्रीपादवल्लभाची मूर्ती व पादुका स्थापन केल्या आहेत.

श्री टेंबेस्वामी गुहा

ही गुहा निसर्गनिर्मित असून प्राचीन आहे. या ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी १९१० मध्ये चातुर्थाश्रमीय चातुर्मास संपन्न केला. आता या ठिकाणी बांधकाम होऊन शिवमंदिर बांधले आहे.

या ठिकाणी टेंबे स्वामी महाराजांनी प्रत्येक संकटावर रामबाण उपाय असलेल्या घोरकष्टोधरण स्तोत्राची रचना केली.

महाराज येथे तपश्चर्येला बसत. रांगत रांगत आत जाता येईल एवढी चिंचोळी वाट आहे. आतमध्ये केवळ एक माणूस बसु शकेल एवढी या गुहेची उंची व जागा आहे. फारशी गर्दी व मनुष्य स्पर्श न लाभलेल्या कुरवपुरच्या वातावरणात एक पवित्र्य आणि चैतन्य भरलेले आहे. ते तिथे जाणवतेच.

कुरवपूर (जि. रायचूर) कर्नाटक हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे. या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे. या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले. श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला. याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे. याच ठिकाणी श्री पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला.

पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे. या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे. स्वत:च्या गाडीने कुरवपूरला जाणा-यांसाठी या आश्रमात गाडी पार्किंगची व्यवस्था आहे. वल्लभपूरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे. याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्यनमस्कार घालण्यासाठी येत असत. याच्या खुणा आजही पाहावयास मिळतात.

औदुंबर वृक्ष 

या बेटावर असणारा औदुंबराचा वृक्ष अत्यंत डौलदार आहे. याठिकाणी पारायण करण्यासाठी कट्टा बांधला आहे. या ठिकाणी काम करणारे पुजारी व त्यांचे कुटुंबीय येथे येणाऱ्या यात्रेकरूंची राहण्याची, जेवण्याची, चहापाण्याची इ. सोय नाममात्र खर्च घेऊन करतात. सदर बेटावर दुसरे व्यावहारिक साधन नसल्याने हे संपूर्ण बेट म्हणजे एक तपोभूमीच आहे. मनापासून ज्यांना श्री गुरूदत्तांची सेवा, पारायण, जप, अनुष्ठान करावयाचे आहे. त्यांच्यासाठी ही स्वर्गभूमीच आहे. कुणाचाही त्रास नाही. स्पीकर, रेडिओ, टीव्ही यांचा व्यत्यय नाही फक्त एकांतच. केवळ सांगून, वाचून अथवा ऐकून या स्थानाचे महत्व कळणारे नाही. जशी साखर किती गोड आहे ते ती खाल्ल्याशिवाय समजत नाही.

श्रीपद श्रीवल्लभ उत्सव मूर्ती - कुरवपूर
श्रीपाद श्रीवल्लभ पादुका - कुरवपूर

सदर क्षेत्र हे अनेक महात्मे येथे येऊन गेल्याने अतिशय पावन झाले आहे. श्री टेंबेस्वामी, श्री श्रीधरस्वामी, श्री नानामहाराज तराणेकर, श्री पोखरापूरकर महाराज, श्री गुळवणीमहाराज, श्री कवीश्वर, श्री मामादेशपांडे,  इ. तपस्वी व्यक्तींनी या ठिकाणी मुक्काम केला आहे.

येथील कृष्णा नदीच्या विस्तीर्ण पात्रात अनेक शिळा आहेत. असे वाटते की, पूर्वीची ऋषिमंडळी ध्यानमग्न होऊन शिळेच्या रूपाने येथे बसली आहेत. आपल्याकडे एक प्रथा आहे. देवदर्शन हात, पाय धुतल्याशिवाय घेऊ नये. या ठिकाणी मंदिरात पाय धुतल्याशिवाय प्रवेशच मिळतच नाही. येथील कृष्णा नदीच्या पात्रात पाय टाकल्यावर साऱ्या जगाचा विसर पडतो, दृष्टीस पडते ते फक्त श्रीपाद मंदिर. 

श्री गुरुचरित्रातील कुरवपूर माहात्म्य

श्री गुरुचरित्राच्या १० व्या अध्यायात त्यांच्या प्रिय शिष्य नवस फेडण्यासाठी कुरवपूरला जात असताना वाटेत चोरांनी अडवून त्याची हत्या केली. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी अवतार संपल्यानंतर हि आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तिथे प्रकटले व आपल्या शिष्य वल्लभेषला परत जिवंत केले. अशी हि श्रीपाद श्रीवल्लभ व त्याचा निस्सम भक्त वल्लभेष या गुरु-शिष्याची कथा आहे. हि घटना घडली ते ठिकाण म्हणजे मंथनगड आहे. हे क्षेत्र कुरवपूर पासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. आज त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचे मंदिर आहे.

