श्रीक्षेत्र गिरनार दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान

स्थान: जुनागड जिल्हा सौराष्ट्र (गुजराथ राज्य), हिमालयाचे पेक्षाही जुना पर्वत समूह, पूर्वी रेवतक पर्वत म्हणून उल्लेख
सत्पुरूष: श्री दत्तमहाराजांचे अक्षय निवास स्थान   
विशेष: श्री दत्तपादुका, नाथ संप्रदायाचे उपासना केंद्र, नेमिनाथ भगवान मंदिर, गीर जंगल, कमंडलू कुंड, आंबा मातेचे स्थान.

गिरनार पवित्र डोंगर
गिरनार पवित्र डोंगर

दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्रीगिरनार!

१०,००० पायऱ्या चढुन जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच पूर्व इतिहास व परिसर गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे. भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे.  शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात. रेवताचल, कुमुद, उज्जयंत हि नावे त्रैमुर्ती (ब्रह्मा, विष्णू, शंकर) यांच्याशी निगडीत आहेत.

श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणांत मिळतात. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो. तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो. वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. असा श्री गिरनार तेजोमय भगवान श्रीदत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे. पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ ५ कि. मी. अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे ४ योजनं म्हणजेच १६ गावांपर्यत आहे. सुमारे २८ चौ. कि. मी. ने व्याप्त आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी, जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे.

श्री गुरु मूर्ती  व परमपावन पदचिन्हे
श्री गुरु मूर्ती  व परमपावन पदचिन्हे

पवित्र सिद्धतीर्थ स्थान

कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन दिले आहे. अनादीकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुंफामध्ये साधना करत आहेत. बाबा किनाराम अघोरी, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज, यांसारख्या संताना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे.

ही भूमी योगी सिध्द महात्मे यांनी संपन्न आहे. म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची जत्रा भरते. तेथे मृगी कुंड आहे. शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिरच्या दर्शनाला १० ते १२ लाख लोक जमा होतात. मृगी कुंडातील सिध्दांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते. अशी एक आख्यायिका आहे कि, स्वयं शिव या कुंडात स्नानासाठी येतात.
मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला जेंव्हा उतरतात, त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो, की जो मृगी कुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही. अंतर्धान पावतो. तोच स्वयं शिव असतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत. त्यापैकी श्रीशेरनाथ बापू संचलित गुरू त्रिलोकनाथ बापूंचा एक आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्त्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बांपूचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे.आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालू आहे. गुरु शिष्य नाथ परंपरा येथे अजूनही जपली जाते. आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे प्रसाद घेतला जाईल. याकडे स्वतः शेरनाथ बापूंचे कटाक्षाने लक्ष असते. 

लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन कि.मी आत जंगलाच्या दिशेने संत श्री काश्मिरीबापूंचा आश्रम आहे. श्री काश्मिरी बापूंचे वय अंदाजे १५० वर्षाच्या आसपास आहे. अशी स्थानिकांची तसंच भाविकांची श्रध्दा आहे, याही आश्रमामध्ये अतिशय निसर्गरम्य आणि काश्मिरी बापूंच्या तापाने पवित्र असे हे स्थान आवर्जुन बघण्यासारखे आहे. वाटेत जाताना विविध इतर ही स्थाने आहेत. पायऱ्या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक गिरनार चढण्यास सुरुवात करतात. ज्या भाविकांना शारीरिकदृष्ट्या चढणे अशक्य वाटते, त्यांच्यासाठी कमानीजवळ डोलीवाले असतात. डोलीवाले एका व्यक्तीसाठी ५,००० ते ११,००० रूपये घेतात. सुमारे २०० पायऱ्यावर डावीकडे श्रीभैरवाच्या मुर्तीचे दर्शन होते. पुर्वी एक सिद्ध श्री लक्ष्मण भारती दिगंबर तेथे राहात होते. सर्व साधू संतांमध्ये त्याचा मान खूप मोठा होता. २,००० पायऱ्यावर वेलनाथ बाबा समाधी असा फलक दृष्टीला पडतो, हे ही एक सिद्धस्थान आहे असे सांगतात. 

गिरनार मंदिर प्रवेशद्वार
गिरनार मंदिर प्रवेशद्वार 

दर्शनीय स्थाने 

२,२५० पायऱ्यावर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुंफा आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास दोन सुबक मूर्ती आढळून येतात. थोडे बाजूला माली परब घाट येतो. तेथे श्रीरामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे.

२,६०० पायऱ्यावर आसपास राणक देवीमातेची शिळ आहे. त्या शिळेवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे ३,५०० पायऱ्यांपाशी प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे. संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, वरूडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. बाजूला जैन मंदिर येते. मुख्य मंदिर २२वे जैन तीर्थंकर नेमिनाथचे आहे. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. काळ्या पाषाणामधील नेमिनाथांची अतिशय सुंदर सुबक मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते अन् हेच त्यांचे समाधिस्थान आहे. या मंदिरातून थोड्या पायऱ्या उतरल्यावर जैन धर्मातले पहिले तीर्थंकर आदिनाथांची भव्य आणि उंच प्रतिमा आहे. थोडे पुढे गेल्यावर जैन दिगंबर मंदिराचा समूह आहे. उत्कृष्ट कला-कुसर कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत. थोडे पुढे गेल्यावर गौ-मुखी गंगा या नावाने स्थान आढळून येते, येथे गाईच्या मुखातून गंगाचे पाणी येते. बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर व बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौ-मुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे. डाव्या बाजूला एक उतण्याचा मार्ग आहे. ग्रामस्थ, भाविक, साधू बैरागी या मार्गांने येत अथवा जात नाहीत, या मार्गांवर कुठल्याही प्रकारची मदतीसाठी माणसे डोलीवाले नसल्यामुळे बऱ्याच जणांना हा मार्ग माहीत नाही. 

