श्री क्षेत्र माणगांव

स्थान: जिल्हा सिंधुदूर्ग - कुडाळपासून १४ कि. मी.
सत्पुरुष: श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी 
स्थळ विशेष: प. पू. टेंबे स्वामींचे जन्मस्थळ, महाराज स्थापित दत्तमूर्ती, टेंबेस्वामींची मूर्ती व पादूका, ध्यान गूहा

माणगांव
श्री दत्तमंदीर, माणगांव

श्री क्षेत्र माणगांव हे सिंधूदूर्ग जिल्ह्यात कुडाळपासून १४ किमी अंतरावर आहे. श्री दत्तात्रेयांचे प्रात:स्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची जन्मभूमी. याभूमीने श्री टेंबे स्वामी महाराज व त्यांचे बंधू सिताराम स्वामी असे दोन सत्पुरुष आपणास दिले. सदर गाव अतिशय छोटेसे असले तरी ती पूण्यभूमी आहे. 

वेदशास्त्रसंपन्न हरिभट्टांचे चिरंजीव गणेशभट्ट व त्यांच्या सुशील पत्नी रमाबाई हे दांपत्य माणगांवी रहात असतांना गणेशभट्ट गाणगापूरी जाऊन आपल्या आराध्य दत्तात्रेयांची १२ वर्ष सेवा करत राहिले. एका शुभदिनी त्यांना दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला व महाराज म्हणाले ‘आम्ही आपणावर प्रसन्न आहोत आता आपण, ग्रहस्थाश्रम पुढे चालवावा. आम्हीच आपल्या घरी पुत्र रूपाने जन्मास येऊ’. सदर साक्षात्कारानंतर गणेशभट्ट पुन्हा माणगावी परतले व संभवामी युगे युगे श्रावण कृ.५, इ.स. १८५४ या दिवशी त्यांना पुत्ररत्न झाले. त्याचे नाव वासुदेव असे ठेवले. दुसऱ्या वर्षीपासून खाजगी शिक्षण सुरु झाले. ५ व्या वर्षी हरिभट्टांकडून धार्मीक शिक्षण घेऊ लागले. ८ व्या वर्षी मौजीबंधन झाले. १२ व्या वर्षी ऋग्वेद संहितेसह अध्ययन झाले आणि दशग्रंथी वासुदेव भटजी म्हणून त्यांची ओळख झाली. वडिलांकडून आलेला दत्तभक्तीचा वारसा पुढे नेत त्यांचे नृसिंहवाडीत जाणे येणे आणि वास्तव्य वाढले. त्यातच त्यांना नृसिंहसरस्वतींचा अनुग्रह प्राप्त झाला आणि आज्ञा झाली. आपण माणगावी जाऊन दत्तमंदिराची स्थापना करावी. नृसिंहवाडीहून माणगावी जात असता मार्गात कागल येथे एक मूर्तीकार भेटला व एक दत्तमूर्ती आपणास द्यावी अशी इच्छा व्यक्त केली. वासूदेव भटजी म्हणाले माझ्याकडे पैसे नाहीत तर आपण सावकाश हप्त्याहप्त्याने जसे जमेल तसे पैसे द्यावे असे सांगितले व ती मूर्ती घेऊन वासुदेव भटजी माणगांवी पोहोचले. ग्रामस्थांना दृष्टांताची माहिती मिळताच सर्वांना अत्यानंद झाला. माणगाव निवासी एका वृद्धेला स्वप्न दृष्टांत झाला की आपली जमीन दान करावी त्यानुसार त्यांनी ती जमीन वासुदेव भटजींना दान केली.

