श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ

श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ 

कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन: ।
द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ: ॥

भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. १३२०मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राजु आणि सुमती या पुण्यदांपत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले. दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय. त्यानंतर कारंजा क्षेत्रात श्री नृसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेऊन अद्भुत असे चरित्र दाखविले.

श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राविषयी सरस्वती गंगाधर रचित "श्री गुरुचरित्र" या मराठी ग्रंथामध्ये फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ अवतार हा श्री दत्तप्रभूंचा प्रथम अवतार किंवा आद्य अवतार होय. श्रीपाद श्रीवल्लभ ख्रिस्त शके १३२०, कृष्ण-लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी यांचे तृतीय संतान म्हणून जन्मले. श्रीपाद श्रीवल्लभांना श्रीधर राज शर्मा व रामराज शर्मा हे दोघे भाऊ आणि श्रीविद्याधरी, राधा आणि सुरेखा या तीन बहिणी होत्या. ब्रह्मश्री मल्लादी बापन्नावधानुलु आणि अखंड लक्ष्मी सौभाग्यवती राजमांबा हे मातामह-मातामही होत.

श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट्ट या कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली, आणि नंतर त्याचा तेलुगु भाषेत अनुवाद केला. ही तेलुगु अनुवादाची मूळ प्रत उपलब्ध आहे. "हे चरित्र बापन्नाचार्युलुच्या ३३व्या पिढीत प्रकाशित होईल." असे ग्रंथात लिहिले आहे आणि सध्या ३३वी पिढी चालू आहे.

shripad shrivallabh original padukaa
श्रीपाद श्रीवल्लभ चारितामृत

श्रीपाद  चारित्र ग्रंथ पठण विशेष फलदायी

श्रीपाद प्रभुंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा मानस अत्यंत स्तुत्य आहे. हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलुगू भाषेत अनुवादित केला जाईल. अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठणाचे फल व मूळग्रंथाच्या पाठणाचे फल सारखेच आहे. श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही, कोठेही पठन केल्यास स्वत: श्रीपाद प्रभू तेथे सूक्ष्म रूपाने राहून ते श्रवण करतात. या संबंधीची एक कहाणी सांगतो. सावधान होऊन ऐक;

श्रीपाद सात वर्षाचे झाले. त्यांचा वेदोक्त विधिने उपनयन संस्कार झाला. त्या काळात संपन्न गृहस्थाच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे चोहिकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे. बापनार्युलुच्या आनंदाला तर सीमा नव्हती. त्यांनी आपल्या जाती बांधवाना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते. ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्त चरित्र ऐकण्यास आले होते. दत्तदासानी दत्तचरित्र सांगण्यास सुरवात केली. (ते म्हणाले) ''पूर्वयुगात अनसूया आणि अत्रिमहर्षी या परम पावन दांपत्याला एका पुत्ररत्नाची प्राप्ति झाली. त्याचेच नाव दत्तात्रेय असे ठेवले होते. तेच परंज्योती दत्तात्रेय सध्या या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने पीठीकापुरम मध्ये अवतरले. त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले. उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेज:पुंज दिसू लागले. अशा दीनजन उध्दारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ दे.''

हीच कथा ते सारखी सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते. असे त्रेपन्न (५३) वेळा कथन झाले. दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृत दृष्टी पडली. उपनयनानंतर श्रीपाद तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते लगेच मालदासरीच्या घरी जाणार आहेत. जाण्याचे कारण विचारले तेंव्हा श्रीपाद म्हणाले ''विशुध्द अंत:करण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे. त्याने एकदा सांगितलेला कथाभाग एक अध्याय असे समजल्यास त्रेप्पन्न अध्याय पूर्ण झाले आहेत. माझ्या चरित्रातील त्रेप्पन्न अध्याय श्रध्देने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले सद्य:फलीत लगेच त्याला द्यायचे आहे.'' श्रीपाद प्रभूंच्या भक्त वात्सल्याला जाती कुलाचा भेद नाही.