श्रीपाद श्रीवल्लभ व त्यांचा निस्सम भक्त वल्लभेष या गुरु-शिष्याची कथा 

सिद्ध्योग्यांचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले, "कुरवपुराचे माहात्म्य कशाप्रकारे झाले ? आपण म्हणता, श्रीपाद श्रीवल्लभ कोठेही गेले नाहीत. ते कुरवपुरात सूक्ष्मरूपाने कायमचे राहिलेले आहेत. पण पुढे असेही सांगता की, श्रीदत्तात्रेयांचे अनेक अवतार झाले हे कसे काय? "नामधारकाने असे विचारले असता सिद्ध म्हणाले, "अरे, श्रीगुरुंचे माहात्म्य काय विचारतोस ? ते सांगण्याच्या पलीकडे आहे. अरे, श्रीगुरुदत्तात्रेय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत. ते कुरवपुरक्षेत्रात राहत असले तरी ते जगदोद्धारासाठी अनंत अवतार घेतात. भार्गव राम म्हणजे परशुराम आजही गुप्तरूपाने आहेतच. त्यांचेच पुढे श्रीरामादी अवतार झाले. भगवान विष्णू क्षीरसागरात आहेत. तरीही त्यांनी कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुला माहित आहे ना ? सृष्टिक्रम अव्याहत परब्रम्हस्वरूप श्रीदत्तात्रेय एका स्थानी कायम राहूनही कोठेही अवतार घेतात. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात गुप्तपणे राहत असे तरी त्यांनी आपल्या योगबळाने विविधकाळी अवतार घेतले हे लक्षात घे. गुरुभक्ती व्यर्थ जात नाही. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात. जे खरे भक्त असतात, त्यांची ते कधीही उपेक्षा करत नाही. भक्ताने हाक मारताच त्याच्यासाठी धावून जातात. श्रीगुरू कसे भक्तवत्सल असतात, ते भक्तासाठी कसे प्रकट होतात याविषयी मी तुला एक कथा सांगतो.

कुरवपूर माहात्म्य
गुरुचरित्र अध्याय १० मधील संकट दूर करणारा प्रसंग

पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक ब्राम्हण होता. तो अत्यंत सदाचारसंपन्न, सुशील असा होता. तो दरवर्षी नित्यनेमाने कुरवपुरास श्रीगुरुंच्या दर्शनासाठी येत असे. त्यांची श्रीगुरुंवर नितांत श्रद्धा, भक्ती होती. एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला, "जात व्यापारात चांगला फायदा झाला तर मी कुरवपुर यात्रेत जैन व एक सहस्त्र ब्राम्हणांना इच्छाभोजन देईन." असा निश्चय करून मनोमन श्रीगुरुंचे स्मरण करीत व्यापारास गेला. त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला. त्याला अतिशय आनंद झाला. तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्रीगुरुंचे नामस्मरण करीत कुरवपुरास निघाला. काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरविले. अत्यंत सभ्य माणसाचे कपडे घातलेले ते चोर 'आम्हीही श्रीपादयतींच्या दर्शनासाठी निघालो आहोत.' अशी थाप मारून त्याच्या बरोबर जाऊ लागले. कुरवपुराजवळ येण्यापुर्वीच रात्रीच्यावेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश ब्राम्हणाचा शिरच्छेद करून त्याच्याजवळचे द्रव्य लुबाडले.

त्याचक्षणी भक्तांचे कैवारी, कुरवपुरवासी श्रीगुरू श्रीपाद धिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूल व दुसऱ्या हातात खड्ग घेऊन चोरांच्या पुढे प्रकट झाले. त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले. परंतु श्रीगुरू श्रीपादांना पाहताचक्षणी त्यातील एक चोर पळाला होता. तो नंतर त्यांच्यापुढे आला आणि हात जोडून म्हणाला, "हे कृपावंत, जगन्नाथा, मी निरपराधी आहे. हे माझ्याबरोबर असेलेल या ब्राम्हणाला मारतील याची मला कल्पना नव्हती, मी केवळ यांच्याबरोबर प्रवास करीत होतो इतकेच. आपण सर्वज्ञ आहात. माझे अंत:करण आपणास समजते."

श्रीपाद श्रीवल्लभ पालखी सोहळा, कुरवपूर
श्रीपाद श्रीवल्लभ पालखी सोहळा, कुरवपूर

हे ऐकून श्रीपादयतींनी त्याला जवळ बोलाविले. त्याच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले, "हि विभूती या मृत झालेल्या ब्राम्हणावर टाक." मग त्या ब्राम्हणाचे मस्तक त्याच्या धडावर चिकटवले व मंत्र म्हणून सर्व अंगावर विभूती लावली. त्याचक्षणी तो ब्राम्हण जिवंत होऊन इकडे-तिकडे पाहू लागला. इतक्यात सूर्योदय झाला. श्रीपादयती एकाएकी अदृश्य झाले. तो एकटा सहप्रवासी तेथे होता. इतरांचे देह तेथे पडले होते. ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राम्हणाने विचारले, "या माणसांना कोणी मारले ?" त्यावर तो सहप्रवासी म्हणाला, "हे सगळे चोर होते. त्यांनी तुला ठार मारून तुझ्याजवळचे धन लुबाडले होते. पण त्याचवेळी येथे एक धिप्पाड तेजस्वी सत्पुरुष आले. ते जटाधारी होते. त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते. त्यांच्या हातात त्रिशूळ व खड्ग होते. त्यांनी या चोरांचा वध केला. मी त्यांना शरण गेलो. त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून, मंत्र म्हणून तुला जिवंत केले. ते लगेच अदृश्य झाले. त्यांनीच तुझे रक्षण केले. ते भगवान शंकर असावेत असे माला वाटते." वल्लभेश ब्राम्हणाने हे ऐकले. त्याच्याबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते. हे पाहून त्याची खात्रीच पटली. मग तो ते सगळे धन घेऊन कुरवपुरास गेला. त्याने श्रीगुरूंची मनोभावे पूजा केली. मग त्याने एक हजार ब्राम्हणांना भोजन घातले. त्याने आपला नवस पूर्ण केला.

असे अनेक भक्त कुरवपुरास येतात व श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणपादुकांची मनोभावे पूजा करतात. श्रीगुरू कुरवपुरात अव्यक्तरुपात राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करीत असतात. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले. कुरवपुराचे व तेथे अदृश्य रुपात असलेल्या श्रीपाद श्रीवल्ल्भांचे महात्म्य असे आहे. यानंतर ते श्रीनृसिंहसरस्वती म्हणून अवतार घेतील व आपले विलक्षण चरित्र दाखवतील." सरस्वती गंगाधर सांगतात." श्रोते हो ! आता श्रीगुरूंची पुढील चरित्रकथा लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे सर्व मनोरथ सिद्धीला जातील."

(इथपर्यंतचा कथेचा पूर्वार्ध सर्वज्ञात आहे परंतु यापुढील उत्तरार्ध बराचस अप्रकाशित आहे... श्रीमत् गुरुचरित्र मूळ औपनिषदीय पोथीवरून घेतला आहे.)

पूर्वी कुरवपूर येथे देवळात वरती शिवपिंड व त्याखाली गुहेमध्ये श्रींच्या पादुका होत्या. ब्राह्मण वर जाऊन दर्शन घेऊन त्वरित पादुकांचे दर्शनास खाली यावे म्हणून वरती आला, पण तिथे रुद्राभिषेक चालू झाल्यामुळे तो तिथून जाऊ शकला नाही. लक्ष सगळे पादुकांकडे लागलेले. जसजसा विलंब होऊ लागला तसतसा वल्लभेश घायकुतीला आला. विरह हृदयात सोसवेना झाला.  काय करु भगवंता? अशी स्थिती झाली!

इतक्यात अचानक त्याला समोरची भिंत पारदर्शक दिसू लागली. खाली श्रीपादुका दिसल्या व मागे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः स्थानापन्न झालेले प्रत्यक्ष दिसू लागले!!

 स्वामींचे रुप वर्णनातीत! तेजपुंज गौरवर्ण, त्यावरील रेशमी भगव्या कफनी वरून प्रकाशज्योति परावर्तित होत होत्या. गळ्यात रूद्रमाळा शोभत  होत्या. कर्णकुंडलेही रुद्राक्षांचीच. जटाभार मस्तकी रुळलेला. तोही रूद्रमाळेने बंधन केलेला. कुबडीवर विश्रामलेल्या कराकमलामधे जपमाळ सरकत होती. दुसरा कर अभय प्रदर्शक. सरळ सुंदर नासिक. स्मित-विलग झालेले पातळसे ओष्ठद्वय. त्यातून डोकावणारी शुभ्र सरल दंतपंक्ति. त्रिभूवनाचे प्रेम ओसंडून वाहणारे अत्यंत आश्वासक अर्धोन्मिलित नेत्रकमल.. माथा शोभणारी विभूति व त्रिपुंड्र. असे स्वामी पद्मासन स्थित होते. मागेपुढे भाग्यवान सेवेकरी सेवा करीत होते. काही चवर्या ढाळीत होते. आणि आश्चर्य म्हणजे त्यासर्वांमध्ये ते काही काळापूर्वी श्रींच्याच कडून गति पावलेले तस्करही श्री सेवेला उभे होते!

इथे गुरुचरित्र कथनकार क्षणभर विसंबून म्हणतात ... बघ साधका, सद्गुरूंची कृपा व कोप दोन्हीमुळे  जीवाला एकच गति प्राप्त होत असते!! 

रा.स्व.संघाचे संस्थापक पू. डॉ  केशव बळीराम हेडगेवार यांच्या वंशात काही पिढ्यांपूर्वी हा 'वल्लभेश' नावाचा दत्तगुरूंचा श्रेष्ठ भक्त होऊन गेला! प. पु हेडगेवार हेही दत्तभक्त होते.

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'कुरवपुरक्षेत्र महिमा' नावाचा दहाव्या अध्यायात आहे.

श्रीपाद श्रीवल्लभ श्रीक्षेत्र कुरवपूर
श्रीपाद श्रीवल्लभ श्रीक्षेत्र कुरवपूर

श्रीक्षेत्र कुरव पूर मध्ये काकड आरतीचे वेळी म्हणाले जाणारे पद 

उठी उठी श्री दत्तात्रेया श्रीपाद श्रीवल्लभ सदया ||धृ||
उठी उठी श्री दत्तात्रेया श्रीपाद श्रीवल्लभ सदया ||धृ||

पंच पंच उष:काळ जाहला
अरुणोदय सप्त पंच घटीला
*अष्टपंच प्राप्त काळा *
उदय पावे रवि पूत
उठी उठी श्री दत्तात्रेया
श्रीपाद श्रीवल्लभ सदया
उठी उठी श्री दत्तात्रेया ||१||

आले अमरेन्द्रादि अमर
संत साधू मुनिवर
समग्र आले नारी नर
काकडी आरती पहावया
उठी उठी श्री दत्तात्रेया
श्रीपाद श्रीवल्लभ सदया
उठी उठी श्री दत्तात्रेया ||२||

नमिता पूर्ण मनोरथ होती
त्रिविध ताप समूळ हरती
पूर्वज समस्त उद्धरती
काकड आरती देखिलिया
उठी उठी श्री दत्तात्रेया
श्रीपाद श्रीवल्लभ सदया
उठी उठी श्री दत्तात्रेया ||३||

वेगे उठता सद्गुरु मूर्ती
सकळीक पादाम्बुज वंदिती
सगुणी ध्याती ओवाळिती
विश्व-व्यापक परमात्मा
उठी उठी श्री दत्तात्रेया
श्रीपाद श्रीवल्लभ सदया
उठी उठी श्री दत्तात्रेया ||४||

गुरु त्रय मूर्ती आश्रम घेऊन
तरुवरी ब्रीद रक्षणार्थ राहून
स्मरता तारिसी जन संपूर्ण
रक्षिसी गुरुभक्त सर्वदा
उठी उठी श्री दत्तात्रेया
श्रीपाद श्रीवल्लभ सदया
उठी उठी श्री दत्तात्रेया ||५||

कुरवपूर महापूजा
कुरवपूर महापूजा 

श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्रम्

श्रीपाद वल्लभ गुरोः वदनारविन्दं
वैराग्य दीप्ति परमोज्वलमद्वितीयम् ।
मन्दस्मितं सुमधुरं करुणार्द्र नेत्रं
संसार-ताप-हरणं सततं स्मरामि ।।
श्रीपाद वल्लभ गुरोः करकल्पवृक्षं 
भक्तेष्ट - दान - निरतं रिपुसंक्षयं वै ।
संस्मरणमात्र चिति - जागरणं सुभद्रं
संसार - भीति - शमनं सततं भजामि ।।
श्रीपाद वल्लभ गुरोः परमेश्वरस्य 
योगीश्र्वरस्य शिवशक्ति समन्वितस्य ।
श्री पर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टं
त्रैलोक्य - पावन - पदाब्जमहं नमामि।।

श्रीपाद प्रभूंची आरती 

कुरवपुर क्षेत्री सायंकाळी श्रीपादांची पालखी प्रदक्षिणा झाल्या नंतर शेजारती पुर्वी होणारी ही आरती नक्कीच दुर्मिळ आहे.