गौ-मुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर ४,८०० पायऱ्यावर अंबाजी टुंक येते. ५१ शक्तिपीठांपैकी हेही एक शक्तिपीठ आहे. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला. म्हणुन हे मंदिर असल्याचे सांगितले आहे. या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो. होळी पौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो उघडतात. हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे. मातेची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते. मातेच्या शक्तीची प्रचिती मंदिरात आल्याशिवाय राहात नाही.मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास सुसह्य होतो याचा प्रत्यय प्रत्येकाला येतोच येतो. पुढे ५,५०० पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ टुंक हे स्थान येते. गिरनार पर्वतवरील सर्वांत उंच शिखरावर हे स्थान आहे. समुद्र सपाटीपासून ३,६६६ फुटावर हे स्थान येते.

श्री गोरक्षनाथ गुहा
श्री गोरक्षनाथ गुहा

गिरनार व नाथ संप्रदाय 

साधारणपणे गुरूचे स्थान उंचीवर असते. गोरक्षनाथांनी महाराजांकडे प्रार्थना केली होती की "आपले चरण दर्शन मला सतत व्हावे" दत्तमहाराजांनी हे मान्य केले. यामुळे गोरक्षशिखर उंचावर आहे. नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली. त्यांना प्रत्यक्ष दत्तमहाराजांनी दर्शन देऊन कृपांकित केले आहे. आणि आजही गुप्त रूपाने गोरक्षनाथांचा येथे वावर आहे अशी भाविकांची धारणा आहे. बाजूलाच गुरु गोरक्ष नाथांची अखंडधुनी आहे व याच स्थानावर गुरु गोरक्षनाथांनी चौऱ्याऐंशी सिध्दांना उपदेश केला व बाजूलाच नवनाथानां गुरु दत्तात्रेयांनी याच ठिकाणी गुरुमंत्र दिला होता. बाजूलाच एक पाप पुण्याची खिडकी (बारी) आहे. म्हणजे एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. यातून बाहेर पडणाऱ्यास मोक्षाचा मार्ग मिळतो असा समज आहे.

या स्थानावर गेली बारा वर्षे मंदिराची व्यवस्था मंहत श्रीसोमनाथ हे पाहतात. त्यांचा दत्त संप्रदायातील "सेवा" या शब्दावर नितांत विश्वास आहे.गोरक्ष टुंक नंतर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो. कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी १,००० ते १,५०० पायऱ्या उतरायला लागतात. 

श्री गिरनारी बापूंची गुंफा लागते. येथे श्री भैरवनाथाचे मंदिर आहेत. जे भक्त इथे नतमस्तक होतात. त्यांना श्री गिरनारी बापू "प्रसाद" म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार रूद्राक्ष देतात.

थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात. एक उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे ३०० पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे.

डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर १,००० पायऱ्या चढल्यावर गुरूशिखर हे उभ्या सुळक्यासारखे आहे. श्रीदत्तगुरुंच्या चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी वारा पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो. याच स्थानावर बसून भगवान श्रीदत्तात्रेयांनी १२,००० वर्षे तपश्चर्या केली आणि हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे अशी श्रद्धा सर्व दत्तभक्तांमध्ये आहे.१० X १२ चौ.फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती एक पुजारी बसू शकेल एवढी जागा आहे.बाजूलाच प्राचीन गणेश अन् हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते. चरणकमलाच्या मागे थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंग आहे.

येथे एक प्राचीन घंटा आहे. तो घंटा ३ वेळा आपल्या पूर्वजांची नावे एकेक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

इथून पुढे जायचा कुठलाही रस्ता नसल्यामुळे परत आलो त्या वाटेवरून खाली किंवा कमंडलू स्थानापाशी जाता येते. 

भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका
भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका, श्रीगिरनार

भगवान दत्तात्रेयाची सगुण उपासना करताना चरण पादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते. तसेच आकाशातील चांदण्याचे अवलोकन करणे हाही काही साधकांचा दत्त उपासनेचाच भाग असल्यामुळे या स्थानावरून पहाटेच्या अथवा रात्रीच्या वेळी अवकाशाचे विहंगम दृश्य दिसते. ते येथे येऊनच अनुभवावे. पावसाळ्यात तर येथील अनुभवाचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे. ढगसुध्दा शिखरापासून खाली असतात.उतरताना परत त्या दोन कमानीशी आल्यावर कमंडलू स्थानाकडे जायला ३०० पायऱ्या उतरायला लागतात.

इथे ५,००० वर्षांपासून असलेली अखंड धुनी आहे. ही धुनी एक दैवदुर्लभ देणगी आहे. आजही ती धुनी दर सोमवारी सकाळी सुमारे ६.००-६.३० वाजता तासाभरासाठी प्रकट होते.

त्या अग्नीरुपानं साक्षात् श्रीदत्तप्रभूच तिथे प्रकटतात. कमंडलुकुंड स्थानी असलेले साधू सुमारे ५-६ मण काष्ठं पिंपळाची लाकडे समर्पित करतात (आपण होळीला जशी लाकडं उभी रचतो तशी अग्नीकुंडात रचून ठेवतात.) आणि एका विशिष्ट क्षणी आपल्या डोळ्यांचं पातं लवण्याच्या आतंच् श्रीदत्तात्रेय निर्मित स्वयंभू अग्नीनारायणाची २ पुरुष उंचीची ज्वाला प्रकटते. श्रध्दावान भक्तांस त्यामध्ये साक्षात् दत्तप्रभूंचे दर्शन होते.