टेम्बेस्वामी
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी

प. पू. टेंबेस्वामींनी स्वत:च ग्रामस्थांच्या मदतीने छोटेखानी दत्तमंदीर बनविले तेथे दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली तेच सध्या अस्तित्वात असलेले दत्तमंदीर. नंतरच्या काळात हळूहळू सदर मंदिराचे जीर्णोद्धाराचे कार्य ट्रस्ट तर्फे करण्यात आलेले आहे. या मंदीराच्या प्रदक्षणेच्या मार्गात दोन्ही बाजूस १-१ असे दोन लाकडी खांब आहेत ते स्वामी महाराजांनी अभिमंत्रीत केलेले आहेत. त्यांच्या केवळ स्पर्शाने कुठल्याही प्रकारच्या बाधेचे निरसन होते. आज त्या मंदीरातच श्री वासुदेवानंद सरस्वतींचीही मूर्ती ठेवण्यात आली आहे. येथे संस्थान मार्फतच दत्तभक्तांना अभिषेक, पालखी, अन्नदान व जीर्णोद्धार या सारख्या सेवांमध्ये अर्थदानाने संमिलीत होता येते. श्री स्वामी महाराजांनी दत्ताज्ञेनुसार मंदीर स्थापनेपासून ७ वर्षांनी माणगाव सोडले ते परत कधीच माणगावात आले नाहीत.

या मंदिरासमोरच पुरातन काळचे यक्षीणीचे मंदीर आहे. यक्षीणी महात्म्य या ग्रंथात महाराजांनी दिलेले अभिवाचन पूर्ण करण्यासाठी श्री वासुदेवांचा जन्म येथे माणगावी झाला. हे यक्षीणी मंदीर अत्यंत जागृत स्थान आहे.

यक्षीणी मंदिराचे उजवे बाजूस श्री स्वामी महाराजांचे जन्मस्थान आहे. पूर्वीच्या जागेचा जिर्णोद्धार करून श्री स्वामींचे मंदीर येथे बनविण्यात आलेले आहे. त्याठिकाणी अत्यंत नयन मनोहर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची पूर्णाकृती मूर्ती (अंदाजे ५-५॥ फूट उंचीची) बनविण्यात आलेली आहे. तेथेच अहिल्यादेवी होळकर यांनी स्वामींच्या पायाच्या मापाच्या सर्व योगचिन्हांकीत पादूका स्थापीत केलेल्या आहेत. तेथेच त्यांची यथासांग पूजा होते. स्वामींच्या मूर्तीच्या गळ्यातील हारात श्लोक लिहिलेला आहे तो नृसिंहवाडीचे श्री दिक्षीत स्वामी यांनी लिहिलेला आहे. जन्मस्थानाची परम पवित्र वास्तु अत्यंत प्रासादिक आहे.

ध्यान गुंफा माणगाव
वासुदेवानंद सरस्वतींची ध्यान गुहा

ध्यान गुहा

श्रींच्या मंदीरापासून १५-२० मिनीटाच्या अंतरावर अवघड पायवाटेने झाडे झुडपे पार केल्यानंतर श्री वासुदेवानंद सरस्वतींची ध्यान गुहा आहे. या ठिकाणीच ध्यान धारणा करून श्री स्वामी महाराजांनी दत्तमहाराजांना प्रसन्न करून घेतले. मुंबईचे एक सिध्द पुरुष श्री सदानंद ताटके उर्फ़ आनंदस्वामी यांनी गुहेपर्यंत पायऱ्या करून घेतल्या आहेत. गुहा म्हणजे दोन दगडांमधील पोकळी आहे. ही नैसर्गिक गुहा साधारण १५ X १५ आकाराची असून आत छोटीशी वासूदेवानंद सरस्वतींची मूर्ती आहे. येथे २४ तास पणती तेवत असून तेथे साधकांस अत्यंत अनुभव येतात. उच्च कोटीची स्पंदने जाणवतात. मन:शांती काय असते याचा खरा अनुभव येथे जाणवतो. दत्त भक्त येथे जप, ध्यानधारणा, गुरुचरित्र पारायणही करताना जाणवतात. महापौर्णिमेस येथे सत्य दत्ताची पूजा असते. ५-६ हजार लोक प्रसादास येतात.