श्रीपाद श्रीवल्लभ यतीवर भगवन् गुरुकिर्ते |
नाना नर सुरवर गण संस्तुत करुणामय मुर्ते |
नित्यानंद समाधी समाहित मानस परिपुर्ते |
मुनीजन मानस हंस परात्पर, मुनीजन मानस हंस परात्पर|
जय जय गुरुमुर्ते, हर हर गुरुमुर्ते |
श्रीपाद श्रीवल्लभ यतीवर भगवन् गुरुमुर्ते ||१||

स्रुष्टी स्थिती लय कारण शंकर परिपुर्ण स्फुर्ते |
चरण युगे भुसुर गण पालक दारीत आवर्ते |
दुरित विनाशक क्रुष्णा तट मठ विहरण परिपुर्ते |
कल्पतरु औदुंबरच्छाये, कल्पतरु औदुंबरच्छाये |
निविशिष्टा पुर्ते, निविशिष्टा पुर्ते ||२||

मामथी क्रुपय वनांथ जीवन भुवन व्यावर्ते |
करुणाकर मामुद्धर गतीतम् गुरुमया गर्ते |
त्वतपद् शेखर तीर्थ सतगुरु त्वतपद् व्यावर्ते |
भारतीनाथे यती प्रतिपालय, भारतीनाथे यती प्रतिपालय |
भवभय पाशहर्ते, भवभय पाशहर्ते ||३||
*श्रीपाद श्रीवल्लभ यतीवर भगवन् गुरुकिर्ते ||  

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अष्टक स्तोत्र

इंदु कोटि तेजकीर्ण सिंधुभक्त वत्सलं।
नंदनासुनंदनेंदु इंदिराक्ष श्री गुरुम्।
गंध माल्य अक्षतादि वृंद देव वंदितं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥१॥

माया पाश अंध:कार छायादूर भास्करं।
आयताक्षी पाहि श्रीयावल्ल्भेश नायकं।
सेव्य भक्ती वृंदवरद भूयो भूयो नमाम्यहं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥२॥

चित्तजादि वर्गषटक मत्तवारणां कुशं।
तत्वसार शोभीतात्म दत्त श्री वल्लभं।
उत्तमावतार भूत कर्तू भक्त श्री वत्सलं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥३॥

व्योम रवी वायु तेज भूमी कर्तुमीश्वरं।
काम क्रोध मोह रहित सोम सूर्य लोचनं।
कामितार्थ दांतभक्त कामधेनू श्री गुरुं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥४॥

पुंडरीक आयताक्ष कुंड्लेंदु तेजसं।
चंडदुरीत खंडनार्थ दंडधारी श्री गुरुं।
मंडलीक मौलीमार्तंड भासिता नं नं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥।५॥

वेदशास्त्र स्तुत्य पाद आदिमूर्ती श्री गुरुं।
नादकलातीत कल्प पाद पाय सेव्ययं।
सेव्य भक्ती वृंदवरद भूयो भूयो नमाम्य हं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥।६॥

अष्टयोग तत्वनिष्ठ तुष्ट ज्ञान नवारिधीं।
कृष्णा वेणीतीर वास पंच नद्य संगमं।
कष्ट दैन्य दूर भक्त तुष्ट काम्य दायकं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥।७॥

नारसिंह सरस्वतीश नाम अष्ट मौक्तिकं।
हार कृत्य शारदेन गंगाधराख्या स्यात्मजं।
वारुणीक देवदिक्ष गुरुमुर्ती तोषितं।
परमात्मा नंदश्रीया पुत्रपौत्र दायकं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥।८॥

नारसिंह सरस्वतीश अष्टकंच य: पठेत।
घोर संसार सिंधु तारण्याख्य साधनं।
सारज्ञान दीर्घ मायुरारोग्यादि संपदाम।
चातुर्वर्गकाम्य लोका वारंवार य: पठेत।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥।९॥

कुरवपूर येथील शिळा
कुरवपूर- श्रीपादश्रीवल्लभ कृष्णेच्या याच शिळेवर सूर्यनमस्कार घालत असत

या क्षेत्री असे जावे

कुरवपूर (जि. रायचूर) कर्नाटक (KURAVPUR)-

हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावरआहे. या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे. याक्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले. श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या अठराअक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला. याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे. याच ठिकाणी पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला. 

मुंबई, बंगलोर (व्हाया गुलबर्गा) या रेल्वेमार्गावर रायचूर हे रेल्वे स्टेशन लागते. तिथे उतरूनरायचूर बसस्थानकावरून बस मार्गाने ३० कि. मी. अंतरावर अतकूर हे गाव लागते.तिथे जवळ्च कृष्णा नदीचा तीर लागतो. होडिने १ कि. मी. प्रवास करून मंदिरापर्यंत जाता येते. दुसरा मार्ग रायचुर-हैद्राबादया बसमार्गावर मतकल नावाचे गाव लागते. तिथे उतरून रिक्षाने किंवा बसने १६ कि. मी. अंतरावर असलेल्या पंचदेव पहाड या कृष्णा नदीच्या तिरावर असलेल्या गावास जावे लागते. नंतर होडिने प्रवासकरून १ कि. मी. अंतरावर मंदिरापर्यंत पोहोचतायेते. हा मार्ग अधिक सोयीचा आहे. पंचदेव पहाड यागावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे. या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे. स्वत:च्या गाडीने कुरवपूरला जाणा~यांसाठी या आश्रमात गाडी पार्किंगची व्यवस्था आहे. वल्लभपूरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे. याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्यनमस्कार घालण्यासाठी येत असत. याच्या खुणा आजही पाहावयास मिळतात. कुरवपूरला राहण्यासाठी ३-४ खोल्या आहेत व पुजा~यांना भोजनासाठी आधी सांगावे लागते.