या अनुपम दर्शनाचा लाभ घ्यायचा असल्यास सोमवारी पहाटे (म्हणजेच रविवारी मध्यरात्री) २.००-२.३०च्या दरम्यानच पर्वतारोहणास आरंभ करावा लागतो.येथील भस्म प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते.

श्री गोरक्षनाथ अखंड धुनी
श्री गोरक्षनाथ अखंड धुनी

अशी अख्यायिका आहे कि, भगवान दत्तात्रेय ध्यानात हजारो वर्षे दत्तटुंकवर बसले असताना प्रजा दुष्काळाने हैराण झाली होती. प्रजेची दया येऊन देवी अनुसूया मातेने ध्यानावस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना हाक मारली. तेव्हा भगवान दत्तात्रेयांचे कमंडलू खाली पडले. एक भाग एकीकडे व दुसरा भाग दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले. एक ठिकाणी अग्नी (जिथे धुनी आहे) प्रकटला तर दुसऱ्या स्थानावर गंगा अवतरुन जलकुंड निर्माण झाले तेच हे कमंडलू स्थान आहे. येथील आश्रमामध्ये अन्नछत्रही आहे. आजही हे अन्नछत्र २४ तास सेवेत असते.

दत्तमहाराज कोणत्या ना कोणत्या रूपात इथं येतात. या अन्नछत्राचा लाभ थकल्या भागलेल्या दत्त भाविकांना मिळतो. आश्रमाच्या मागील बाजूने उतरले की महाकाली गुंफेच्या डोंगराकडे जाता येते.

ही वाट तशी घनदाट जंगलातील असून येथे पायऱ्या नसून खडकाळ दगडावरुन जावे लागते. बाजूलाच दिसणाऱ्या दऱ्या अन् ओबडधोबड रस्ता हा सर्व सामान्यांसाठी कस पाहणारा ठरतो. गुंफेमध्ये मातेचा उग्र मुखवटा असलेली मूर्ती आहे. आत बेताच्या उंचीमुळे पूजा-अर्चा बसूनच करावी लागते. बाजूलाच असणाऱ्या दोन डोंगरावर रेणुकामाता अन् अनुसूयामाता विराजमान आहेत.

गिरनारच्या बाजूला नजर टाकली की भव्य दातार पर्वत दिसतो. या पर्वतावर चढताना साधारण ३,००० पायऱ्यावर दातार भगवान वसले आहेत. त्यापुढे नवनाथांचे स्थान आहे. या पर्वतावर चढण्याचा रस्ता फारच अवघड आहे.

दातार पर्वताच्या समोरच असलेला जोगीणीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या डोंगरावर जाण्यास आजही कोणी धजावत नाही. या डोंगरावरील एका गुंफेमध्ये शिवलिंग असून, ही अरूंद गुंफा आत प्रशस्त होत गेली आहे.एक वृद्ध बापू तेथे सेवा करतात. याच डोंगरावर चौसष्ट योगिनींचा वावर आहे. 

गिरनार व नाथसंप्रदाय
गिरनार व नाथसंप्रदाय

गिरनार दर्शनाची फलश्रुती 

माणसाचे मन हे दुर्गुणांचे माहेरघर आहे. असून या ठिकाणी जाण्यासाठी ९९९९ पायरया चढून जाव्या लागतात. प्रत्येक पायरीवर एक एक दुर्गुणाचा त्याग करीत चढायचे असते. शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करायचा आहे. काम, क्रोध, मोह, माया, पाश हे एवढेच दुर्गुण नाहीत. तर त्यांच्या शाखा, उपशाखा, पोटशाखाही आहेत. त्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजल्या आहेत. जोपासल्या गेल्या आहेत. त्या समूळ नाहीशा होतील आणि प्रत्यक्ष श्रीदत्त भेटतील! अनेकांना लाभ मिळाला आपणही घेऊया. 

श्री गिरनार परिक्रमा

गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे, यालाच परिक्रमा करणे असेही म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे. गिरनार च्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही. फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो. या जंगलात मुंगी, विंचू पासून ते सिंहा पर्यंत भरपूर प्राणी आहेत. पण या ५ दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत. ही दत्तगुरूंचीच कृपा आहे. देव आणि त्यांचे गण हे सुध्दा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे. कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती ही परिक्रमा केली असता मिळते. त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात. आपल्या सारख्या सामान्य माणसांपासून ते साधू, संत आणि देव सुद्धा ही परिक्रमा करतात. त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुषांचे दर्शन, आशीर्वाद मिळाल्यास सोने पे सुहागा.

गिरनार परिक्रमेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो. तीन डोंगर चढणे आणि उतरणे. त्यात तीव्र चढ आणि अतीतीव्र उतार असे स्वरूप. रस्त्यात कुठेही धर्मशाळा नाही की कुठे झोपी जाण्यासाठी गादी-उशी. पाणी पिण्यासाठी नळ नाही की खाण्यासाठी हॉटेल. चारी बाजूने घनघोर जंगल, उंच झाडे, झावळ्या, मोठे मोठे वृक्ष या मधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात. ही परिक्रमा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या ५ दिवसात करतात. घनदाट जंगलातून जाणारा मार्ग हा काटे-कुटे, दगडे यांनी घेरलेला आहे. परिक्रमा मार्गावर कसल्याही सुविधा नसताना श्रद्धस्त भक्त मंडळी उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवितात.