संस्थानचा कारभार विश्वस्त मंडळातर्फे होतो. येथे पालखी, अभिषेक, पारायण, अन्नदान सेवा दत्तभक्त करू शकतात. येथे भोजन व निवासाची सोय आहे. मुंबई गोवा महामार्गावर सावंत वाडीस उतरून माणगावला जाता येते. श्रीमन नृसिंह सरस्वतींच्या आज्ञेने हे दत्तमंदीर निर्माण झाले व त्याचा जिर्णोद्धार व विस्तार केला. सध्या मोठे भक्तनिवासाचे बांधकाम सुरु आहे.

माणगाव
श्री क्षेत्र माणगांव दत्तमंदीर

मांणगाव दत्तमंदिर- पालखी परंपरा

एखाद्या स्थानाचे महत्व निश्चित झाल्यावर बाकीच्या सर्व तद्नुषंगिक गोष्टी आपोआपच जमुन येतात. अगोदरच श्रीवासुदेवशास्री यांची एक साधुपुरुष म्हणुन ख्याती पसरली होती. आता श्रीदत्तमंदिराची स्थापना झाल्यापासून लोकांची ये-जा वाढली होती. दररोज काकड आरती, पूजा नैवेद्य, धुप व शेजारती हे सोपस्कार आपोआपच सुरु झाले. दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढतच गेली.भक्तमंडळींनी एक सुंदर लाकडी पालखी तयार करून मंदिराला अर्पण केली. पालखी आतल्या बाजूने मखमली कापडाने मढवलेली होती.त्यात गादी व तक्या होता. वर छानपैकी पितळी छत्र होते. पालखीचा दांडा रेशमी कापड वेष्टुन सजविला होता. दर शनिवारी पालखी निघू लागली. त्यामुळे प्रत्येक शनिवारी श्रीक्षेत्र माणगावला फार मोठा समारंभच होऊ लागला.

ही पालखीची प्रथा अगदी सहजच सुरु झाली. एका भाविकाने एकदा नम्रपणे बुवांना असे सांगितले की, "शनिवारी पालखी निघावी अशी भक्तांची इच्छा आहे." त्याचे हे म्हणणे ऐकताच बुवांनी मोठ्या आनंदाने या गोष्टीला होकार दिला. त्यामुळे त्यांच्या संमतीने दर शनिवारी त्यांच्याच देखरेखी खाली पालखी निघू लागली.

आरती संपल्यानंतर उत्सवमूर्ती पालखीत ठेऊन देवळाभोवती तीन प्रदक्षिणा घालीत असत. ही पालखी निघण्यापूर्वी ग्रामदेवता श्रीयक्षिणीची पालखी प्रथम देवळाजवळ येत असे आणि त्यानंतर श्रीदत्तमहाराजांची पालखी निघत असे.परंतु श्रीयक्षिणीची पालखी श्रीदत्तमंदिराकडे आणण्याला प्रथम प्रथम त्या मंदिरांच्या व्यवस्थापकांचा विरोध होता. हा विरोध दूर व्हावा म्हणून बुवांनी जाऊन श्रीदेवींची प्रार्थना केली. त्यामुळे श्रीदत्तमंदिराकडे पालखी नेण्याबद्दल व्यवस्थापकांना दृष्टांत झाला. त्याप्रमाणे सर्व विरोध दूर होऊन नियमाने पालखी येऊ लागली.

अशा रीतीने दोन्ही पालख्या मंदिराबाहेर काढून तीन प्रदक्षिणा घालण्यास सुरवात होत असे. पालखी बरोबर काठी घेणारे, चवरी व मोरचेल धरणारे, आणि पदे म्हणणारे अशी नित्याची दहा- पंधरा मंडळी असत. शिवाय त्यावेळी इतर लोकांचाही चार-पाच हजारापर्यंत समाज एकत्र जमत असे. पालखी सुरु झाली की, उत्सवमूर्ती पुढे अनेक भक्तीपर पदे, अभंग, स्तोत्रे इत्यादी म्हटली जात. यावेळी संगीताची बाजु चि. भलोबा म्हणजे श्रीशास्रीबुवांचे धाकटे बंधु श्रीसीतारामबुवा सांभाळीत असत. त्यावेळी चि. भलोबाचे वय सहा वर्षाचे होते. पालखीच्या तीन प्रदक्षिणा पूर्ण होण्याला पाच ते सात तास लागत, एवढा लोकांचा उत्साह मोठा असे. एकंदरीत हा पालखीचा सोहळा अत्यंत चित्ताकर्षक, प्रेक्षणीय, व मनमोहक असा वाटत असे. 