श्रीक्षेत्र कुरवपूर विशेष

श्रीक्षेत्र कुरवपूर हे एक प्राचीन दत्तक्षेत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रेयांचा प्रथम अवतार असे मानले जाते. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशामध्ये पीठापूर येथे झाला. वयाची सोळा वर्षे झाल्यानंतर ते पीठापूर येथून निघाले. संपूर्ण भारतभर भ्रमण करून ते कुरवपूर या ठिकाणी आले. ही त्यांची कर्मभूमी. श्रीवासुदेवानंद सरस्वती महाराजांनी या ठिकाणाचा शोध लावला. येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका असून टेंबेस्वामींची गुहा आहे. या गुहेमध्ये श्रीधर स्वामींनीदेखील वास्तव्य केले होते. कुरवपूर याच ठिकाणी टेंबेस्वामींनी घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना केली आहे.

कुरवपूर अथवा कुरुगड्डी हे रायचूर तालुक्यांतील एक खेडे कर्नाटक आणि आंध्र राज्यांच्या सीमा भागांत ज्या ठिकाणी कृष्णा-भीमा नद्यांचा संगम झाला आहे, तेथे एका बेटावर आहे. या बेटाच्या जवळ कृष्णा नदीच्या प्रवाहांत आणखी काही बेटे आहेत. उदाहरणार्थ – जितामित्रबेट, नारगड्डि (नारबेट) आणि कुरुगड्डी या प्रत्येक बेटात एक एक देवता आहेत. कुरुगड्डीच्या जवळ एक अग्रहार नावाचे जे खेडे आहे तेथे श्रीपादस्वामी राहात असत. कुरवपूर येथील एका विद्वान ब्राह्मणाच्या पोटी एक महामूर्ख मुलगा जन्मला होता, त्याला कोणतीच विद्या प्राप्त झाली नाही. वडिलांचे निधन झाल्यावर त्याची आई त्याला घेऊन आत्महत्या करायला निघाली. तेव्हा असे सांगितले जाते की श्रीपादांनी त्याच्यावर कृपा केली आणि त्याला ज्ञानसंपन्न केले.

दुसरी कथा एका धोब्याची सांगितली जाते. तो रोज न चुकता श्रीपादांना नदीवर येताना साष्टांग नमस्कार घालीत असे. असे काही वर्षे झाल्यावर एकदा स्वामी त्याला बोलले- ‘तू दररोज न चुकता संधी साधून नमस्कार करतोस; यासाठी किती तरी कष्ट घेतोस. आता सुखाने राज्य करीत राहा.’ असे म्हणून स्वामी निघून गेले. काही काळानंतर जेव्हा वसंत ऋतू आला तेव्हा त्या भागाचा म्लेंछ राजा नौकाविहारासाठी मोठय़ा थाटामाटाने आला. त्याचा डामडौल देहभान विसरून पाहणाऱ्या रजकाला स्वामी महाराजांनी विचारले, ‘हे रजका, मनात काय विचार चालले आहेत?’ धोबी म्हणाला, ‘कोणाच्या गुरूच्या कृपेने हा राजा हे सुख भोगीत आहे? असले सुख मला का मिळत नाही म्हणून मन उद्दिग्न झाले आहे.’ तेव्हा श्रीपादस्वामीं म्हणाले, ‘जन्मल्यापासून तू गरीब. असले सुख तू कधीच अनुभवले नाहीस. यासाठी तू राज्यसुख अनुभवायास पाहिजे. ते तू आताच अनुभवू इच्छितोस अथवा पुढल्या जन्मी?’ रजक म्हणाला ‘स्वामी आता मला राज्य नको. मी म्हातारा झालो. मला पुढच्या जन्मी राजा करा.’ पुढील जन्मी तो बीदरचा राजा झाला आणि त्याची श्रीनृसिंहस्वामीरूपातील स्वामींबरोबर भेट झाली. त्याला मागील जन्म आठवला आणि त्याने महाराजांची सेवा केली, असे सांगितले जाते.

कृष्णेच्या पात्रामध्ये श्रीपादस्वामी एका खडकावर बसत असत आणि तिथे नित्य सूर्यनमस्कार घालीत असत. कर्नाटकामध्ये रायचूर जवळ कुरवपूर हे ठिकाण असून रायचूर हैद्राबाद रस्त्यावर मक्तल गावाजवळून कुरवपूर फाटा लागतो. तेथून पंचपहाड या ठिकाणी यावे लागते. तेथून छोटी नाव म्हणजे बुट्टीने कुरवपूर याठिकाणी जावे लागते. मंदिराच्या बाजूला काही अंतरावर एक प्राचीन वटवृक्ष आहे. तेथे गुरुचरित्र पारायण करता येते. येथून जवळच मंथनगुडी हे एक दत्त क्षेत्र आहे.