परिक्रमेला सुरुवात झाल्यावर १२ किलोमीटर वर जिनाबाबा की मढी हे स्थान येते. मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले. त्यांची एक चिलीम आहे अद्याप येथे, त्या चिलमीतून ते आत-बाहेर करत होते असे म्हणतात. यांची समाधी व धुनी येथे आहे. येथे परिक्रमावासींसाठी गरमागरम भोजन या संस्थान तर्फे उपलब्ध असते. शेकडो तरुण यासाठी विनामोबदला राबत असतात. थोडे पुढे छोटीसी नदी लागते 'सरनो' नावाची. त्यात बरेच जण स्नान करतात. तेथून पुढे ८ किलोमीटर वर मालवेला हे स्थान लागते. मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत. गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे. तेथून पुढे ८ किलोमीटर वर बोरदेवी चे स्थान आहे. अतिशय रमणीय असे हे स्थान आहे. विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे. 

परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेटी हा मार्ग परिक्रमावासीं साठी अतिशय सरळ आहे. तलेटी म्हणजे गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. एकूण ३८ किमी अंतर आहे परिक्रमेचे. काहीजण पहाटे ५ ला निघून संध्याकाळी ७ पर्यंत पूर्ण करतात, आपल्या चालण्याच्या स्पीडवर अवलंबून आहे तर काहीजण २ दिवसात करतात. स्थानिक भक्तजन ४ दिवस परिक्रमेत असतात. एक रात्र तरी जंगलात मुक्काम आवश्यक आहे म्हणजे परिक्रमा परिपूर्ण होते.

श्रीक्षेत्र गिरनार दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान
श्रीक्षेत्र गिरनार दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान

गिरनार यात्रा व गिरनार परिक्रमे बाबत घायवायची काळजी

१) गिरनारला पादुका दर्शनासाठी जाताना पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन महाराजांना शरण जावे आणि म्हणावे कि मला घेवून चला. त्याआधी पहिल्या पायरीजवळील चढवावा मारुतीचे दर्शन घ्यावे व गुरुशिखर चढण्यासाठी शक्ती द्यावी यासाठी प्रार्थना करावी.
२) चालण्यासाठी चांगली चप्पल किंवा बूट घ्यावा (sports sandal  उत्तम )आणि त्यावर १०-१५ दिवस चालण्याचा  सराव  करावा.
३) सॉक्स पायात घातले तर पायात थंडी वाजत नाही.
४) साधारण रात्री ११ वाजता चालायला सुरुवात करावी म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही व पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पादुकांचे पुढे नतमस्तक होता येते. अंदाजे ५ तास लागतात.
५) कपडे सुटसुटीत असावे, जीन पॅन्ट अथवा नेहेमी घालतो तशी पॅन्ट नसावी. 
६) स्वेटर आणि कानटोपी बरोबर असावी साधारण ६००० पायरी नंतर पहाटेचा गार वारा असतो. 
७) हातात काठी घ्यावी त्याने चालण्यासाठी मदत मिळते. (३० रुपये दर त्यातील २० रुपये परत मिळतात).
८) पाण्याची बाटली घ्यावी, रस्त्यामध्ये पण मिळते. त्यात electrol पावडर टाकली तर तरतरी येते. electrol पावडर व glucose पावडर प्रत्येकांनी घ्यावे. पाहिले ३००० पायऱ्या खूप घाम येतो त्यावेळी खरी गरज भासते.
९) खिशामध्ये खडीसाखर, गोड गोळ्या घेणे.
१०) कमरेला pouch असेल तर उत्तम.
११) सुरवाती पासून वर पादुका पर्यंत कुठेही toilet नाही हे लक्षात ठेवावे. 
१२) ज्यांना गुडघेदुखी चा त्रास आहे त्यांनी kneecap ठेवावी, उतरताना त्याचा खूप उपयोग होतो.
१३) रात्री अंधारात चालणे उत्तम त्यामुळे किती चाललो याचा अंदाज येत नाही. (शक्यतो ६/८ ग्रुपमध्ये जावे). चढताना पायऱ्यावर नंबर टाकलेले आहेत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे.
१४) प्रत्येकाने बॅटरी जरूर बरोबर घ्यावी, २ जादा सेल बरोबर असावेत. वाटेत लाईट आहेत पण मध्ये मध्ये खूप अंतर आहे.
१५) आपल्यापेक्षा बरेच शारीरिक दृष्ट्या दुर्बळ व वयस्कर लोक गिरनार पर्वत चढतात त्यामुळे महाराजांवर श्रद्धा ठेवावी, विश्वास असेल तर दत्तनाम जप चालू ठेवावा. वेगळी अंतरिकशक्ती मिळते.
१६) ही शर्यत नाही त्यामुळे दम लागला कि बसावे. त्याने चालण्याचा उत्साह अधिक वाढतो. बरोबर च्या लोकांशी थोडी चर्चा करावी, आपला उत्साह वाढतो व श्रम परिहार होतो.
१७) उतरताना हळूहळू उतरावे. घाई केली तर पायात गोळे येतात. उतरताना काठी चा फार उपयोग होतो पायाचा भार थोडा काठीवर टाकावा म्हणजे उतरणे सोपे होते.
१८) जमले तर उतरल्यावर पायाला मालिश करून घ्यावे त्यामुळे थोडा आराम मिळतो. आता ऍक्युप्रेशरचे मशीन घेऊन एक जण बसतात खाली. त्यावर २, ३ मिनिटे उभारल्यावर शरीराला बराच आराम मिळतो.
१९) त्रिपुरी पोर्णिमेच्या चार दिवस आधी गिरनार परिक्रमा असते. वर्षातील फक्त हे चार दिवस forest dept हा जंगलातील रस्ता मोकळा करते. तेव्हा किमान एकदा तरी ही परिक्रमा करावी याला खूप पौराणिक महत्व आहे. दत्त भक्ती मार्गातील गिरनार पर्वतावरील पादुकांचेदर्शन हा एक अत्त्युच्च क्षण अहे. तर भाविकांनी नक्कीच गिरनार पर्वतावर जावे. नेणारा आणि आणणारा तो आहे हे कायम लक्षात ठेवावे. सर्व कर्ता करविता, तो आहे ह्यावर दृढ विश्वास ठेवावा.
२०) काही कारणास्तव कोणाला चढणे नाही जमले तर डोलीचा आधार घ्यावा. लोकं काय म्हणतील/बरोबर चे काय म्हणतील म्हणून डोलीत बसणे टाळू नये. डोली ही कुठल्याही ठिकाणी मिळू शकते. अश्या वेळी इतर डोलीवाल्यांच्या संपर्कात रहावे ते अथवा जवळ असणारे दुकानदार डोलीची व्यवस्था करतात. डोलीचा खर्च आपले आपण करायचा असतो. येथे सरकार नियुक्त दरपत्रक आहे. सधारणतह माणसाचे वजनानुसार हा आकार असतो.
२१) गोरक्षनाथ मंदिर सोडल्यानंतर एकही दुकान वाटेत नाही, पादुकांचे ठिकाणी एकही दुकान अथवा हार, फुले मिळत नाही. कोरडा प्रसाद अथवा भक्तीभावे पादुकांचे ठिकाणी अर्पण करावयाच्या ऐच्छिक वस्तू न विसरता आपल्या सॅकमध्ये मध्ये एका वेगळ्या कप्प्यात ठेवाव्यात.
शेवटचे व अत्यंत महत्वाचे, पादुकांचे दर्शन झाल्यावर खाली कमंडलू तीर्थ येथे सर्वांनी प्रसाद घ्यावा तो तुम्हाला खूप ताकद व उत्साह देतो, कारण तुम्हाला परत साधारण २००० पायऱ्या चढायच्या असतात व तेथे असलेल्या सेवकवर्गांशी अदबीने वागावे. विनाकारण हुज्जत अथवा भांडण करू नये. जमल्यास ऐपतीनुसार तेथे दानधर्म करावा. त्यांना हि सेवा वर्षभर व वर्षानुवर्षे चालवायची आहे हे एक कठीण व्रत आहे. पण सेवाभावाने साधू व भक्तगण ते करीत आहेत. 