दत्त मंदिर माणगांव
दत्त मंदिर माणगांव 

पालखीच्या सोहळ्याचा उत्साह दिवसेंदिवस वाढतच चालला होता. या सोहळ्यासाठी असंख्य भक्तगण श्रीदेवांसमोर पेढे, बर्फी, खारीक, नारळ उदबत्ती, कापूर इत्यादी जिनसा इतक्या अपार प्रमाणात आणून ठेवीत असत की, त्यांचा जणुकाही पर्वतप्राय ढिगच पडला आहे असे वाटत असे. पालखी संपल्यावर श्रीदेवांपुढे आलेले सर्व पदार्थ प्रसाद म्हणून सर्वाना वाटीत असत. श्रीदेवांपुढे धान्य सुध्दा खूप मोठ्या प्रमाणावर जमा होत असे. त्या जमा झालेल्या धान्याचा भंडारा होऊन सर्वांना प्रसाद मिळत असे.

वास्तविक श्रीदेवांचे वैभव अशा प्रकारे दिवसेंदिवस वाढत होते, तरी पूजाअर्चा सोडून इतर कोणत्याही बाबतीमध्ये बुवा लक्ष घालीत नसत. ते अगदी अनासक्त वृत्तीने सर्व व्यवहार करीत असत. सर्वच बाबतीत बुवांची वृत्ती अत्यंत निःस्पृह होती व आपण स्वतः घालून घेतलेल्या व इतरांना घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे याबाबत त्यांचा कटाक्ष असे. एकदा श्रीरामभाऊ सबनीसानी बुवांना एक धोतराचे पान दिले. बुवा नेहमी पंचा वापरीत असत. त्यामुळे श्रीरामभाऊनी दिलेल्या धोतराचे त्यांनी फाडून पंचे केले व ते वापरले.

अशा प्रकारे श्रीदेवांच्या इच्छेप्रमाणे श्रीक्षेत्र माणगाव येथील अर्चन फारच उत्तम प्रकारे व व्यवस्थित रीतीने चालू होते. त्याचप्रमाणे भगवान श्रीदत्तात्रेयांच्या सांगण्याप्रमाणे व आदेशाप्रमाणे येणाऱ्या पीडित व आर्त लोकांना त्यांच्या त्यांच्या कामाप्रमाणे योग्य ते अनुष्ठानादी उपासना व उपाय सांगून बुवा त्यांना त्यांची अडचण दूर होऊन, त्यांचे कार्य पूर्ण होईल असे आश्वासन देत असत. बुवांना श्रीदत्तात्रेयांचा वरप्रसाद असल्यामुळे त्यांच्या कृपेमुळे सर्व लोकांच्या कामना पूर्ण होत असत. भगवान श्रीदत्तात्रेयांनी या देवस्थानच्या संरक्षणार्थ आपले गण ठेवले होते. त्यामुळे तेथे येणाऱ्या लोकांपैकी कोणी ही जरी कसलाही गुन्हा केला तरी तो तात्काळ उघडकीला येत असे.

यक्षिणी देवी मन्दिर, माणगाव

श्री दत्त महाराजांच्या ईच्छेनुसार श्री प. प. नृसिंह सरस्वती महाराजांचा पुढील अवतार हा माणगांवी झाला. तो अवतार अर्थातच श्री गणेशभट्ट व सौ. रमाबाई यांच्या पुत्ररुपाने! अर्थातच वासुदेवशास्त्री टेंब्ये म्हणजेच संन्यासानंतरचे श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (श्रावण कृष्ण पंचमी इ.स.१८५४ साली)!

श्री याक्षणी मंदिर माणगांव
श्री याक्षणी मंदिर माणगांव 

साक्षात श्री प. प. नृसिंह सरस्वतींच्या सेवेत असणा-या योगिनींपैकी यक्षिणी देवी एक प्रमुख देवता होती. श्री प. प. नृसिंह सरस्वतींनी सांगितल्याप्रमाणे पुढील अवतारापूर्वी “तू आधी माणगांवी जाऊन तेथे गांव वसव कारण माझा पुढील अवतार माणगांवी होणार आहे”. त्यांच्या ईच्छेने माणगांवची ग्रामदेवता श्री देवी यक्षिणी झाली. संपूर्ण भारतात श्री देवी यक्षिणी देवीचे एकमेव मंदिर देखील माणगांवीच आहे. श्री प. प. टेंब्ये स्वामी व श्री प. पू. ब्र. सीताराम महाराज यांचे जन्मस्थान व ग्रामदेवता श्री यक्षिणी मंदिर हे जवळच आहेत.

श्री देवी यक्षिणी मंदिरामध्ये साजरे होणारे उत्सव,

    १)     चैत्र शुद्ध १ ते १० रामनवमी
    २)     आश्विन शुद्ध १ ते १० विजया दशमी
    ३)     कार्तिक शुद्ध ५ ते १२ सप्ताह
    ४)     त्रिपुरी पोर्णिमेच्या दुस-या दिवशी जत्रा
    ५)     माघ वद्य ८ वर्धापन दिन

श्रीक्षेत्र माणगाव विशेष

श्रीदत्त संप्रदायामध्ये श्रीमत परमहंस परिव्राजकार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे (थोरले महाराज) कर्तृत्व व स्थान मोठे आहे. थोरल्या महाराजांनी श्रीदत्तात्रेयांचा प्रथम अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान पीठापूर (आंध्र प्रदेश) आणि त्यांची कर्मभूमी कुरवपूर ही स्थाने, तसेच श्रीदत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असणाऱ्या श्रीनृसिंह सरस्वती यांचे कारंजा येथील जन्मस्थान शोधून सर्व भक्तांसाठी खुले केले. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा मंत्र संपूर्ण विश्वाला दिलेला आहे. अशा महाराजांचे जन्मगाव हे माणगाव होय. त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे. त्यांची संकल्पशक्ती, त्याग, ज्ञान, ईश्वरनिष्ठा, श्रीदत्ताज्ञापालननिष्ठा हे सर्वच अलौकिक आहे. त्यांनी उभ्या जीवनात पायी व तेही अनवाणी, मोजक्या वस्त्र-वस्तूंसहित संपूर्ण भारतभर केवळ श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या आदेशानुसार प्रवास केला. त्यांच्या भ्रमणात देवदेवता, पवित्र तीर्थे यांचे सान्निध्य व परमानंदाचा अनुभव असे. सदैव ध्यान, तपश्चर्या, लेखन, प्रवचन असा त्यांचा नित्यक्रम असे.

श्रीस्वामींचे लिखित साहित्य हा अर्वाचीन काळातील चमत्कारच आहे. शंकराचार्यानंतर इतकी विपुल ग्रंथसंपदा थोरल्या महाराजांनीच निर्माण केली आहे. भारतीय तत्त्वज्ञान, चिंतन व ध्येयवादीची पताका त्यांच्या लिखित साहित्य रूपाने झळकत आहे. त्यावर अनेक प्रबंध तयार होतील. अशी त्यांची व्याप्ती व श्रेष्ठता आहे. ‘हे मी लिहिले’ असे त्यांनी कधीही म्हटले नाही. मला अक्षरे जशी समोर दिसतात, तशी मी कागदावर उतरवून घेतो असे ते सांगत.  वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांनी द्विसाहस्त्री गुरुचरित्र, सप्तशतीगुरुचरित्र, त्रिशती गुरुकाव्य, श्रीदत्तपुराण, श्रीदत्त माहात्म्य, श्रीदत्तचंपू, शिक्षात्रयम (कुमारशिक्षा, युवाशिक्षा, वृद्धाशिक्षा) तर पंचपाक्षिक हा ज्योतिषशास्त्रविषयक संस्कृत ग्रंथ तयार केला व पंचपाक्षिक जोतिषाची स्वत:ची अशी पद्धत तयार केली. तसेच स्त्री शिक्षा, लघुमननुसार (मराठी), माघमाहात्म्य (मराठी) हे ग्रंथ मराठीत तयार केले. याचबरोबर श्रीघोरात्कष्टोधरण स्तोत्र, पंचपदीसह करुणात्रिपदी, नित्य उपासनाक्रम, श्रीदत्तात्रेय षोड्शावतार चरित्र, श्रीसत्यदत्तपूजा व कथा लिहिल्या आहेत. नृसिंहवाडीला गेले असता तेथे गोविंदस्वामी या ज्ञानी संन्यासाचा कृपानुग्रह होऊन श्रीदत्त संप्रदायाची दीक्षा आणि गुरुमंत्र वासुदेवशास्त्रींना लाभला.

‘उत्तरेस जा’ या आज्ञेवरून संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी त्यांचा अनवाणी पायी प्रवास झाला. या काळात त्यांनी २३ चातुर्मास पूर्ण केले. विविध ग्रंथांची, स्तोत्रांची, आरती व्रतवैकल्ये, पदे आदींची श्रीदत्त महाराजांच्या कृपेने निर्मिती झाली. असे हे स्वामी महाराज संन्यासाश्रमाचा आदर्श, मूर्तिमंत वैराग्य, एकांतिक दत्तभक्ती, आयुष्यभर सगुणोपासना करणारे, उत्तम वैद्य, मंत्रसिद्धी, यंत्रतंत्र सिद्धियुक्त, उत्कृष्ट ज्योतिषी, मराठी व संस्कृत अध्यात्मिक साहित्य निर्मितीकार, प्रतिभावान व परतत्त्वस्पर्शी सिद्धकवी, उत्कृष्ट वक्ता, सिद्ध हठयोगी व उत्कट दत्तभक्त होते.

अशा या थोर विभूतीचे जन्मगाव व जन्मस्थान तसेच आयुष्यातील पहिली ३५ वर्षे याच माणगाव या क्षेत्री गेली. श्रीस्वामी महाराजांच्या वास्तव्यामुळे ही भूमी पवित्र व पावन झाली आहे. माणगाव हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्य़ामध्ये कुडाळ आणि सावंतवाडीजवळ आहे. येथे भव्य दत्तमंदिर असून मंदिरामागे गुहा आहे. येथे भक्त निवास असून भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे.

या क्षेत्री असे जावे

माणगाव (सिंधुदुर्ग, कोकण महाराष्ट्र)-

योगीराज प. पु. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांचे हेजन्मगाव. दत्तभक्त श्री गणेश शास्त्री आणि सौ. रमाबाई या ब्राह्मण दांपत्यांच्या पोटी श्रावण कृष्ण पंचमी शके १७७६ (दि.१३/०८/१८५४) रोजी माणगावी स्वामीचा जन्म झाला. ते दत्तअवतारी सिध्द पुरुष होते. कारण गणेश शास्त्रींना गाणगापूरी सद्गुरू दत्तात्रेयांनी दृष्टांन्त देऊन मी तुझ्या कुळात जन्म घेईल असा आशिर्वाद दिला होता. श्री टेंबे स्वामींचे आयुष्य म्हणजे केवळ दत्तात्रेयांच्या कृपेने विकसीत झालेले आणिसर्वांच्या आयुष्यात सुगंध पसरविणारे ब्रह्मकमळ. स्वामींनी पायी भारत भ्रमण करून दत्त संप्रदायाचा प्रसार केला. त्यांच्या कार्याला दत्त संप्रदायात तोड नाही. त्यांना सर्व विद्या अवगत होत्या. श्री टेंबे स्वामी हे उत्तम वैद्य, मंत्रसिध्द, यंत्र-तंत्रज्ञ, उत्कृष्ट ज्योतिषी, मराठी व संस्कृत आध्यात्मिक वाड:मयातील प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिध्दकवी, वक्ते, हठयोगी, उत्कट दत्तभक्त व साक्षात दत्तात्रयस्वरूप होते. एकच खंतवाट्ते की, त्यांना संसार सुख लाभले नाही. जन्मताच मुलाचा मृत्यु आणि त्यानंतर पत्नीचे देहावसान या गोष्टी ते टाळू शकत होते. पण प्रारब्ध भोग म्हणून त्यांनी त्यांचा स्वीकार केला. स्वामीजींना अनेक विद्या अवगत होत्या. अशा महान योगीराजाने गरुडेश्वर येथे १९१४ मधे समाधी घेतली. 

माणगाव हे क्षेत्र कोकणांत सिंधुदूर्ग जिल्हयात सावंतवाडी जवळ आहे. सावंतवाडी ते कुडाळ या बस मार्गावर माणगाव फाटा लागतो. तिथे उतरून बस मार्गाने ७ कि. मी. अंतरावर असलेल्या माणगावला जाता येते. सावंतवाडी साठी कोल्हापूरवरून नियमीत बससेवा आहे. या ठिकाणी निवासासाठी भक्तनिवास असून दुपारी १२ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे. 

श्री दत्तमंदीर, माणगांव
पो. माणगांव, व्हाया सावंतवाडी,
ता. कुडाळ, जि. सिंधूदुर्ग, महाराष्ट्र ४१६५१९.
फोन: ०२३६२-२३६०४५, २३६२४५
Email - shreedattamandirmangaon@gmail.com    

श्री दत्तक्षेत्र माणगांव येथिल दत्त मंदीरात प्रातःसमयी म्हटली जाणारी भूपाळी

हिंदू धर्मात देवाला झोपाविण्याच्या कल्पनेने केलेली आरती म्हणजे जशी शेजारती आहे, तशी देवाला पहाटे जागे करण्यासाठी भूपाळी गाण्याची महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा आहे. सहसा भुपाळ्या भूप रागात बांधलेल्या असतात. सगुण ऊपासनेत देवाला 
मनुष्यासारखेच सोपस्कार केले जातात झोपेतून ऊठवण्यासाठी देवाला ह्या भुप रागात आळवत प्रेमाने ऊठवतात त्याच सोबत स्वताच्या अंतःकरणात असलेल्या देवत्वालाही जाग्रूत करण्याचा ह्या भुपाळी मागे हेतू असतो ह्या सगुण ऊपासनेने आपल्यात सात्विक भावाचा प्रत्यय दिवसभर अनुभवयास येतो.

उठी उठी बा मुनिनंदना ही भुपाळी माणगांव येथिल दत्त मंदीरात प्रातःस्मरणी केली जाते. 

उठी उठी बा मुनिनंदना

उठी उठी बा मुनिनंदना । भक्त पातले दर्शना । 
त्यांची पुरवी तू कामना । पाही नयन उघडूनी ॥ध्रु.॥ 

उघडुनिया करुणादृष्टी । दासा धरी आपुले पोटी । 
नको येऊ देऊ हिंपुटी । घाली कंठी मिठी हर्षें ॥१॥ 

हर्षे तुझे पदी रंगले । दारागारा विसरले । 
निजदेहा न भुलले । विनटले निजभावे ॥२॥ 

निजभावे येता शरण । लपविसी का बा चरण ? 
जेणे तरती दुष्टाचरण । मग मरणभय कैचे ? ॥३॥ 

नको करु निष्ठुर मन । शीघ्र देई आश्वासन । 
तू अससी करुणाघन । तापशमन करि शीघ्र ॥४॥ 

उठी उठी बा सद्‌गुरुराया । उठी उठी करुणालया । 
उठी उठी वा चिन्मया । निजमाया आवरी ॥५॥