श्री निरंजन रघुनाथ, मूळ नाव अवधूत

मूळ नाव: अवधूत
जन्म: कार्तिक शु.॥ ८, इ.स.१७८२, धारूर गाव कळंब दक्षिण हैद्राबाद
आई/वडिल: श्रीधरपंत श्रोत्री
कार्यकाळ: १७८२-१८५५
गुरु: रघुनाथ भटजी नाशिककर (अद्वैतेश्वर)
निर्वाण: १८५५

श्री निरंजन रघुनाथाना दत्तदर्शन व प्रसाद
श्री निरंजन रघुनाथाना श्री दत्तदर्शन व प्रसाद लाभ 

देवाच्या सख्यत्वासाठी । पडाव्या जिवलगाच्या तुटी ।
सर्व अर्पावे शेवटीं । प्राण तोही वेचावा ॥

या श्रीसमर्थ रामदासांच्या वचनाप्रमाणे श्रीदत्त दर्शना प्रीत्यर्थ घरादाराचा प्रत्यक्ष त्याग करून, दत्तदर्शनार्थ आपला प्राणही अर्पण करण्यास जे तयार झाले, ते हे सत्पुरुष म्हणजेच ‘नाशिकचे श्रीरघुनाथभटजी ऊर्फ अद्वैतेश्वर’ यांचे शिष्य निरंजनस्वामी होत. यांचे चरित्र अत्यंत मननीय आहे. परमेश्वरदर्शन म्हणजे सहज प्राप्त होणारी गोष्ट नाही. एक वेळ आत्मानात्मविवेक प्राप्त होऊन ब्रह्मज्ञानही होईल; परंतु सगुणदर्शन दुर्लभ आहे; ते सुलभ नाही. ते नुसत्या ज्ञानाने, दानाने, श्रुतीच्या अभ्यासाने वा यज्ञाने प्राप्त होणार नाही.

ज्याच्या अंतरात पराकोटीची भक्ती असेल, तीव्रतम तळमळ असेल, त्यासच सगुणदर्शनाचा लाभ होतो. सगुणदर्शन होण्यासाठी रात्रंदिवस सावधानता, अखंड साक्षेप, एवढेच नव्हे तर स्वत:चा प्राणही अर्पण करण्याची तयारी पाहिजे. ज्याप्रमाणे खरा वीर हातावर शीर घेऊनच लढण्यास जातो, त्याप्रमाणे खरा भक्त देहाची पर्वा न करता प्राणार्पण करण्यास सिद्ध होत असतो. तो मरण्यास भीत नाही. तो खरा मृत्युंजय असतो. 

घरादाराचा त्याग करून केवळ ईश्वरा प्रीत्यर्थ वनवास पत्करून जिवावर उदार होणारे समर्थ श्रीरामदासांसारखे किंवा श्रीतुकाराममहाराजांसारखे भगवद्भक्त क्वचित् असतात. ‘ऐसे भक्त बहुवस नाहीं.’ अशा भगवद्भक्तांपैकीच प्रस्तुतचे सत्पुरुष श्रीनिरंजनस्वामी होत. त्यांनी श्रीदत्तदर्शन होण्यासाठी कशी खडतर साधना केली हे पहा – 

निरंजनस्वामींचा जन्म कार्तिक शु ॥ ८ स. शके १७०४ साली दक्षिण हैद्राबादकडे ता. धारूर गाव कळंब येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीधरपंत असून आडनाव श्रोत्री होते. निरंजनस्वामींचे पूर्वाश्रमीचे नाव ‘अवधूत’ होते. नाशिकचे सुप्रसिद्ध सिद्धपुरुष श्रीरघुनाथभटजी (ऊर्फ अद्वैतेश्वर) हे त्यांचे सद्गुरू होत व त्यांनीच त्यांचे नाव ‘निरंजन’ असे ठेविले. 

नाशिक येथे ‘व्हिक्टोरिया’ पुलाजवळ गोदातटाच्या दक्षिणतीरावर श्रीरघुनाथभटजी यांची जिवंत समाधी आहे. याच समाधीवर ‘अद्वैतेश्वर’ नावाच्या सुंदर शिवलिंगाची स्थापना केलेली असून मंदिर छोटेसेच पण फार सुंदर बांधले आहे. श्रीअद्वैतेश्वर हे जागृत दैवत असून येथील काही सद्भक्तांस त्यांचा साक्षात्कार झालेला आहे. 