श्री क्षेत्र गिरनार
श्री क्षेत्र गिरनार

श्री गिरनार परिक्रमा हि ३८ km ची ही पायी परिक्रमा असते. ही परिक्रमा फक्त पायी करता येते. डोली, वाहन या द्वारे करता येत नाही.

श्री क्षेत्र गिरनार-कमंडलू कुंड तिर्थ आख्यायिका

गिरनारवर श्रीदत्तगुरूंची तपस्या चालू होती. त्यावेळी गिरनारमध्ये प्रचंड दुष्काळ पडला. सामान्य जीवांचे प्रचंड हाल होऊ लागले. हा दुष्काळ बरेच दिवस होता. शेवटी माता अनसूयेला हे बघवेना. त्या गिरनारवर श्रीदत्तगुरूंना तपस्येतून जागृत करायला आल्या. दत्तगुरु तपस्येत लिन होते. मातेने त्यांना जागृत करायला प्रारंभ केला आणि दत्तगुरु तपस्येतून जागृत होताना त्यांच्या कमंडलूला धक्का लागला आणि ते कमंडलू खाली पडले. खाली पडल्यावर त्याचे दोन भाग झाले. एक भाग जिथे पडला तिथे गंगा अवतीर्ण झाली तर दुसरा भाग जिथे पडला तिथे अग्नी उत्पन्न झाला. तेव्हापासून दुष्काळ संपुष्टात आला.

ते तीर्थ आणि अग्नी अजूनही गिरनारवर उपस्थित आहे. आता तिथे छोटासा छान आश्रम निर्माण झाला आहे. दर सोमवारी सकाळी ६ वाजता त्या धुनिवर पिंपळाची लाकडे ठेवण्यात येतात. कापूर, रॉकेल, काडेपेटी यांचा अजिबात वापर न करता हि धुनी आपोआप दत्तकृपेने प्रज्वलित होते. हा सोहळा अतिशय बघण्यासारखा असतो. त्यामुळे रविवारी रात्री गिरनार चढायला सुरुवात करून बरेचजण पहाटे कमंडलू कुंड येथे हजर होतात. लाकडाने आपोआप पेट घेतला की अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त चा गजर सर्वांच्या मुखातून होऊ लागतो. मग नैवैद्य वगैरे दाखवून सर्वांना जवळून दर्शन घेण्यासाठी आत सोडतात.

कमंडलू कुंडाचे पाणीच तेथे सर्व गोष्टींसाठी वापरले जाते. मुख्य कुंडातून इतर कुंडात ते पाणी साठवले जाते. महंत श्री मुक्तानंदगिरी बापू तेथील सध्याचे प्रमुख आहेत. इतर काहीजण तेथे सेवेसाठी आहेत त्यात योगेशबापू हे एक प्रमुख आहेत. आश्रमाच्या वतीने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत अखंड अन्नदान चालू असते. चहा सुद्धा आश्रमातर्फेच उपलब्द करून देतात. १०००० पायऱ्यावर चहा, पूर्ण जेवण उपलब्ध करून देणे हे अतिशय कठीण आहे. प्रचंड वारा, कडक ऊन, धुवांधार पाऊस अशा अतिशय विपरीत परिस्थितीत हे सर्वजण विनामोबदला अहोरात्र सेवा बजावत असतात. अनेकजणांच्या देणगीवर हि सेवा अखंड चालू आहे. सध्या धुनिवर ठेवण्यासाठी पिंपळाचे लाकूड मिळणे कठीण जात आहे. पंचक्रोशीत फिरून पिंपळाचे झाड विकत घेऊन ते कट करून गिरनार पायथ्याशी आणले जाते व इथून लोकल माणसांकडून वर आणले जाते. त्यामुळे यासाठी बराच पैसा लागतो. आपणही कधी गिरनारवर गेलात तर सढळ हस्ते येथे काही रक्कम समर्पित करा. 'दान' हा शब्दप्रयोग मुद्दाम करीत नाही कारण आपण सर्व तेवढे मोठे अजिबात नाहीत. आपण जर ग्रुपने जात असाल तर प्रत्येकाने थोडी चहा पावडर, साखर, दूध असे वर घेऊन जावे, तेवढीच आपलीही सेवा तिथे रुजू करावी.