श्री क्षेत्र कुरवपूर, तपोभूमी

श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात. ‘कुरवपूर’ हे त्यांचे अक्षय निवासस्थान होय ईथे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादूका आहेत. या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांनी तपश्चर्या केली आहे. श्रींचे मंदिर ऐसपैस आहे. मंदिराच्या भव्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन दगडी कट्टे आहेत. त्याच्या शेजारी दगडी भिंती आहेत. महाव्दारावर कमान आहे. तिथे वाकून नम्रपणे हस्तस्पर्श करून आत गेल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांना बसण्याकरता दोन देवडया आहेत. भव्य अश्वत्थ (पिंपळ), कडुनिंब वृक्ष असून, त्यांना दगडी पार बांधला आहे. पाराच्या उत्तर बाजूच्या दोन्ही कोपऱ्यांवर घडीव दगडी वृंदावने आहेत. या पारावर दक्षिणाभिमुख दोन मंदिरे असून, एका मंदिरात दक्षिणाभिमुख काळ्या शाळिग्राम शिळेची मारूतीची रेखीव मूर्ती आहे व दुसऱ्या मंदिरात केशवमूर्ती आणि शिवलिंग पादुका आहेत. या पारासमोरच मुख्य पूजास्थान असून, तेथेच श्रीपाद श्रीवल्लभ जप-तप-अनुष्ठानादी कर्मे करत असत. कुरवपूर या ठिकाणी नित्य पूजा-अर्चा, अभिषेक आणि अनुष्ठाने इ विधी केले जातात. पालखी सेवा हे इथले एक वैशिष्टय़ आहे. हे स्थान अतिशय प्राचीन आहे. कुरवपूरचे मंदिर एखाद्या बंदिस्त गढीसारखे असून तेथे आता राहण्यासाठी धर्मशाळा आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहेत. मंदीर पहाटे पाच वाजता उघडले जाते रात्री शेजारती होते.

एक जागृत दत्त स्थान म्हणून ओळखले जाते.

श्रीपाद श्रीवल्लभ उवाच,
देहविकारांचे भस्म व मन, बुद्धी, अहंकार, चित्त यांची आत्मशुध्दी याने आपला जन्म शुद्ध करणे हेच माझ्या शिवस्वरूपाचे फल.

कुरवपूर यात्रेसंबंधी उपयुक्त माहिती

कुरवपूर दत्त क्षेत्र यात्रा ही पूर्व संचित असल्या शिवाय साध्य होऊच शकत नाही, असा अनुभव आहे. कुरवपूर हे तर साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांची तपोभूमी. हे ठीकाण एका बेटावर आहे, चारी बाजूने पाणी, शहरा पासून किमान तीस किमी दूर वसलेले, म्हणून मानव संपर्कापासून लांब तसेच सर्व भौतीक गोष्टींपासून दूर. तात्पर्य, तिथे काहीही सहज उपलब्ध होत नसते. साधारण पणे महाराजांच्या नियमीत पूजेसाठी लागणारे साहित्य, जसे की तेल, तूप, वाती, गंध, धूप, उदबत्ती, कापूर, फुले इ. सुद्धा शहरातून आणाव्या लागतात. अगदी पोस्टमन सुद्धा हप्त्यातून एकदाच येउन टपाल देवघेव करतो.

  • मंदिर अतिशय पवित्र व जागृत स्थान असल्याने, गाभार्यात पुजारी मंडळी शिवाय कोणीच जात नसते. ज्यांना दर्शन घ्यायचे आहे त्या पुरूषांना सोवळे वा लुंगी नेसावीच लागते. मंदिरात काही लोकांनी दान दिलेल्या लुंगी पायरीवर ठेवलेल्या असतात त्या, तात्पुरत्या वापरता येतात.
  • मंदिरात देवाला फक्त रेशमी वस्त्रे वापरली जातात, कॉटनची वस्त्रे उत्सवमुर्ती साठी वापरतात.
  • पुजारी दर व्यक्ती अभिषेकाचे रू २०० प्रमाणे स्वीकारतात.
  • तिथे प्रसादाचे जेवण घ्यायचे असेल तर गुरूजींना आधी सांगण्याची पद्धत आहे, साधारण पणे रू पन्नास प्रमाणे वा अधिक अशा स्वरूपात भाविक अन्नदान प्रसाद दक्षिणा देतात.
  • पूजेस्तव सुका मेवा, गाईचे तूप, साखर, मध, फळे, दूध, दही, अत्तर याचा स्वीकार होतो. 
  • जपमाळ जर नवी कोरी असेल तरच पादूकांना स्पर्शून प्रसादात्मक दिली जाते.
  • अभिषेक देवासमोर जागा कमी असल्याने गटा गटाने होतात.
  • पहाटे सहा ते नउ ही वेळ असते,
  • बारा वाजता आरती व प्रसाद.
  • नंतर अलंकार पूजा व दर्शन असते. हे दर्शन फार साक्षात्कारी असते, चुकवू नये..
  • मंदिरास आपण अन्नदाना साठी, स्वतःच्या वा इतरांच्या अभिषेकासाठी, पूजा, दीप, इ साठी देणगी देऊ शकतो.
  • सोबत ओझे होत नसेल तर धान्य, रवा, तांदूळ, डाळ वा तत्सम उपयोगी वस्तू पण नेउन देउ शकतो.
  • या ठीकाणी पारायण, दत्तयाग, होम हवन, शांती ई पूजा देखील नियोजन करून केल्या जातात.

मंदिराचे पूजारी हे गुरू सेवकाच्या भुमिकेत नेहमीच सहकार्य तत्पर राहून मदतच करतात, स्वल्प संतुष्ट असतात, फक्त सोवळे व नियम पाळण्या बाबत कडक आहेत. आपल्या इच्छा व संकल्पानुसार सेवा व्हावी हीच सद्गुरूंची इच्छा !

कुरवपूरचे अर्चक अर्थात पुजारी कसे आले ?

नारायण महाराज नावाचे एक ग्रहस्थ होते. त्यांचे वरचेवर कुरवपूर या स्थानी येणे जाणे होते. तेथील सर्व परिस्थिती त्यांना माहित होती. म्हणजे मंदिरातील पुजे पासून ते पुजारी लोकांच्या पर्यत म्हणजे सर्व माहिती असणारे असे ते नारायण महाराज होते. एकदा ते असेच एका गावी गेले व त्या गावातील एका मंदिरात गेले. तेव्हा त्या गावातील मंदिरात नेहमी असणारे पुजारी नव्हते. त्याजागी त्या पुजाऱ्याचा पुतण्या, केशव हे सर्व करत होता. नारायण महाराजांनी बारीकपणे त्या केशव पुजाऱ्याचे कार्य पाहिले. केशव पुजारी हे आपल्या काकांच्या म्हणजे गोविंद पुजाऱ्याच्या हाताखाली तयार झाल्यामुळे अगदी व्यवस्थित कोणतेही गोंधळ न करता मंदिरातील सर्व पुजा-अर्चा अत्यंत चोख पार पाडली. भजन, कीर्तन, पालखी, गायन अत्यंत छान केले. आणि त्याचा प्रभाव श्री नारायण महाराजांच्यावर पडला. त्या राञी नारायण महाराजाना झोप पण आली नाही. त्यांच्या मनात एक विचार सूरू होता. तो विचार घेऊन दुसरे दिवशी ते मंदिरात पोहचले. त्यांनी केशव पुजाऱ्यांच्याकडे त्याच्या आई वडीलांच्या बद्दल चौकशी केली तेव्हा कळाले, त्यांचे आई वडील इथून तीन मैल अंतरावर असलेल्या एका गावात रहातात.

नारायण महाराज केशव पुजारीच्या वडीलांना म्हणजे रंगभटजीना भेटायला त्यांच्या गावी गेले. जेव्हा ते रंगभटजीना भेटले तेव्हा ते म्हणाले, "श्री दत्ताञेयांच्या प्रेरणेने मना मध्ये अकस्मात एक संकल्प निर्माण झाला आहे. आणि मला खाञी आहे हा मूळ संकल्प माझा नसून तो परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभांचा आहे. मी फक्त निमित्त आहे !" असे बोलून ते पुढे म्हणाले "रायचूर पासून २० मैला वरती कुरूगड्डी नावाचे एक गाव आहे. या कुरूगड्डी गावात दत्ताञेय प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचे अतिशय पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरातील सर्व पुजा अर्चा तेथील दोन ब्राम्हणच करतात. पण त्या दोन्हीही ब्राम्हणांची लग्न होऊ शकलेले नाहीत. दोन्ही ब्राम्हण वृद्ध झालेले आहेत आणि मंदिरातील पुजा अर्चा पुढेही सूरू ठेवायची आहे. त्यासाठी आपण आपल्या मुलाला म्हणजे केशवला आम्हाला दत्तक देता का ? आम्ही त्याला कुरूगड्डी मधील पुजारी बनवतो." असे बोलून त्यांनी विनंती केली. तेव्हा केशव पुजारींच्या आई म्हणाल्या "कुठ ते निर्जण ठिकाण ? अनोळखी ठिकाण ? खुप दुर असलेले ते स्थान, अपरिचित लोक ! त्यामुळे मी माझ्या मुलाला दत्तक देणार नाही ! मी माझा मुलगा देणार नाही, माझा मुलगा मला जड झालेला नाही. आम्ही त्याचे पालन पोषण करणेस समर्थ आहोत." तेव्हा नारायण महाराज खुप नाराज झाले व तिथून निघून गेले. 

पण परमात्मा आपले कार्य पूर्ण केल्या वाचून कसे थांबणार ! त्याच दिवशी राञी केशव पुजारींच्या आईला एक स्वप्न पडले. आणि स्वप्नात एक सुंदर तरूण आला. तो दिसायला अत्यंत सुंदर होता. त्याच्या चेहऱ्यावर असामान्य तेज होते. त्याला बघून असे वाटत होते की त्याला जाऊन मिठी मारावी असे त्यांचा सुंदर रूप होते. त्याने भगवी वस्ञे घातली होती. ती त्याला खुपच शोभत होती. हाती दंड व कमंडलू ही होते. तो केशव पुजारींच्या आईला स्वप्नात म्हणाला, "आई तुझ्या मुलाचे कल्याण होत असताना तु का आड येत आहेस ? का आडकाठी करत आहेस ? आडकाठी करू नकोस. तुझ्या मुलाला कुरुगड्डीस पाठवून दे. त्यांचे कल्याण होईल. मी आहे तीथे." असे बोलून तो तेजस्वी ब्रम्हचारी गुप्त झाला. 

केशव पुजारींच्या आईना जाग आली. त्यांना कळेना हे स्वप्न पडले होते की खरीच घटना घडली ! तेव्हा पहाट झाली होती. सकाळी त्यानी ती घटना आपल्या पतिला म्हणजे रंगभटजीना सांगितली. रंगभटजी ताबोडतोब गावात गेले व गावकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली. त्यांना राञी पडलेले स्वप्न सांगितले. तेव्हा सर्व गावकरी म्हणाले "परमेश्वरांची सुध्दा हीच ईच्छा आहे, मुलाला दत्तक देऊन टाका." असे सर्वानी सांगितल्यावर रंगभटजी नारायण महाराजांच्या कडे गेले. तीथे जाऊन घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा नारायण महाराजाना ठाम विश्वास बसला, की राञी स्वप्नात आलेले दुसरे कोणीही नसून परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभच आहेत ! व तेच आपल्या कडून हे कार्य करवून घेत आहेत ! असा विचार करून नारायण महाराज रंगभटजीना म्हणाले "मी सर्व तयारी करतो." तेव्हा ते लगेच कुरूगड्डीस पोहचले. तेथे जाऊन मंदिरातील पुजारी, भीम भट्ट पुजारी यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांना पण आश्चर्य वाटले ! ते म्हणाले, "जशी श्रींची ईच्छा", असे बोलून दत्तक घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला. अनेक मोठ्या लोकांना आमंत्रित केले गेले व दत्तक पञ तयार केले. त्या सर्वांच्या सह्या त्या दत्तक पञका वर झाल्या. अशा तऱ्हेने कुरवपूर मंदिरास आता एक नविन पुजारी मिळाला होता. पण केशव पुजारीना अजून थोडे वैदीक शिक्षण द्यायला पाहिजे म्हणून त्यांना रायचूर मधील नारायण पेठेत वैदीक शाळेत घातले. थोड्या वर्षात केशव पुजारी वैदीक शिक्षण पूर्ण करून कुरूगड्डीस आले. तेव्हा सर्वानी त्यांच्या लग्नाचा बेत ठरवायला सुरुवात केली. कारण ते आता प्रौढ झालेले होते. त्यासाठी मुलींचा शोध सूरू झाला, तेव्हा होसपेठ मधील एका वधू बरोबर विवाह निश्चित झाला, आणि तो पार ही पडला. पुढे कुरूगड्डीचे भीम भट्ट पुजारीचे आकस्मिक निघन झाले व मंदिराची संपूर्ण जबाबदारी केशव भट्ट पुजारी यांच्या वर आली. आणि केशव भट्ट पुजारी श्रीपाद श्रीवल्लभ मंदिराचे अधिकृत मुख्य पुजारी बनले. श्रींचे सेवा कार्य अत्यंत चोख पणे ते बजाऊ लागले.

पुढे कुरूगड्डी मंदिरातील शांतता भंग करणेसाठी आणि मंदिरात दंगा करणेसाठी कोणीतरी लवकरच येणार होते; म्हणजे केशव भट्ट पुजारींच्या पत्नीला दिवस गेले होते. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या कृपेने त्यांना दोन मुले व पाच मुली झाल्या. एकेकाळी शांत व निर्जन असलेल्या कुरुगड्डी मध्ये गलबला सूरू झाला होता. पुढे केशव भट्ट पुजारींना दोन मुले झाली. त्यांची नावे श्रीपाद भट्ट पुजारी व वासुदेव भट्ट पुजारी. त्यांची लग्ने झाली व त्यांना पण मुले झाली. त्यांची नावे रविद्र केशवभट्ट पुजारी व राजेंद्र केशवभट्ट पुजारी. दुसरे मंजूनाथ वासूदेव भट्ट पुजारी व अवधूत वासूदेव भट्ट पुजारी. अशा रीतीनी परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या कृपेने कुरूगड्डी मंदिरातील पुजाऱ्यांच्या विषय कायमचा निकालात काढला. पुढे रविद्र भट्ट पुजारी यांचे पण लग्न झाले व त्यांचा वंश वाढला. पुढे मंजूनाथ भट्ट पुजारी व अवधूत भट्ट पुजारी याचा पण वंश वाढला. त्यामुळे मंदिरातील भविष्याची चिंताच मिटली. आजही सर्व पुजारी आपल्या कुटुंबाबरोबर गुण्या गोविंदाने श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची सेवा करत जीवन जगत आहे. 

खरच खुप भाग्यवान नशिबवान आहेत इथले पुजारी ! कारण परमात्माचे अत्यंत जागृत असे हे स्थान आहे. कुरवपूर याच स्थानी गुप्त रूपात परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ विराजमान आहेत ! इथे जाऊन जो कोणीही सेवा करतो त्यांचे कशा पद्धतीने चांगले करायचे हे परमात्म्याला चांगले ठाऊक आहे, हे ह्या अनुभवा वरून आपल्याला कळते.

कुरवपूर महात्म्य               

श्रीदत्तावतारी प्रथम अंश जे। आहेत कुरवपूर क्षेत्री।
दिव्यत्वाची तीच प्रचीती । घेती जाऊनिया यात्री।।१।।

तपोभूमी ही श्रीपादश्रीवल्लभांची। ध्यानधारणेची, संत सत्पुरुषांची।
प्रक्षाळीते सदा श्रीकृष्णा जेथे। त्या श्रीपाद यति पादुकांची।।२।

शोधीयले ज्यास वासुदेव यतीने। वेढले ज्या बेटास कृष्णामाईने।
"दिगंबरा दिगंबरा "हा मंत्र सुगम। येथेच झाला त्याचा उगम।।३।।

पंचदेव पहाडी यति साधनेस येती। सूर्यनमस्काराची अजून सावली ती।
खुणा पहावया जाऊ, या पुण्यक्षेत्री। श्रीपाद माऊलींची जी पुण्यधरित्री।।४।।

श्रीगुरुचरित्रातील दहावे अध्यायी। सदाचार संपन्न वल्लभेश द्विज होई। 
त्याचे मरण चुकवून प्राणदान दिधले। तेच हे क्षेत्र धन्य धन्य झाले।।५।।

असे हे श्रीपाद यतींचे पवित्र स्थान। असती अजुनी तेथे सदैव निर्गुण।
सद्भक्तांसी अनुभव अजुनी येतो। त्या श्रीपादचरणी मी लोटांगण घेतो।।६।।

श्रीगुरुदेव दत्त.

श्री क्षेत्रकुरवपूर, जि. रायचूर 

श्री वासुदेव भट्ट के. पुजारी / श्री मंजुनाथ के. पुजारी 
मोबाईल: ०९४४८५६८१४८३, ०९७३१८२७५४६, ०९७४०३१३८२८ 
फोन: (०८५३२) २८०५७०

श्री रवी भट्ट एस. पुजारी
फोन: (०८५३२) २८००८८

श्री राजेंद्र भट्ट एस पुजारी
मोबाईल:  ०९९७२५५९८१८ / ०९३४२७११६४०

ईमेल: vkpujar_mvpujar@hotmail.com 

कुरवपूर राहण्याची व्यवस्था पंचपहाड जवळ आहे. 
श्रीपाद छाया मंदिर पासून जवळ आहे आणि राहण्याची उत्तम सोय आहे. 
फोन: ९९१२३१४७१८