श्री दिगंबरबाबा वहाळकर (सन १८७२-१९५१)

श्री दिगंबरबाबा वहाळकर
श्री दिगंबरबाबा वहाळकर 

जन्म: इ. स. १८७२ वडाळगावी, ता. चिपळूण
कार्यकाळ: १८७२-१९५१
गुरु: श्री गोपाळबुवा केळकर 
विशेष: १९१५ सावर्डे दत्तमंदीर जीर्णोद्धार व समर्थ पादुका स्थापना 
समाधी: महासमाधी १९५१

श्रीस्वामी समर्थांच्या परंपरेतील हे एक मोठे दत्तभक्त कोकणात होऊन गेले. चिपळूण तालुक्यातील वहाळ हे यांचे गाव. यांचा जन्म सन १८७२ मध्ये झाला. रीतीप्रमाणे त्यांचे लग्न झाले. बाबासाहेब नानल यांच्याकडे प्रथम यांनी नोकरी केली. सावर्डे, डेरवण येथील त्यांची शेती पाहिली. सर्व व्यवहार सांभाळून हे दत्तमंदिरात दर्शनासाठी जात असत. एकदा मालकाशी काही मतभेद झाल्यामुळे ते नोकरी सोडून सावर्डे येथे आले. तेथील दत्तमंदिरात वृक्षाखाली त्यांनी भगवंताचे नामस्मरण केले. त्यांच्या चित्तवृत्ती अंतर्मुख झाल्या होत्या. जेवणाखाण्याची त्यांना शुद्ध नव्हती.

चिपळूण येथील गोपाळबुवा केळकर यांच्याकडून यांना मार्गदर्शन झाले. पुढे ते मुंबई, अक्कलकोट येथेही जाऊन आले. स्वामी समर्थांच्या पादुकांवर यांची मोठी निष्ठा होती. सावर्डे, चिपळूण येथे त्यांनी तपश्चर्या केली. मंत्रजप, गायत्री पुर:श्र्चरण, ध्यानधारणा, योगसाधना इत्यादी मार्गांचा त्यांनी अभ्यास केला. गोंदवलेकर महाराज, वासुदेवानंदसरस्वती, नारायणमहाराज केडगावकर, साईबाबा इत्यादी साधुसंतांचा त्यांना समागम घडला होता. पाण्यात राहून हे खडतर तपश्चर्या करीत असत. हिंदुस्थानातील प्रसिद्ध ठिकाणे यांनी पाहिली होती. यांना मधुर आवाजात भजने म्हणण्याचा नाद होता. भजन म्हणताना ते तल्लीन होत असत. अनेक सुखदु:खांचे प्रसंग त्यांच्यावर आले; पण दत्तकृपेने ते त्यांतून बाहेर पडले. यांनी सावर्डे येथील दत्तस्थानाचा जीर्णोद्धार केला व तेथे स्वामी समर्थांच्या पादुका स्थापन केल्या. १९१५ साली दत्तमंदिराचे काम पूर्ण केला व तेथे स्वामी समर्थांच्या पादुका स्थापन केल्या. १९१५ साली दत्तमंदिराचे काम पूर्ण केले. ऋग्वेदस्वाहाकार, गणपती अथर्वशीर्ष, शतचंडी, भागवतपुराण इत्यादींचे त्यांनी वाचन केले. सर्व कारभार भिक्षा मागून पाहिला. दत्तजयंतीच्यावेळी तीन चार हजार भाविक येत असत. शेतात काम करणे, शेण गोळा करणे, पत्रावळी लावणे या कामांतही ते तरबेज होते. अनेक लोकांना त्यांनी मार्गदर्शन केले.

शेवटी शेवटी यांचे बोलणे कमी झाले. दिगंबरदास सहस्त्रबुद्धे महाराज इत्यादींची त्यांच्यावर कृपा होती. सन १९५१ मध्ये यांनी महासमाधी घेतली. दिगंबरदास व यांची भेट १९४२ साली झाली. त्यांनी यांना मार्गदर्शन केले. भक्तिमार्गाचे रहस्य समजावून सांगितले.

गुरुपरंपरा 

श्री स्वामीसमर्थ 
    । 
श्री स्वामीसुत 
    ।
श्री गोपाळबुवा केळकर 
    ।
श्री दिगंबरबाबा वहाळकर 
    ।
श्री सीतारामबुवा वालावालकर  
(श्री क्षेत्र डेरवण)