श्रीपाद प्रभूंना दत्तदासांकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही. तेंव्हा श्रीपाद क्रोधावेशाने म्हणाले ''तुम्ही कोणालाही पंचम म्हणून नीच जातीच्या लोकांना व्रूच्रतेने दाबून टाकीत आहात परंतु त्यांच्या वर माझा कृपा कटाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दींमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचे ब्राह्मणत्व, तुमचे अधिकार, त्यांची सेवकवृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील. माझे वचन म्हणजे काळया दगडावरील रेघ आहे त्यातील एकाही अक्षरात बदल होणार नाही. तुम्हा ब्राह्मणा मधील जे धर्मबध्द होऊन दत्तभक्ति करीत आपले जीवन व्यतित करतील त्यांची मी डोळयात तेल घालून रक्षा करीन.''

श्रीपादांच्या क्रोधावेशाला आई वडिलानी शांत करण्याचा प्रयत्न केला. थोडया वेळाने ते शांत झाले व त्यानी मौन धारण केले. नेमके त्याच वेळी दत्तदासांच्या घरी श्रीपाद वल्लभांनी त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिले. त्यानी प्रेमभराने समर्पण केलेली मधुर फळे स्विकारली. त्यांनी दिलेले दूध प्रेमाने घेतले. त्यांनी आपल्या दिव्य हस्तानी सर्वाना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्तदासांच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला त्यानी आशिर्वाद दिला. ''बाबा शंकरभट्टा पाहिलेस का श्रीपाद प्रभुचे प्रेम. ते भावनेनेच संतुष्ट होतात. त्याना कुल, गोत्रासी, भौतिकातील परिस्थितीशी संबंध नसतो. दत्तप्रसाद अंत्य कुलातील व्यक्तीने जरी आपणास दिला तरी त्याचा भक्तीभावाने स्विकार करावा. त्याच्या कडे दुर्लक्ष्य केले अथवा प्रसाद अस्विकार केल्यास आपण कष्ट नष्टांना बळी पडतो.''

श्रीपादांची भक्तांना  आश्वासने

१) माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो.
२) मनो वा काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळयात तेल घालून संभाळ करतो.
३) सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो
४)) मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते.
५) तुमचे अंत:करण शुध्द असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो.

श्रीपाद श्रीवल्लभ चारितामृत भाषांतर करणारे प.प. भाऊमहाराज निठुरकर
श्रीपाद श्रीवल्लभ चारितामृत भाषांतर करणारे प.प. भाऊमहाराज निठुरकर

प. पू. श्री हरिभाऊ जोशी निटुरकर हे महान दत्तसंप्रदायिक सत्पुरूष आहेत. त्यांना श्रीगुरूंची एका दिव्य अनुभवातून अनुज्ञा मिळाली व त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत मराठी भाषेत भाषांतरीत केले. भारतात अनेक दत्तसांप्रदायिक हे मराठी भाषिक आहेत. त्यांच्यावर फार मोठे उपकार त्यांनी केलेले आहेत. श्री भाऊमहाराज हे श्री दत्तमहाराज कविश्र्वरांचे कृपांकीत आहेत.

अत्यंत जीर्णावस्थेत असलेल्या मूळ ग्रंथाची व्यवस्थितपणे दुसरी प्रत तयार करून, मूळ "चरितामृतात" सांगितल्याप्रमाणे विजयवाड्याजवळ कृष्णा नदीत विसर्जन केले. नव्या प्रतिचे इ. स. २००१ साली विजयादशमीपासून अश्र्विन कृष्ण ११पर्यंत पिठापूर येथील "श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान" येथे श्रीपादांच्या सान्निध्यात पारायण करून संस्थानला अर्पण केली.

हा अक्षरसत्य ग्रंथ आहे. या ग्रंथातील प्रत्येक अक्षर शक्ति-युक्त आहे. या ग्रंथात अतिशयोक्ति किंवा अनावश्यक वर्णन कोठेच नाही. ग्रंथाचे लेखक शंकर भट हे विद्वान किंवा पंडित नव्हते. पण श्रीपादांवर त्यांची अत्यंत निष्ठा पाहून श्रीपादांनी त्यांच्यावर कृपा केली. या ग्रंथाचे पारायण करून ११ जणांना अन्नदान करावे म्हणजे फल तत्काल मिळेल.