निरंजनांची लहानपणापासून वृत्ती भावनामय अशी होती. त्यांचे शिक्षण बेताचेच झाले होते. घरची गरीबी होती. त्यांनी काही दिवस खाजगी नोकरी केली व नंतर त्यांचे मन संसाराची नश्वरता पटून घरादाराविषयी विटले व साक्षात् श्रीदत्तंप्रभूंचे सगुणदर्शन केव्हा व कसे होईल हा एकच ध्यास त्यांना लागला. नंतर त्यांनी कळंब गावाहून कोणास न कळत प्रयाण केले; ते देहू गावी आले. तेथे आल्यावर त्यांच्या डोळ्यांपुढे श्रीतुकारामचरित्र उभे राहिले. श्रीतुकाराममहाराजांस सगुणदर्शन कसे झाले? तसेच आपणासही झाले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात आला. 

श्रीदत्तदर्शनोत्सुकता अधिकच वाढली व एके दिवशी म्हणजे भाद्रपद व॥ ४ शके १७३३ रोजी इंद्रायणीचे पाणी हातात घेऊन प्रतिज्ञा केली की, ‘आजपासून एक वर्ष सात दिवसांत श्रीदत्तांचे सगुणदर्शन न झाल्यास मी प्राणत्याग करीन.’ अशी घोर प्रतिज्ञा करून श्रीदत्तप्रभूंचे नामस्मरण करीत करीत त्यांनी देहू गाव सोडले. पुढे दरकूच दरमजल करीत ते नाशकास आले.

मिरज येथील निरंजन रघुनाथ पूजित दत्तमूर्ती
मिरज येथील निरंजन रघुनाथ पूजित दत्तमूर्ती

नाशिक येथे आल्यावर त्यांची व रघुनाथभटजींची गाठ झाली. ‘दर्शनें प्रशस्तीसी ठावो’ या श्रीज्ञानेश्वरांच्या वचनाप्रमाणे, श्रीरघुनाथभटजींस पाहताच निरंजनांच्या मनात प्रसन्नता उत्पन्न झाली. त्यांस अशी खात्री वाटली की, माझे आध्यात्मिक समाधान येथेच होईल. निरंजनांचे तीव्र मुमुक्षुत्व व विरक्ती पाहून श्रीरघुनाथ भटजींस परम संतोष वाटला व त्यांनी शके १७३३ कार्तिक व॥ ३० रात्री निरंजनास निर्गुण स्वरूपाचा साक्षात्कार करून दिला. तेव्हापासून निरंजनास कवित्वाची स्फूर्ती झाली व पाचसहा अभंग त्यांनी त्या वेळी करून सद्गुरुचरणी अर्पण केले.

श्रीरघुनाथभटजींच्या कृपादृष्टीने व संगतीने आत्मस्वरूपज्ञानविषयीचा यत्किंचितही संशय निरंजनांच्या चित्तात उरला नव्हता. परंतु श्रीदत्ताच्या सगुणदर्शनाची जी तीव्र इच्छा ती मात्र पुरी झाली नव्हती; म्हणून त्यांनी श्रीरघुनाथभटजींस विचारले की, ‘महाराज ! मला श्रीदत्तांचे सगुणदर्शन कधी व कसे होईल ? मी तर अशी प्रतिज्ञा केली आहे की, अमुक मुदतीत दर्शन न झाल्यास प्राणत्याग करीन. माझी प्रतिज्ञापूर्ती होणार ना?’ तेव्हा महाराजांनी निरंजनास गिरनार पर्वतावर जाण्यास आज्ञा केली व तेथे दर्शन होईल असे सांगितले. तसेच श्रीदत्तात्रेयांच्या षट्भुज सुंदर मूर्तीचे ध्यान रात्रंदिवस करण्यास सांगितले.