कमंडलू कुंड, धुनी आणि आश्रम यांची महती वर्णन करावी तेवढी कमीच आहे. वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. एकदातरी गिरनारवर जाऊन हा अनुभव प्रत्येकाने घ्यावाच!

या क्षेत्री असे जावे

गिरनार (जुनागड) (सौराष्ट्र गुजरात) (GIRNAR)-

हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात येते. जुनागड या शहरापासून हे स्थान २ किमी अंतरावर आहे. याच ठिकाणी श्री सद्गुरुदत्तात्रेयांनी गोरक्षनाथास अनुग्रह दिला. हे स्थान उंच पर्वतावर आहे. ह्या ठिकाणीसद्गुरु दत्तात्रेयांच्या पादुका स्थापित आहेत. इथे नेहमी दत्तात्रेयांचा निवास असतो याचा प्रत्ययभक्तांना नेहमी येतो.

या ठिकाणी जाण्यासाठी सुरत, बडोदा, अहमदाबाद या शहरातून जुनागड (गिरनार) साठी नियमीत बससेवा आहे.
रेल्वे-मार्गाने जाण्यारया भक्तांसाठी सुरत, अहमदाबाद, राजकोट, जुनागड अशी रेल्वे सेवा आहे.
या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत.

दामोदर कुंड, गिरनार
दामोदर कुंड, गिरनार 

गिरनार - दामोदर कुंड

जूनागढ़ कडून तलेटी (गिरनार) कड़े जाताना थोड़े अलीकडे उजव्या बाजूस पुराणप्रसिद्ध दामोदर कुंड लागते. हिन्दू पुराणानुसार हे अत्यंत पवित्र मानले जाते. हिंदुंच्या अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाच्या अस्थी आणि रक्षा विसर्जन येथे केल्यास मृत व्यक्तिस मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. येथील तलावाच्या पाण्यात अस्थि विरळघणारे गुणधर्म आहेत. तलाव जवळपास २५० फुट लांब व ५० फुट रुंद आहे आणि खोली केवळ ५ फुट आहे. सभोवताली घाट आहे. शेजारीच दामोदर हरी मंदिर आहे. येथील मूर्तिची प्रतिष्ठापना श्रीकृष्णच्या नातवाने वजाराभा याने केली असावी असे मानले जाते. ऐतिहासिक दृष्टया हे मंदिर चंद्रनाथपुर नावाच्या सूर्यवंशी शासकाने बांधलेले किंवा जिर्णोद्धार केलेले आहे. ३२ एकर क्षेत्रफळ असणारे हे मंदिर गुलाबी वाळूच्या दगड़ात बांधलेले आहे. त्यात आतील निज मंदिर आणि बाहेरील मंडप यांचा समावेश आहे. प्रत्येकास एक शिलाहार आहे, ज्यामध्ये सुमारे ८४ उत्तम सुव्यवस्थित खांब आहेत. निज मंदिरचे शिखर ६५ फूट उंच असून मंडपचे शिखर ३० फूट उंच आहेत. दामोदरजीची मूर्ती चतुर्भुज रूपात आढळते, प्रत्येक हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ घेऊन आहे. श्री राधा रानीसह. दोन्ही मूर्ती काळ्या दगडापासून कोरलेल्या आहेत आणि सोने आणि रेशीम यांनी जोरदारपणे सुशोभित केलेली आहेत. भगवान बलराम, श्री रेवती आणि भगवान गणेश यांना समर्पित इतर उप मुर्ती आहेत. मंदिर संकुल वर आणि बाहेरील अनेक इतर मंदिरे आहेत. येथे श्री दामोदरजींची सेवा वैष्णव परंपरेत केली जात आहे. श्री दामोदरजी हे गिरी नारायण ब्राह्मण समाजाचे ईष्टदेव आहेत. आणि इतर अनेक स्थानिक समुदाय आहेत. पारंपारिक श्रद्धेनुसार, जवळपास १२००० वर्षांपूर्वी गिरी नारायण समुदाय येथे रहात आहे.

जय गिरनारी  !

गिरनार पर्वताचे जवळ जवळ 60 वर्षापूर्वीचे चित्र
भगवान दत्तात्रेय यांचे स्थान असलेले गिरनार पर्वताचे जवळ जवळ ६० वर्षापूर्वीचे चित्र. याच्यात पर्वतावरील सर्व महत्वाची स्थान दर्शविली आहेत.

गिरनार  परिक्रमा श्रेष्ठ पुण्यसंचय, कथाभाग

गिरनार यांचे नाव गीर नारायण होते. आणि ते हिमालय यांचे मोठे सुपुत्र असून प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते. त्यामुळे ते सर्वत्र उडू शकत असल्याने, ते ज्या ठिकाणी थांबत त्या ठिकाणांवर वस्ती असल्यास पर्वता खाली बसत. हि  समस्या बघता सर्व देव चिंतीत झाले. आणि महादेवांकडे गेले. सर्व हकीकत सांगितल्यावर त्रिदेव यांनी निर्णय घेतला की, सर्व पर्वतांचे पंख छाटावे, हि बातमी गीर नारायण यांना समजल्यावर, आपले पंख छाटले जाऊ नयेत म्हणून, त्यावेळेस गिरनार पासून ते सोमनाथ पर्यंत संपूर्ण समुद्र होता, व तेथे एक ब्रम्ह तळ होते, त्या तळामध्ये गीर नारायण यांनी आपले शरीर लपवले, आणि फक्त चेहरा वर ठेवला. तो भाग म्हणजे आपण जे गुरु शिखरावर पादुका दर्शन घेतो ते यांचे कपाळावरील स्थान आहे. पण ज्यावेळेस, पार्वती देवी यांचा विवाह महादेवांशी होणार होता, तेव्हा आपले मोठे बंधू गीर नारायण विवाहात उपस्थित व्हावे. म्हणून पार्वती देवींनी विनंती केली कि आपण विवाहास यावे. आणि गीर नारायण तेथे आले. त्यांचे पंख छाटू नये म्हणून, त्यांनी महादेव यांना वरदान मागितले कि, हिमालयावर जे ३३ कोटी देव, तपस्वी, साधू सर्व वास करतात. तसे माझ्याकडे पण वास करावा. तसा वर महादेवांनी त्यांना दिला. म्हणून गिर नारायण आताचे गिरनार येथे, सिद्ध पुरुष, साधू, महंत वास करतात. ३३ कोटी देवांचाही येथे वास असतो. त्यामुळे, गिरनार परिक्रमा हि ३३ कोटी देव आणि गुरु दत्तात्रय यांना प्रदक्षिणा करणे होय. सदर परिक्रमा ही अत्यंत पुण्यदायी आहे प्रत्येक दत्तभक्तांनी आयुष्यात एकदा तरी करून पुण्यसंचय करावा.

गिरनार - मुचकुन्द गुफा

जूनागढ़ कडून गिरनार तलेटी कड़े जाताना तलेटीच्या अलीकडे उजव्या बाजूला दामोदर कुंड लागते. या दामोदर कुंड पासून जवळच श्री मुचकुंद ऋषि गुफा आहे.

पुराण काळात मुचकुंद नावाचा राजा होऊन गेला. देव-दानव युद्धात मुचकुंद राजा देवांच्या बाजूने युद्ध करत होते. हे युद्ध खुप काळ चालले होते. शेवटी या युद्धात देवांचा विजय झाला. या युद्धात मुचकुंद राजाने अविश्रान्त अविरत कामगिरी बजावली. देवाने मुचकुंद राजाची खुप प्रशंसा केली व वर मागण्यास सांगितले. राजाने वर मागितला की मी अविश्रान्त लढलो आहे तेव्हा मला विना अडथळा निद्रा पाहिजे. आणि जो कोणी माझी निद्राभंग करेल त्याच्या कड़े मी पाहिल्यास तो भस्मसात होईल, देवाने असा वर दिला. राजा मुचकुंद गिरनार जवळ असलेल्या एका गुफेत अविरत निद्रेत लिन झाला.

भगवान श्रीकृष्णावर कालयवन चाल करून आला. कालयवन कुठल्याही युद्धात हरणार नाही व मृत्यु येणार नाही असा त्यास वर होता. या दोघांचे युद्ध सुरु होते. श्रीकृष्णाने अचानक युद्धातुन पळ काढला. कालयवनला वाटले श्रीकृष्ण घाबरून पळत आहे. तो त्याच्या मागे लागला. श्रीकृष्णाला ही मुचकुंद राजाची सर्व कथा माहीत होती. तो या गुफेत आला व मुचकुंदावर आपला शेला पांघरला आणि स्वतः लपुन बसला. कालयवन यांनाच श्रीकृष्ण समजला आणि उन्मादाने त्याने लाथ मारली. त्या लाथेच्या प्रहाराने मुचकुंद ऋषिची निद्रा भंग झाली. त्यांना अतिशय क्रोध आला. त्यांनी रागाने कालयवन कड़े बघितले आणि कालयवन आगीत भस्मसात झाला. श्रीकृष्णाने अतिशय चतुराईने आपल्या बलाढ्य शत्रूचा काटा काढला. मुचकुंद ऋषिचा राग शांत झाल्यावर भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासमोर गेले व सर्व कथा सांगितली. हेच मुचकुंद पुढे ऋषि म्हणून प्रसिद्ध झाले. या गुफेत श्रीकृष्णाने शिवलिंग प्रतिष्ठापित केले. त्याचे नाव नीलकंठ महादेव.

ही गुफा आजही गिरनार मध्ये अस्तित्वात आहे. फक्त याचे स्वरूप बदलले आहे. समोरच्या बाजूला मुचकुंद महादेव मंदिर आहे तर आतल्या बाजूला श्रीकृष्णाने स्थापन केलेले नीलकंठ महादेव मंदिर आहे. गुफेत माता अन्नपूर्णाचे पण स्थान आहे. गुफेत काही मुर्त्या आहेत त्यात एक यमराजाची पण एक मूर्ती आहे. गुफेत वाकुन जावे लागते पण आत गेल्यावर गुफा मोठी आहे. उभे राहून फिरू शकतो. बाहेरच्या बाजूला एक छोटा हौद आहे त्यात न बुड़णारा एक दगड आहे.

Datta Dhuni Girnar
सिध्दधुनी गिरनार येथिल दत्तधुनी मध्ये श्री च्या नविन विग्रहाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

गिरनार, कमंडलू कुंड (दत्त धुनी) दिनचर्या

गिरनार हे पृथ्वी वरील एकमेव अस ठिकाण आहे जिथे सेवेकरी "सेवा हीच साधना" हे प्रमाण मानून सातत्याने सेवारुपी साधना करीत असतात. येथे सेवेकर्यांना ध्यान धारणा, जप जाप्य, पूजा आर्च्या करण्यास सक्त मनाई आहे. येणाऱ्या प्रत्येक भक्तामध्ये आपले आराध्यदैवत पाहणे आणि त्याची सेवा करणे हीच साधना. प्रत्येक भाविकांमधील गुण दोष यांचे निरीक्षण करून कोणासही कळू न देता आपल्यात तसा बदल करून स्वतः ला तयार करणे हेच त्यातील खरं गुपित.

गिरनार, कमंडलू कुंड (दत्त धुनी) येथे स्वयंपाक बनवणे, पादुका व धुनी पूजन, भोजन व्यवस्था, भांडी घासणे, पाण्याची व्यवस्था करणे, लागणाऱ्या सर्व जिन्नसाची व्यवस्था पाहणे, रात्रपाळी अशी वेगवेगळी डिपार्टमेंट आणि त्याचे सेवक ठरवून दिलेले असतात तरीही हे माझ्या डिपार्टमेंटच काम नाही असं कोणीही कधीही सांगत नाही. वेळप्रसंगी कोणतेही काम करण्यासाठी अगदी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी सेवा देण्यासाठी सेवक सदैव बिनातक्रार तत्पर असतात. त्यामुळे कोणतेही काम आडून रहात नाही आणि वेळेत पूर्ण देखील होते.
 
गिरनार कमंडलू कुंड (दत्त धुनी) येथील सेवेकऱ्यांची दिनचर्या ही पहाटे साधारण 3 ते 4 च्या दरम्यान सुरू होते. सेवक पहाटे उठून स्नान इत्यादी उरकून तयार होतात. पूजा व्यवस्थेतील सेवेकरी पूजेची सर्व तयारी करून पहाटे 4 च्या सुमारास शिखरावर जेथे भगवान दत्तात्रय यांच्या पादुका आहेत तेथे (साधारण 700 पाह्यऱ्या वर) जाण्यास सुरवात करतात. शिखर परिसर साफ करून पादुका पूजनाची तयारी करतात तशीच कमंडलू कुंड येथील धुनी पूजनाची देखील तयारी केली जाते. स्वयंपाक गृहातील सेवेकरी देखील साधारण पहाटे 5 वाजेपर्यंत स्नान इत्यादी आटोपून प्रसाद रुपी भोजन बनवण्याची सुरुवात करतात. इतर सेवेकरी भोजन कक्ष, धुनी परिसर, पाह्यऱ्या वगैरेची साफसफाई करू लागतात. साधारण पहाटे 5:30 ते 6 च्या दरम्यान सर्व तयारी पूर्ण करून पूजेच्या प्रारंभी शंखनाद केला जातो हा एक प्रकारे शिखरावरील पुजारी तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी संदेशच होतो आणि एकाच वेळी शिखर आणि धुनी ह्या ठिकाणी पूजा आणि आरती होते आणि दर्शनासाठी सुरवात होते. भाविक भक्त शिखरावरील पादुकांचे दर्शन घेऊन कमंडलू कुंड येथील धुनीचे दर्शन घेतात आणि प्रसाद ग्रहण करून तृप्त होतात. अशा प्रकारे सेवेची सुरवात होऊन ही सेवा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अविरत चालू राहते. संध्याकाळी 7 वाजता पुन्हा शंखनाद करून दोन्ही ठिकाणी एकाच वेळी आरती केली जाते आणि शिखरावरील मंदिर दर्शनासाठी बंद केलं जातं मात्र प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी रात्री मंदिर दर्शनासाठी संपूर्ण रात्र खुल असत. साधारण सायंकाळी 8 च्या सुमारास सर्व सेवक एकत्र येऊन भोजन ग्रहण करतात आणि दुसऱ्या दिवशीची तयारी करून साधारण रात्री 10 ते 11 सुमारास झोपी जातात ते पुन्हा पहाटे 3 ते 4 वाजता उठून सेवा करण्यासाठी. काही भाविक भक्त रात्रीच खालून 10हजार  पाह्यऱ्या चढायला सुरवात करतात. असे भक्त मध्यरात्री वरती पोहोचतात. शाररीक दृष्टीने थकून गेलेले तसेच पावसाळ्यात भिजलेले अथवा थंडी वार्यानी ग्रासलेल्या भक्तांच्या सेवासाठी रात्रीच्या वेळी साधारण 2 सेवक कमंडलू कुंड येथे रात्रीच्या सेवेसाठी असतात. अश्या भाविकांना चहा, जेवण देण्यासाठी.

अशी सातत्याने निस्वार्थ भावनेने, सुट्टी न घेता, सर्व ऋतूमानात वर्षांनुवर्ष सेवा करणे फार कठीण आहे.

हे सर्व करीत असताना दत्त महाराज नित्य सेवेकऱ्यांची परीक्षा घेत असतात. काही प्रसंग असे उभे करतात की सेवकाची खूप चिडचिड होते, काहीतरी चूक होते. थोडा वेळ गेला की चूक लक्षात आणून दिली जाते आणि सेवक पुढच्या परीक्षेसाठी तयार होऊन सेवा करू लागतो. आशा प्रकारे सेवक आपली साधना नित्याने वाढवीत जातो. प्रकृतीक, मानसिक आणि शारीरिक अडचणींवर मात करत करत आपली साधना सिद्ध करत जातो.

निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या सर्व सेवेकाऱ्यांना भगवान दत्तात्रय यांची कृपादृष्टी प्राप्त होते हे मात्र नक्की

श्री गिरनार येथील १९८८ चा दुर्मिळ फोटो
श्री गिरनार येथील १९८८ चा दुर्मिळ फोटो