परम पवित्र अशा भारतवर्षात भगवंताच्या अनेक अवतारांच्या राशी होऊन गेल्या, परंतु भगवान दत्तात्रेय मात्र भक्तांच्या रक्षणासाठी सदैव या भूतलावर वास्तव्य करत असतात. स्मरण करताच प्रत्यक्ष होऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात, म्हणून त्यांना स्मर्तृगामी म्हणतात. कृतयुगात अत्रि आणि अनसूया यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन अवतार घेतला व भूतलावर दत्त-भक्ति-रूपी कल्पवृक्ष संवर्धित केला. त्यांचा दुसरा अवतार पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पीठिकापूर (पिठापूर) येथे इ. स. १३२०मध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थी (गणेश चतुर्थी)च्या दिवशी कृष्ण-यजुर्वेद शाखा, आपस्तंब सूत्र, भारद्वाज गोत्रोद्भव ब्रह्मश्री घंडिघोटा अप्पलराज शर्मा तथा अखंड सौभाग्यलक्ष्मी महाराणी सुमती देवी यांचा पोटी झाला. त्यांच्या बाल-लीला या प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर व अद्भूत आहेत. पिठापुरम् येथे १६ वर्षे तर कुरवपुरात १४ वर्षे अशा अवघ्या ३० वर्षाच्या कालावधीत अद्भुत असे लीला चरित्र दाखवून स्व-भक्तांना-इह-परलोकातील शाश्र्वत सुख प्रदान केले. दुष्ट-सहारार्थ  व शिष्ट-रक्षणार्थ हा अवतार घेऊन अनेक अहंकारी लोकांचे गर्व-परिहण केले, भक्तांचे अनेक संकटातून रक्षण केले, आणि पिठापूर क्षेत्राचा महिमा अनंत पटीने वाढविला.

पिठापूर हे पूर्व कालापासूनच सिद्ध क्षेत्र आहे. गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला, तेव्हा त्याचे मस्तक गयेस होते तर पाय पिठापूर येथे होते म्हणून या क्षेत्रास "पादगया" असे म्हणतात. गयासुरास देवतांनी सांगितले होते की सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही. मध्यरात्रीच भगवान शंकराने कुक्कुटाचे रूप घेऊन बांग दिली. गयासुर सकाळ झाली समजून उठला. भगवंतानी त्याचा उद्धार केला ते कुक्कुटेश्वर देवस्थान पिठापूरात आहे.

श्रीपाद श्रीवल्लभ
श्रीपाद श्रीवल्लभ

दक्ष यज्ञात सती देवीने योगाग्नीने आत्मदहन केले. भगवान शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले. भगवान विष्णूने सुदर्शन चक्रानी त्यादेहाचे खंड खंड केले. ते भाग अन्य अन्य ठिकाणी पडले ते शक्तीपीठ झाले. प्रमुख अष्टादश शक्तीपिठातील पुरुहत्तिका हे शक्तीपीठ येथेच आहे.

संपूर्ण भारत देशात (१) काशी येथे बिंदु माधव, (२) प्रयाग वेणी-माधव, (३) रामेश्वर येथे सेतुमाधव, (४) त्रिवेत्रम येथे सुंदर-माधव आणि (५) पिठापूर येथे कुंती-माधव अशी माधवाची पाच मंदिरे आहेत. पांडव माता कुंतीने येथे माधवाची पूजा केली, ते हे स्थान. या स्थानास दक्षिण काशी असे पण म्हणतात.

या सर्वापेक्षा श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणस्पर्शाने या भूमीचा महिमा अपरंपार वाढला आहे, हे "श्रीपाद श्रीवल्लभ-चरित्रामृत" या ग्रंथाचे मूळ लेखक श्री. शंकर भट हे कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मण असून श्रीपाद श्रीवल्लभांच्या समकालीन होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने त्यांनी संस्कृतमध्ये हा ग्रंथ लिहिला आणि नंतर त्याचा तेलुगु अनुवाद झाला.