अंतरीं चिंतोनिया ध्यान । मुखीं कीजें नामस्मरण ।
विषयभोगावेगळें मन । व्रतस्थपणें ठेवावें ॥

गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून व त्यांचा उपदेश चित्तात ठेवून, निरंजनस्वामी प्रथम त्र्यंबकेश्वरी आले. तेथे देवाचे दर्शन घेऊन काही दिवस तेथे राहून ते कोकणात उतरले. रानावनातून काट्याकुट्यातून मार्ग काढीत श्रीदत्तांवर पूर्ण श्रद्धा ठेवून सर्व प्रकारचे कष्ट सोशीत गुजराथेतील धर्मपुर नावाच्या गावी येऊन पोहोचले. तेथून मग ते सुरतेस गेले. तेथून ते भीमनाथाच्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन गिरनारपर्वताजवळ येऊन पोहोचले.

केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यास बराच अवकाश आहे असे जाणून त्यांनी त्या गिरनारपर्वतास प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. प्रतिज्ञापूर्तीस तीन दिवसांचा अवधी ठेवून ते गिरनारपर्वत चढावयास लागले. ‘दिगंबरा ! ये रे दयाळा ! मला भेट दे रे दत्ता ॥’ हे भजन म्हणत पर्वत चढू लागले. श्रीदत्तदर्शन अजून झाले नाही म्हणून त्यांना फार वाईट वाटावे; काही वेळ स्तब्ध उभे राहून ‘श्रीदत्त ! श्रीदत्त !’ या नामाने मोठ्याने धावा करून रडावे ! हे तीन दिवस म्हणजे तीन युगांप्रमाणे त्यांस वाटले.

शके १७३४ च्या भाद्रपद व॥ ८ स निरंजनस्वामी श्रीदत्त देवाच्या पादुकांप्रत जाऊन पोहोचले. पादुकांस सप्रेम साष्टांग नमस्कार करून निरंजनाने प्रेमाश्रूंचे त्यास स्नान घातले व ते म्हणाले, ‘दत्ता ! प्रतिज्ञापूर्तीस आता फक्त तीनच रात्री राहिल्या ! महाराज, ठरलेल्या मुदतीत जर आपले दर्शन झाले नाही तर हा दास या पादुकांच्या पुढे मस्तक आपटून प्राण देणार ! तरी दयाळा ! कृपा करून दर्शन द्यावे !’ अशी श्रीदत्तप्रभूंची करुणा भाकून त्या पादुकांसमोर धरणे धरून ते बसले.

भगवद्दर्शनार्थ धरणे धरून बसणे ही सामान्य गोष्ट नाही. ज्ञानेश्वर महाराज लिहितात की, ‘धरणें धरूनि बैसे, ऐसा कैं जोडे?’ श्रीतुकाराममहाराजांनी धरणे धरले म्हणून त्यांस पांडुरंगाचे दर्शन झाले व बुडविलेल्या सर्व वह्या त्यांस परत मिळाल्या. धरणे धरून बसण्यास मनाची फार तयारी लागते. पराकाष्ठेची उत्कंठा व तीव्र तळमळ असेल तरच या गोष्टी घडून येतात. दर्शनाची तीव्रतम तळमळ हीच खरी महत्त्वाची साधना आहे.

निरंजनस्वामींनी याप्रमाणे धरणे घेतल्यावर पहिल्या रात्री सोसाट्याचा वारा सुटून मुसळधार पाऊस पडू लागला. त्यामुळे स्वामींची दातखीळ बसली व त्यांस मूर्च्छा आली. मूर्च्छेत एक सुवासिनी आली व तिने त्यांना एक मूठभर खिचडी दिली. जागे होऊन पाहतात तो तेथे कोणी नाही. पुन्हा त्यांनी दत्तनामस्मरण सुरू केले. दुसऱ्या रात्री त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नात एक पिवळे वस्त्र व एक रूमाल मिळाला. जागे होऊन पाहतात तो स्वप्नात मिळालेली वस्त्रे आपणांपाशी खरोखरीच असल्याचे दिसले. दोन दिवस झाले, अजून दर्शन नाही; म्हणून स्वामी फारच खिन्न झाले. पुन्हा सप्रेम दत्तभजन सुरू केले. नंतर तिसऱ्या रात्री स्वप्नात एक ब्राह्मण आला. त्याने स्वामींस एक खडावांचा जोड दिला व येथून जा असे सांगितले. जागे होऊन पाहतात तो खडावांचा जोड दिसला. पण दर्शन नाही. तिन्ही रात्री निघून गेल्या; प्रतिज्ञेची मुदत संपली असे पाहताच निरंजन स्वामी हताश झाले.

जवळच एक मोठा दगड पडला होता, तो जवळ घेतला व त्या दगडावर, श्रीदत्तपादुकांसमोर नारळासारखे ताडकन् आपले कपाळ आपटले. पहिला प्रयत्न चांगला साधला नाही. म्हणून दुसऱ्यांदा पुन्हा जोराने मस्तक आपटले. त्याबरोबर मस्तक छिन्नविछिन्न झाले व स्वामी तेथेच बेशुद्ध होऊन पडले. ते बेशुद्ध अवस्थेत असतानाच, आपल्या तोंडात कोणीतरी कमंडलूने पाणी घालीत आहे, असा त्यांस भास झाला आणि ते सावध होऊन पाहतात तो आपणापुढे साक्षात् श्रीदत्तमहाराज सगुणरूपाने उभे आहेत असे दिसून आले. श्रीदत्तगुरूंनी स्वामींच्या मस्तकावरून आपल्या अमृतकराचा स्पर्श करता फुटलेले मस्तक जोडले गेले. निरंजनाकडे श्रीदत्तांनी कृपादृष्टीने अवलोकन केले व सांगितले की, ‘नाशिकचे रघुनाथभटजी व मी दोन नाही; त्यांनी जो बोध केला त्याचे मनन कर.’ याप्रमाणे बोलून श्रीदत्त अंतर्धान पावले.

झाले ! श्रीनिरंजनस्वामींच्या खडतर साधनेचे सार्थक झाले ! त्यांच्या चित्तास अवर्णनीय असे परम समाधान झाले. प्रतिज्ञेप्रमाणे श्रीदत्तगुरूंचा सगुणसाक्षात्कार झाला. ‘याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा !’ या श्रीतुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे, निरंजनस्वामींस हा जो सगुणसाक्षात्कार झाला, त्याची प्रत्यक्ष खूण म्हणून स्वामींच्या कपाळावर भुवयांपासून केसापर्यंत एक व्रण अखेरपर्यंत राहिला होता. 

निरंजनस्वामींनी स्वत:च ‘आत्म-प्रचीति’ व ‘साक्षात्कार’ अशी दोन प्रकरणे ओवीबद्ध, रसाळ व उद्बोधक अशी लिहिली आहेत. त्यावरूनच वरील चरित्रकथा लिहिली आहे. त्यांची काही पदे येथे दिली आहेत. 

(१)   दिगंबरा स्वामि अगा दयाघना ।
        येऊ दे करुणा अनाथाची ॥१॥
        मायामोहजाल टाकावे छेदून ।
        करावें धावणें दीनबंधू ॥२॥ 
        अनाथासि आम्हां तुजवीण आतां ।
        कोण आहे त्राता सर्वांपरी ॥३॥
        निरंजन म्हणे देई आतां भेटी ।
        नको करूं कष्टी देवराया ॥४॥

(२)  येई येई दत्तात्रया ।
        माझ्या कीर्तनाच्या ठाया ॥१॥
        रंगदेवता आमुची ।
        तूंची सर्वांपरी साची ॥२॥
        गावे तुझे कीर्तिगुण ।
        ऐसें इच्छी माझें मन ॥३॥
        निरंजन म्हणे देवा ।
        घेई आतां माझी सेवा ॥४॥

(३)  दत्तात्रया चतुराक्षरि मंत्र वाचें उच्चारा ।
        निशिदिनिं ह्र्दयी ध्यातां चुकवी जन्ममरणफेरा ॥धृ.॥
        दशादिशांप्रति अगमन ज्याचे एकट निर्द्वंद्व ।
        दश-अवतारा वरुते विष्णुस्वरूपाचा कंद ।
        दत्तचित्त ज्या ह्र्दयीं ध्याता करि ब्रह्मानंद ॥१॥
        तापसियांचा तापशमन जो सर्वांचा त्राता ।
        तरितसे भवसागरिं जडमूढ नाम वदनिं गातां ।
        तांतडिनें उडि घालित ज्यापरि बाळकासि माता ॥२॥
        त्रै देवांचें स्वरूप तें हे जाणें एकत्र ।
        त्रैलोक्याचा चालक म्हणवी अत्रीचा पुत्र ।
        त्रैअवस्था स्वरूप प्रगटवी जेवि का भिन्न ