श्री दत्तमहात्म्य

श्री दत्तामहात्म्य
श्री दत्तमहात्म्य ग्रंथ 

भगवान श्रीदत्तात्रेयांसारख्या जगत्कल्याणास्तव सगुण व साकार झालेल्या परतत्त्वाच्या माहात्म्याचा विषय व परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांसारखे सिद्ध पुरुष हे ग्रंथकार, असा प्रस्तुत ग्रंथाच्या संबंधात आलेला योग श्रीमद्भागवतासारखाच अलौकिक आहे. सांस्कृतिक मूल्यांचा वर्तमान युगांतील दीपस्तंभ म्हणून प. प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतींचे स्थान अनन्यसामान्य आहे. "ब्राह्मणत्वस्य हि रक्षणेन रक्षित: स्याद्वैदिको धर्म:" असे भगवत्पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी श्रीमद्भगवद्गीतेवरील आपल्या भाष्यांत म्हटले आहे. श्रीमदाचार्यांना जे ब्राह्मण्य अभिप्रेत आहे ते श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतींच्या रूपाने साकारले होते. चारही आश्रमांच्या आचारधर्माचे यथार्थदर्शन ज्यांच्या जीवनग्रंथातून घडते असा दुसरा कोणता महापुरुष वर्तमान युगात दाखविता येईल? कडकडीत तपाचरणामुळे ब्राह्मणाचे सारे सामर्थ्य त्यांच्या जीवनातून प्रगट झालेले होते.

श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतींच्या जीवनातून हे सर्व विशेष प्रगट झालेले होते. स्वत:च्या जीवनातून त्यांनी जसे धर्माचे व आध्यात्मिक ध्येयवादाचे स्वरूप प्रगट केले, त्याचप्रमाणे अनेक जीवांचे "आर्त" दूर करून त्यांना सन्मार्गाला लावले व कृतार्थ केले. भावी पिढ्यांसाठी त्यांनी साहित्य निर्माण करून पारमार्थिक क्षेत्रांतील साधकांची सदाची सोय करून ठेवली हे त्यांचे सर्वात मोठे कार्य होय. त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथसंपत्तीपैकी बरेचसे ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत. त्या ग्रंथांची महत्ता केवढीही मोठी असली तरी सर्वसामान्य लोकांना त्यांचा विशेष उपयोग होण्यासारखा नाही. हे ध्यानात घेऊन श्रीमहाराजांनी मराठीत जे साहित्य निर्माण केले आहे, त्यात प्रस्तुत ग्रंथाची योग्यता अनेक दृष्टींनी अलौकिक आहे. प्रस्तुत ग्रंथाचे स्वरूप व त्याच्या निर्मितीचे कारण यांवर महाराजांनी स्वत:च प्रकाश टाकलेला आहे. ते लिहितात :-

"जगदुद्धारार्थ परमेश्वर । अत्रीच्या घरी धरी अवतार । त्याच्या चरिताचा विस्तार । वर्णिला सुंदर पुराणी ॥
तत्सारभूत दत्तपुराण । औट सहस्त्र निरूपण । ते अपरिचित गीर्वाण भाषण । प्राकृतजन नेणती ॥
म्हणोनि हा ग्रंथारंभ । ह्या योगे उमजेल स्वयंप्रभ । भक्तवत्सल पद्मनाभ । चित्तक्षोभहर्ता जो ॥
श्रीदत्तपुराणाचे तीन भाग । ज्ञानोपासनाकर्मयोग । त्यांतील उपासनाकांड भाग । ईश्र्वरानुराग दावी जो ॥
जेथे कार्तवीर्याचे आख्यान । अलर्काचे विज्ञान । आयुयदूंचे उद्धरण । हेंचि वर्णन मुख्यत्वे ॥"

दत्त माहात्म्य
दत्त महात्म्य 

प्रस्तुत ग्रंथाची मंत्रमयता

श्रीमहाराजांचा प्रस्तुत ग्रंथ केवळ उपदेशपर साहित्य नसून ज्याच्या केवळ पठणाने जीवाचे कल्याण व्हावे अशा सामर्थ्याचा आहे. श्रीज्ञानेश्वरी  अथवा दासबोध यांच्यासारखाच तो ‘प्रत्ययो पहावा’ या योग्यतेचा आहे.

प.प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतींचे या ग्रंथांसंबंधीचे उद्गार पुढीलप्रमाणे आहेत,

"कर्ता धर्ता संहर्ता । विश्र्वाच्या जो तारी आर्ता । जो स्मरणे दु:खवार्ता । नुरवी भर्ता तो अमुचा ॥
तो आमुचा गुरुवर । त्याला जोडुनी दोनी कर । त्याचे चरणी ठेविले शिर । ज्याला सुरवर वंदिती ॥
तो हा परमात्मा श्रुतिगेय । नरसिंहसरस्वतीदत्तात्रेय । परब्रह्मसच्चिदानंदमय । निरामय अद्वितीय तो ॥
तोचि रची हा ग्रंथ । निमित्तमात्र वासुदेव येथे ॥ श्रवणे पठणे करवील स्वार्थ । हा यथार्थ भाविकांचा ॥"

तात्पर्य, सामान्यजनांना या ग्रंथातील उपदेशानुसार वागल्याने तर कल्याणाचा लाभ होईलच; पण ग्रंथाच्या केवळ पठनानेहि ईश्र्वरी कृपेचा लाभ होऊ शकेल. केवळ साहित्यिक दृष्टिनेही या ग्रंथला वाङमयीन क्षेत्रांत विशिष्ट स्थान लाभावे इतका तो प्रसादगुणाने परिपूर्ण आहे.

प्रस्तुत ग्रंथ बोधवादी साहित्याच्या क्षेत्रातील असला तरी त्यांचे साहित्यगुणहि आकर्षक आहेत. प्रसाद हा या ग्रंथांचा डोळ्यात भरणारा गुणविशेष असून अलंकार इतके सहजपणे साधले आहेत की, त्यांच्या गुंफणीत कृत्रिमतेचा अंशही नाही. विशेषत: पहिल्याच अध्यायात असलेले सती अनसूयेचे वर्णन या दृष्टीने पाहाण्यासारखे आहे.

शरणागतीचा मार्ग स्वीकारून प्रेमभक्तीच्या साधनाने सगुणसाकार भगवंताशी संबंध जोडल्यावर पशुपक्ष्यांचासुद्धा जर उद्धार होतो तर चांगल्या, विशुद्धजीवाचा उद्धार होईल हे काय सांगावयास पाहिजे? प्रस्तुत ग्रंथांत श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजांनी याच भक्तीमार्गाचा पुरस्कार व प्रतिपादन केलेले आहे. केवळ तत्त्वप्रतिपादन न करता भगवंताच्या व भगवद्भक्तांच्या लीलाकथांच्या रसाळ वर्णनांतून तत्त्वाचा आविष्कार केलेला असल्यामुळे वाचकांच्या चित्ताची ग्रंथ सहज पकड घेतो.

 प. प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतीस्वामीमहाराज
 प. प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतीस्वामीमहाराज

ईश्र्वराचे अस्तित्व

प्रस्तुत ग्रंथात प. प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतीस्वामीमहाराजांनी ज्यांचे माहात्म्य वर्णिले आहे. तो ईश्र्वर प्रत्यक्ष अस्तित्त्वात आहे की नाही असा प्रश्न अत्याधुनिक व स्वत:ला प्रागतिक समजणाऱ्या आजच्या शिक्षित मनाला पडतो. ईश्र्वरास्तित्त्ववादी लोक तर्कशास्त्रीय पद्धतीने ईश्र्वराचे अस्तित्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करून या प्रश्नाचे उत्तर देतातही. पण हा प्रश्न बुद्धिवादाच्या आश्रयाने वस्तुत: सुटणारा नसल्यामुळे तार्किकवादांनी कुणाचेच खरे समाधान होत नाही. ईश्र्वर हा वस्तुत: तर्कवादाचा विषय नसून तो अनुभूतीचा विषय आहे. पण अनुभूति म्हटले की, एकतर ती आहे त्या स्थितीतल्या आजच्या इंद्रियांना आली पाहिजे अथवा आजच्या विज्ञानाच्या संशोधनाचा आधार असलेल्या प्रयोगशाळांतून तेथील उपकरणांच्या द्वारे सिद्ध झाली पाहिजे असे आजच्या आक्षेपकांचे म्हणणे असते.

दुर्लभ मानवजन्म लाभला असता मनुष्याने त्याचे सार्थक करावे म्हणजेच तो जन्म देणाऱ्या ईश्र्वराचे अंशत: का होईना आपण उतराई झालो असे म्हणण्यास हरकत नाही व कृतघ्नताही आपल्या पदरी पडणार नाही.

मानव आपल्या प्रयत्नाने आपले स्वयंसिद्ध जे नारायणस्वरूप तेसुद्धा प्राप्त करून घेऊ शकतो व स्थावर योनीपर्यंत अधोगतीलाही जाऊ शकतो. सर्व योनी निर्माण करूनसुद्धा ईश्र्वराला समाधान वाटले नाही. म्हणून त्याने आपले स्वयंसिद्ध ईश्र्वररूप ओळखणारी मानव योनी निर्माण केली व त्याला समाधान झाले असे शास्त्रात म्हटले आहे. म्हणून मानवाने आपले ब्रह्म, परमात्मा किंवा भगवान असे विविध नामाने वर्णिलेले मूळ स्वरूप जाणण्याकरताच इतर सर्व प्रयत्न टाकून अहोरात्र झटले पाहिजे. म्हणजे सर्वात श्रेष्ठ असणारा ‘आत्मलाभ’ त्याला होऊन तो कृतार्थ होतो.

सच्चिदानंद ईश्र्वर हे आपले स्वरूप असूनही, अज्ञानाने त्याची विस्मृती आपणास झाली असल्याने, जागेपणी सार्वभौम राजा असून, स्वप्नात भिकारी होऊन नाना प्रकारची दु:खे भोगणाऱ्या राजाप्रमाणे सर्व जीवांची अवस्था झाली आहे. ती दैन्यावस्था दूर होऊन पुन: आनंदमय अशा सम्राट राज्यपदावर आरूढ करण्याकरताच ईश्र्वर, संतमहंत या रूपाने जगात अवतीर्ण होऊन त्याला आपल्या पूर्वस्वरूपाची स्मृतिरूप जागृती करून त्याचे दु:ख, दैन्य नाहीसे करून कृतार्थ करतो. 

आबालवृद्धांस सुलभबोध करून देणाऱ्या दत्तमाहात्म्य ग्रंथासारखा सर्वांग सुंदर ग्रंथ वाङमयात अपूर्वच आहे. महाराजांच्या स्वरूपाप्रमाणे हा ग्रंथही अत्यंत चित्ताकर्षक असाच आहे. कितीही वाचन झाले तरी ‘नित्य नवं नवं’ असाच तो आहे. सगुण स्वरूपसाक्षात्काराची ज्ञानशक्ती व वैराग्यरूपसाधने रसभरित वाणीने महाराजांनी यात सांगितली आहेत. महाराज अल्पकाम असल्याने देवाजवळ काही मागत नसत. परंतु या ग्रंथात सान्निध्य ठेवण्याकरता त्यांनी श्रीदत्तप्रभूंजवळ प्रार्थना केली आहे. ते म्हणतात,

‘हे प्रभो दत्तात्रेया, मी मागतो पसरूनी हात । ह्या ग्रंथी सतत सान्निध्य ठेवी ।’ (अ. ५१ ओ. ११०)

व या प्रार्थनेप्रमाणे दत्तमहाराजांचे या ग्रंथात सान्निध्य आहे. असा अनुभव वाचकांसही येतो. त्यांच्या इतर कोणत्याही ग्रंथात याप्रमाणे महाराजांनी प्रार्थना केलेली दिसत नाही. यावरून या ग्रंथाची थोरवी किती आहे, हे सहजच लक्षात येण्यासारखे आहे.

श्रीगुरुचरित्राप्रमाणे महाराजांनी दत्तमहात्म्याचेही एकावन्न अध्यायच केले आहेत. याची ओवी संख्या पाच हजार चारशे केली आहे. यात श्रीदत्तमहाराजांचे सांगोपांग चरित्र व सहस्त्रार्जुन, अलर्क, यदु, आयुराजा, परशुराम, प्रल्हाद वगैरे भक्तांची व तद्नुषंगाने अत्रि, अनसूया, रेणुका, जमदग्नी इत्यादिकांचीही चरित्रे अत्यंत रसाळवाणीने वर्णन करून स्वस्वाधिकारानुरूप साधकांचे भक्तिज्ञान, वैराग्य, निष्कामकर्म इत्यादी परमार्थमार्ग अत्यंत स्पष्ट व निश्चित स्वरूपाने वर्णिले आहेत. साल व कोयरहित आम्रादि फळांचा गाभा जसा सर्वच अमृतमय असतो तसाच हा ग्रंथ अगदी अमृतमय आहे. त्यामुळे त्याच्या निरंतर सेवनाने मूळचाच अमृत असणारा मानव अमृतमय होईल यात बिलकूल संशय नाही.

प. पु. श्री सद्गुरू श्री वासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराजांनी सर्व पुराणातील सार काढून श्रीदत्त पुराण या ग्रंथाची संस्कृत भाषेमध्ये रचना केली असून त्याची ज्ञान, कर्म व उपासना हि कांडे आहेत. कालमानानुसार समाजातील संस्कृतचे कमी ज्ञान होऊ लागल्याने शके १८२३ मध्ये (सन १९०१) त्यांनी श्री दत्त पुराणातील उपासना कांडावर 'श्री दत्त महात्म्य' हा प्राकृत ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे एकावन्न अध्याय असून पाच हजार चारशे ओव्या आहेत. श्री महाराजांनी यांत औपनिषद ज्ञान सांगितले असून ग्रंथात मुख्यत्वे नवविधा भक्ती, सहस्त्रार्जुन, अलर्क, आयु व यदु या चार भक्तांची चरित्रे व तत्वज्ञान यांचा समावेश आहे. शेवटच्या अध्यायात श्रीमहाराजांनी श्रीदत्तात्रेयांची प्रार्थना केली आहे कि या ग्रंथात प्रभूंनी सतत सानिध्य ठेवावे.

।।श्रीदत्तमाहात्म्य।।

श्रीदत्तमाहात्म्य या ग्रंथाची रचना भाविक जनांच्या आग्रहावरून महत्पूर येथे शके १८२३ (इ.स.१९०१) च्या चातुर्मासांत झाली असें श्री स्वामीमहाराजांच्या पत्रावरून कळते. त्यांतच पुढे ते म्हणतात, ‘(श्रीदत्तपुराणातील) तृतीयाष्टकापासून सहाव्याच्या सहाव्या अध्यापर्यंत आजपर्यंत (श्रावण शु।।११) ओव्या लिहिल्या. प्रायः प्रत्यहि एकशें आठ होत गेल्या. तेवढ्याचाच अध्याय ठेवला. उद्यां पन्नास अध्याय पुरा होईल. सुमारें साडेपाच हजार ग्रंथ झाला. आतां पुढें लिहिण्याची इच्छा होत नाहीं...’ यानंतर अवतरणिकेचा एक अध्याय झाला. असे एकूण ५१ अध्याय आहेत. गुरुचरित्राच्या अध्यायांचीच संख्या येते. ह्या सर्व अध्यायांची विषयसूचि इतरत्र दिली आहे. तसेच श्रीदत्तमाहात्म्याचे मराठी चिंतन दिले आहे

प. पू. योगिराज श्री गुळवणीमहाराज यांनी प्रकाशित केलेल्या श्रीदत्तमाहात्म्याचे संपादन पं. आत्मारामशास्त्री जेरे यांनी केले आहे. त्यांच्या शब्दांत ‘प्राकृत दत्तमाहात्म्यस्वरूप हीसुद्धां एक सर्वश्रेष्ठ अशी महाराजांची लीला आहे. आबालवृद्धांस सुलभबोध करून देणाऱ्या दत्तमाहात्म्य ग्रंथासारखा सर्वांगसुंदर ग्रंथ वाङ्मयात अपूर्वच आहे! सगुणस्वरूपसाक्षात्काराची ज्ञान, भक्ति व वैराग्यरूप साधने रसभरित वाणींने महाराजांनी यांत सांगितली आहेत. महाराज आप्तकाम असल्याने देवाजवळ काहीं मागत नसत. परंतु या ग्रंथांत सतत सान्निध्य ठेवण्यांकरीतां त्यांनी श्रीदत्तप्रभूंची प्रार्थना केली आहे. ते म्हणतात, ‘प्रभो दत्तात्रेया, मागतों पसरूनी हात। ह्याग्रंथी सतत सान्निध्य ठेवी।।’ (५१:११०) व या प्रार्थनेप्रमाणें दत्तमहाराजांचे या ग्रंथात सान्निध्य आहे असा अनुभव वाचकांसही येतो. यांत श्रीदत्तमहाराजांचें सांगोपांग चरित्र व सहस्रार्जुन, अलर्क, यदु, आयुराजा, परशुराम, प्रह्लाद वगैरे भक्तांची व तदनुषंगानें अत्रि, अनसूया, जमदग्नि इत्यादिकांचीही चरित्रे अत्यंत रसाळ वाणीने वर्णन करून स्वस्वाधिकारानुरूप साधकांचे भक्ति, ज्ञान, वैराग्य, निष्कामकर्मयोग इत्यादि परमार्थमार्ग अत्यंत स्पष्ट व निश्चित स्वरूपानें वर्णिले आहेत. साल व कोयरहित आम्रादि फळांचा गाभा जसा सर्वच अमृतमय असतो तसाच हा ग्रंथ अगदीं अमृतमय आहे. त्यामुळे याच्या निरंतर सेवनाने मूळचाच अमृत असणारा मानव अमृतमय होईल यांत बिलकुल संशय नाही. हा एकच ग्रंथ वाचकाच्या सर्व कामना पूर्ण करून त्याला परब्रह्म पदवी देणारा आहे.’ खुद्द श्रीस्वामीमहाराजांनीच ग्रंथाच्या शेंवटीं त्याच्या प्रयोजनाविषयी म्हटले आहे, ‘मंदां विशेंषेंकरून। नुमजे औपनिषदज्ञान। त्यांकरितां हे लेखन। करवी अत्रिनंदन दयाळू।। (५१:१०६) कलियुगातील अशक्त जीवांना उपनिषदांचे श्रवण, मनन, निदिध्यासनादि मार्ग अगम्य आहेत. तसेंच त्यांचा अधिकारही मर्यादित आहे. म्हणून गीतेच्या वचनाप्रमाणे स्त्रिया, वैश्य, शूद्र इत्यादि सर्व जीवांना ह्या ग्रंथाद्वारें श्रीस्वामीमहाराजांनी मोक्षाचा मार्ग प्रशस्त केला आहे. ह्या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायापासून ग्रंथाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक ओवीचे तिसरे अक्षर क्रमाने वाचल्यास मांडुक्योपनिषद, भद्रं कर्णेभिः व स्वस्ति नो हे शांतिमंत्र, ईशावस्योपनिषद्, पूर्णमदः..., अतो देवा अवंतु नो हे मंत्र साकार होतात. हें श्रीमहाराजांच्या वरील वचनाचेंच द्योतक आहे. पांचव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतील संपादकीय निवेदन मननीय आहे. ‘श्रीदत्तमाहात्म्य ग्रंथाच्या ह्या नव्या आवृत्तीची मुद्रितें शोधण्याचे काम पू. श्रीगुळवणीमहाराज यांच्या सांगण्यावरून केलें. काम जरा कठीणच होते. त्यास मुख्य कारणें तीन 

(१) श्री. प. प. श्रीटेंबेस्वामीमहाराज यांच्या हातची अशी प्रत तुलनेसाठी प्रमाण म्हणून हवी; ती उपलब्ध नाही. 
(२) मूळ ग्रंथाची रचना झाल्यावर त्याच्या हस्तलिखित वा मुद्रित आवृत्त्या अनेक झाल्या; त्यांत हस्तदोष, मुद्रणदोष झाले असणार ते सर्वच शुद्ध केले गेले असतील असे नाही. 
(३) या अडचणीत भर पडली ती ग्रंथाच्या योग्यतेमुळे. हा ग्रंथ सामान्य पुस्तकाप्रमाणे केवळ बुद्धीचा विषय नाही; हा मंत्रग्रंथ आहे. श्रीस्वामीमहाराजांनी लिहिलेल्या प्रत्येक अक्षरास विशेष महत्त्व आहे. तेव्हां शुद्धाशुद्ध पाठांचा विचार करीत असतां काय प्रकारची अडचण भासली असेल हे वाचकांच्या ध्यानांत आले असेल. हंसक्षीर न्यायानें ग्राह्याग्राह्य निर्णय कराव म्हटलें तर ही गोष्ट परमहंसपदास पोहोचलेल्या श्रीस्वामीमहाराजांच्या ग्रंथाच्या बाबतीत सामान्य माणसास न करतां येण्यासारखी आहे. तरीही दोष दूर करण्याचा यथामति यत्न केला आहे; कांही शंका पू. श्रीगुळवणीमहाराज यांना विचारून खुलासा करून घेतला आहे. त्यामुळे या खेपेस पाठ बराच शुद्ध झाला असावा असे वाटते. असे जरी असले तरी जे दोष अजूनही असतील त्याबद्दल ग्रंथरूपी, ग्रंथकृद्रूपी, वक्तृरूपी तसेच श्रोतृरूपी श्रीदत्तात्रेयगुरूंची क्षमा मागणे प्राप्त आहे. या कामीं, श्रीगुरुचरित्राच्या एका प्राचीन हस्तलिखित प्रतींत कांही ओव्या मिळाल्या त्यांचा उपयोग पू. श्रीगुळवणीमहाराज यांच्या अनुमतींने केला आहे. यांमुळें श्रीगुरुंचा संतोष होईल अशी आशा आहे. 

यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च व्यंजनम्। तत्सर्वं क्षम्यतां देव दत्तात्रेय जगद्गुरो।।१।।
लेखक विनवी श्रोत्यावक्त्या। मी दासानुदास तुमचा। लेखनीं स्फूर्तीची परिपूर्णता। नाही तत्त्वता ममांगी।।२।। 
मूळ ग्रंथ यथावत। तैसेचि लिहिता माझे हस्त। तथापि मात्राव्यंजनादिकाने बहुत पडले असति न्यूनाधिक।।३।। 
यालागी तुम्हां समस्तां चरणी। माथा ठेवितां म्या दीनवाणी। दृष्टी न द्यावी न्यूनपाणी। पूर्णपाणी अवलोकिजे।।४।। 
श्रीगुरुचे मामृत। अल्पमतीनें लिहिला ग्रंथ। सेवट लाविला तेणे येथ। आपुले सत्तेकरूनी।।५।।
आजिचेनि मी कृतकृत्य। धन्य माझे पूर्वार्जित। सद्गुरुसेवे पावले हस्त। देवसुत नरसिंह म्हणे।।६।। 
।।शुभं भवतु।।

श्रीदत्तमाहात्म्याची सप्ताहपद्धती

पहिल्या दिवशीं ६ अध्यायापर्यंत 
दुसऱ्या दिवशीं १४ अध्यायापर्यंत 
तिसऱ्या दिवशीं २२ अध्यायापर्यंत 
चौथ्या दिवशीं ३० अध्यायापर्यंत 
पाचव्या दिवशीं ३८ अध्यायापर्यंत 
सहाव्या दिवशीं ४६ अध्यायापर्यंत 
सातव्या दिवशीं ५१ अध्यायापर्यंत

श्रीदत्तमाहात्म्याचा विषयानुक्रम

१ मंगलाचरण, नवविध भक्ति, सृष्टिक्रमण, दत्तात्रेयाचे मातापिता, दीपकाख्यान.
२ योगभ्रष्ट पुत्राची कथा, कौशिकसतीचा सूर्याला शाप, देवाच्या विनंतीने अनसूयेचे आगमन.
३ कौशिकाचे संजीवन, मांडव्य ऋषींची सुटका, दत्तावतार.
४ कार्तवीर्याचा जन्म, गर्ग ऋषींचा त्याला उपदेश व दत्तमाहात्म्याचे कथन.
५ दैत्यांकडून पराभूत देवांची दत्तसेवा व दत्तप्रभूंकडून त्यांना स्वर्गाची प्राप्ती.
६ कार्तवीर्याची दत्तभेट, परीक्षा व त्याला दत्तप्रभूंचे वरदान व राज्यारोहण.मराठी चिंतन
७ कार्तवीर्याची विरक्ति, दत्तप्रभूंकडे आगमन, स्तुति, पुनःपरीक्षा व त्याचे प्रश्न.
८ बृहस्पति-इंद्र संवाद, सप्तगाथा, शिल्पज्ञ कथा, कामशास्त्रज्ञ ब्राह्मण कथा.
९ गायत्रीजापक सुशीलाची सात संमंधांपासून मुक्ति, विष्णुदत्ताची कथा.
१० रोगग्रस्त ब्राह्मणाला कर्मविपाकाचा उपदेश व त्याला आरोग्य, झोटिंगाचे बंधन, शास्त्रतत्त्वनिरूपण.
११ जीवाचे विविध योनींत भ्रमण, गर्भवास, अवस्था, लक्षण, जडपुत्राला आश्वासन.
१२ सृष्टिक्रम, व्यष्टि-समष्टि, विक्षेप-आवरण, सदाचरण, गुरुसेवा, श्रवण, मनन, परोक्षापरोक्ष ज्ञान, जीवरूपाचे वर्णन.
१३वाक्यविवरण, षड्लिंग व तत्त्वपदार्थ, तत् व त्वं यांचे ऐक्य, यांचे निरूपण.
१४ अष्टांगयोग, यम, नियम, आसन, प्राणायाम यांचा राजाला उपदेश.
१५ अवधूतज्ञान, सजातीयप्रत्ययलक्षण, विजातीयनिरसन, निदिध्यासन यांच्या अभ्यास्याने समाधीचा राजाला उपदेश व त्याला समाधिलाभ.
१६ राजाला अनासक्त प्रारब्ध भोगण्याचा उपदेश व पाठवणी. कार्तवीर्याकडून समुद्राचे गर्वहरण, यज्ञ, दानादिक अनुष्ठाने.
१७ अतिथिरूप सूर्याला वृक्षांचे दान व त्यामुळे वसिष्ठांचा राजाला शाप.
१८ ऋचीक-सत्यवती विवाह, जमदग्नि व विश्वामित्र यांचा जन्म.
१९ परशुरामावतार, मातेची हत्या व संजीवन, पितृसेवा.
२० कार्तवीर्याचे जमदग्नींच्या आश्रमांत आतिथ्य व राजाकडून कामधेनुचे हरण.
२१ परशुरामाचे व कार्तवीर्याचे युद्ध व अर्जुनाचा वध, पित्याकडून त्याला दूषण व प्रायश्चित्तासाठी तीर्थयात्रेची आज्ञा.
२२ अर्जुनाच्या पुत्रांकडून जमदग्नींची हत्या, रेणुकेचा शोक, रामाचे आगमन व शत्रूचे हनन.
२३ मातापित्यांना घेऊन परशुरामाचे दत्ताश्रमांत आगमन, रेणुका  दत्त यांची परस्परांची स्तुति, रेणुकेचे सहगमन.
२४ रामाला क्रियाकर्मानंतर मातापित्यांचे पुनर्दर्शन, रामाकडून क्षत्रियहनन, कश्यपाला भूमिदान व समुद्रतीरी वास.
२५ गालवाच्या यज्ञरक्षणासाठी ऋतुध्वजाचे पातालकेतुसह युद्ध, पातालगमन व गंधर्वकन्या मदालसेची भेट.
२६ ऋतुध्वजाचा मदालसेशी विवाह व नगरास आगमन, पातालकेतुच्या भावाच्या कपटाने मदालसेचा अग्निप्रवेश.
२७ विरहातुर राजाचे नागपुत्राशी सख्य व त्यांच्याद्वारे अश्वतर नागाला राजाच्या व्यथेचे ज्ञान. नागाला सरस्वतीचा वर तसेंच शिवप्रसादाने मदालसेची प्राप्ती. 
२८ अश्वतर नागाकडून मदालसेचे राजाला दान व पुत्रप्राप्ती. पुत्राला मातेचा तत्त्वबोध.
२९ पुत्राचे जाड्य पाहून राजाचा शोक, मातेकडून ज्ञानप्राप्तीचे पुत्राकडून कथन, राजाचा कोप व मदालसेपुढे प्रवृत्तिमार्गाची स्तुती.
३० राजाच्या इच्छेनुसार अलर्काला व्यवहारज्ञान व त्याला साम्राज्य. त्याचा अधःपात पाहून सुबाहूचे त्याच्याशी युद्ध.
३१ अलर्काचा पराजय व मातृवचनास अनुसरून दत्तप्रभूंकडे गमन व बोध.
३२ अलर्काला तत्त्वज्ञानाचा तसेच मनोभंग व वासनाक्षय यांच्या उपायांचा तसेच अष्टांगयोगाचा उपदेश.
३३ धारणा, अभ्यासाचे दोष व गुण.
३४ अणिमादि सिद्धिंचा निषेध, सगुण व निर्गुण ध्यान, योगचर्या व भिक्षा यांचे निरूपण.
३५ योगसाधन, नादानुसंधान, प्रणवध्यान, $काराच्या साडेतीन मात्रा.
३६ मृत्युज्ञान व क्रममुक्ती.
३७ अलर्काची दत्तस्तुति, बंधूच्या उपकाराची जाणीव व दत्ताज्ञेनें बंधूभेट.
३८ सुबाहूचा काशीराजाला उपदेश व वनांस गमन. अलर्काच्या पुत्रास राज्याभिषेक व अलर्काचे वनांस प्रयाण.
३९ आयुराजाची पुत्रप्राप्तीकरीतां दत्तसेवा व दत्तप्रसाद.
४० राणीची गर्भधारणा व स्वप्नांत दत्तदर्शन. हुंडासुराच्या प्रयत्नांस अपयश व दत्तकृपेने नहुषाचा जन्म.
४१ नहुषाचे हरण, त्याचे रक्षण व वसिष्ठाश्रमांत संगोपन.
४२ पुत्र दिसेनासा झाल्याने राणीचा व आयुराजाचा शोक.
४३ दत्तप्रेरणेने नारदाचे आगमन व उपदेश.
४४ नहुषाला वनांत आकाशवाणी व वसिष्ठांकडून स्वतःच्या इतिहासाचे ज्ञान व देवांच्या साहाय्याने हुंडासुरावर आक्रमण.
४५ हुंडासुराचा वध, नहुष व अशोकसुंदरीचा विवाह व मातापित्यांशी भेट.
४६ ययाती-देवयानीचा विवाह, ययातीचा शर्मिष्ठेशी संयोग व शुक्रशापाने वार्धक्य, पुरूनें वार्धक्य घेतल्याने त्याला राज्य, दुःखित यदुची वनांत दत्ताशी भेट.
४७ यदु-अवधूत संवाद, पृथ्वी, वायु आणि आकाश यांचे उपादेय गुण.
४८ जल, अग्नि, चंद्र, सूर्य व कवडा यांच्यापासून घेतलेले शिक्षण.
४९ अजगर, समुद्र, पतंग, मधुकर, गज, मृग, मत्स्य यांचे हेयलक्षण गुण.
५० पिंगला (वेश्या), टिटवी, बालक, स्त्रीकंकण, सर्प, शरकार, पेशस्कार, कोळी. देहापासून शिक्षण.
५१ अवतरणिका.

या ग्रंथाची पारायणे भाविक श्री गुरुचरित्र या ग्रंथा प्रमाणे नित्य करत असतात. 

दत्त महात्म्य एक प्रभावी उपासना

दत्त माहात्म्य हा ग्रंथ अतिशय सामर्थ्यशाली आणि दत्त महाराजांचे सान्निध्य असलेला असा आहे, थोरल्या महाराजानी दत्त महाराजानां मागतो मी पसरुनी हात । ह्या ग्रंथी सतत सान्निध्य ठेवी ।। अशी विनवणी केली आहे. एकावन्न अध्याय आणि प्रत्येक अध्यायात १०८ ओव्या असे याचे स्वरूप आहे. थोरल्या महाराजांनी ह्या ग्रंथात ३९ व्या अध्यायापासून ते शेवटपर्यंत अनेक मंत्र गुंफले आहेत यात मांडुक्य, ईशावास्य हि उपनिषदे आणि शांतिपाठ, विष्णुसूक्तातील काही मंत्र समाविष्ट आहेत. थोरले महाराज हे अनधिकारी व्यक्तीकडून शास्त्राज्ञेचे उल्लंघन होऊ नये म्हणून जागरूक असत आणि त्या करिता अशा मंत्रांची गुंफण अनेक ग्रंथांमधून करीत असत. हेतू हा कि मंत्रांचे पठण व्हावे. महाराजांनी महत्पूरला ह्या ग्रंथाची रचना केली. संस्कृत भाषेत असलेले दत्त पुराण सामान्य जनांना सुलभ व्हावे म्हणून त्यांनी ह्या ग्रंथाची रचना केली. वाचनास सुरुवात करताच या ग्रंथाचे सामर्थ्य अनुभवास येते. काही पारायणे होताच बदलत चाललेल्या आयुष्याचा आपण मागोवा घेऊ शकतो. या ग्रंथाच्या सामर्थ्याची अनुभूती घ्यावयाची असल्यास रोज एक अध्याय वाचीत जावे. एका अध्यायाला केवळ पंधरा मिनिटे लागतात. वाईट स्वप्ने किंवा रात्री घाबरून उठणे यावर हा ग्रंथ उशाशी घेऊन झोपावे. 

श्री कार्तवीर्य - दत्त माहात्म्य
दत्त महाराज आणि कार्तवीर्य अर्जुन

श्री कर्तविर्यार्जुन, शिष्योत्तम दत्त भक्ती 

दत्त माहात्म्यात, दत्तभक्ती रसात अनेक भक्त न्हाऊन निघाले पण प्रत्यक्ष दत्त महाराजांनी आलिंगन दिले ते केवळ कार्तवीर्य अर्जुनालाच. कधी कधी विचार करतो कि जिथे स्वप्नात दृष्टांत मृगजळासम आहे तिथे प्रत्यक्ष दर्शन आणि त्यातही आलिंगन! अनंत जन्मांची पुण्याई म्हणजे काय ते या उदाहरणावरून कळून येते. दत्त महात्म्याच्या सहाव्या अध्यायात हि आलिंगनाची अवस्था वर्णन केली आहे. थोरले महाराज म्हणतात, 

दृढ घेई देवाचे आलिंगन । आलिंगिता द्वैतभान । जाऊन निश्चळ राहिला ।। 

आलिंगन घेताच कार्तवीर्याची हि अवस्था लक्षात घेऊन दत्त महाराज पुन्हा त्यावर मायेचे आवरण घातले. कारण हि तर त्याच्या या स्मरणभक्तीची सुरुवात होती. वरदान मिळाल्यानंतर कार्तवीर्याने चौऱ्याऐशी सहस्त्र वर्षे राज्य केले आणि नंतर एके दिवशी शय्येवर बसून तो विचार करू लागला मी दत्त महाराजांकडे काय मागितले तर ऐहिक समृद्धी, एकसंध राज्य कारभार चालविण्याची योग्यता, काय करून बसलो हे? आणि पुन्हा तो दत्त महाराजांकडे शरण आला, त्याची परीक्षा घेऊन आणि हा आता उपदेशाला योग्य आहे हे ठरवून दत्त महाराजांनी त्याला योगमार्गाचा उपदेश केला. त्याच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आणि त्याची पहिली समाधी तीन दिवस लागली, पुन्हा आळस सोडून योगमार्गाचा अभ्यास केला तेव्हा बारा दिवस समाधी लागली आणि पुन्हा अभ्यासाने तीन महिने समाधी लागली. यानंतर दत्त महाराजांना भेटावे असे वाटून तो गुहेच्या बाहेर आला आणि त्याने दत्त महाराजांची भेट घेतली. इथे दत्त महाराजांनी पुन्हा कार्तवीर्याला आलिंगन दिल्याचे वर्णन आहे. 

येऊनी वंदी श्रीदत्ताते । आलिंगूनी तयाते । वदे दत्त काय तूते । कळले ते माते सांगावे ।।

दत्त महाराज आणि कार्तवीर्य अर्जुन यांचे गुरु भक्ताचे नाते भक्तीचा परमोच्च बिंदू दाखवून देते. कार्तवीर्याची योग्यता म्हणजे आजही हरविलेल्या वस्तूकरिता किंवा व्यक्तींकरिता नमस्ते कार्तवीर्याय हा जप केला जातो आणि याचे फळ निश्चित मिळते.