या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे कि यात अनेक घटना भविष्य काळात घडणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ:

(१)    हा ग्रंथ मल्लादि बापन्नावधानुलु (श्रीपादांचे मातामह) यांच्या ३३व्या पिढीत प्रकाशित होईल. आता सध्या श्री मल्लादि गोविंद दीक्षितुलु हे मल्लादि बापन्नावधानुलुचे ३३वे वंशज आहेत. त्यांनीच हा ग्रंथ संस्थानला दिला.
(२)    मी पुढचा अवतार कारंजा येथे नृसिंह सरस्वती या नावाने घेईन. माझे स्वरूप माझ्या मातामहासारखे असेल. तेथून मी गंधर्वपूर व पुढे कर्दळीवनात जाई. तेथे ३०० वर्षपर्यंत समाधीत राहीन व नंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुर (अक्कलकोट) येथे प्रकट होईन.
(३)    माझे ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा हे महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी होतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापन करून रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील.
(४)    माझे दुसरे बंधू श्रीराम शर्मा हे श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होईल.
(५)    श्री रामचंद्र प्रभूंनी हनुमंतास दिलेली माणिकाची माला "माणिक प्रभू" होतील. याशिवाय साईबाबा, गाडगे महाराज अशा अनेकांचा उल्लेख या ग्रंथात भविष्य रूपात आला आहे.

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाची पारायण पद्धती

प्रथम दिवस:      ०१ ते ०६ अध्याय
दुसरा दिवस:     ०७ ते १२ अध्याय
तिसरा दिवस:    १३ ते १८ अध्याय
चौथा दिवस:      १९ ते २२ अध्याय
पाचवा दिवस:    २३ ते ३४ अध्याय
सहावा दिवस:    ३५ ते ४२ अध्याय
सातवा दिवस:    ४३ ते ५३ अध्याय

श्रीपादश्रीवल्लभ चारितामृत
श्रीपादश्रीवल्लभ चारितामृत

श्रीपादश्रीवल्लभ चारितामृत ग्रंथाच्या पारायणाचे फळ

श्रीपादांचा गणेशचतुर्थीस अवतार झाला हे विशेश आहे.

"लाभ" हा गणेशाचा पुत्र एका युगात 'लाभाद महर्षी' या नावाने नावाजला होता. तोच श्रीकृष्ण अवतारात नंद या रूपात जन्मास आला. श्री वासवीमाता या भूमीवर भास्कराचार्य या नावाने अवतरल्या. "लाभ" श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारकालात त्यांचे आजोबांच्या स्वरूपात जन्मास आले होते. आपल्या तत्वा मध्ये विघ्नविनाशक तत्व स्थिर करून श्रीपादप्रभु अवतरले. ते अवतरले तेव्हा चित्रा नक्षत्र होते. त्या नक्षत्रापासून सत्ताविसावे नक्षत्र  हस्त असताना कुरवपुरात अदृश्य झाले.

जन्म पत्रिकेप्रमाणे २७ नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवं ग्रहापासून मिळणारे अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त 'मंडल' दीक्षा घेतात. एका 'मंडला' मध्ये श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते.

मन बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडीत असतात. त्याचे प्रकंपन वेगळ्या चाळीस दिशांमध्ये  प्रसरण पावतात. या चाळीस दिशामधून होणारे प्रकम्पन थांबून श्रीपाद प्रभुकडे वळवले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. तेथे ते अवश्यक बद्ल घडून स्पंदनात रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात. त्या नंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व ईच्छा पूर्ण  होतात.

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पिठीकापुरम क्षेत्री पोचण्याचे विधान – ग्रंथाचे वैशिष्टय

श्रीशंकर भट्ट यांनी लिहिलेला “श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत” हा ग्रंथ कांही दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांचे घरी होता. त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगु भाषेत अनुवाद करण्यात आला. तेलगु भाषेत अनुवाद झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला. गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला. त्याचे सिद्धयोग व्दारा पठण होत असते. शंकर भट्टाने रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून तो त्यांनी प्रभुना वाचून दाखविला.ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करुन धन्य झाले. श्री बापन्नाचार्युलू यांच्या तेहेतीसाव्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलगु भाषेतील प्रत उदयास येईल. ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करुन हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा. या ग्रंथाचे पारायण चालू असताना, पारायण करणाऱ्या भाग्यवान व्यक्तीना गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल. हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे.

|| श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो ||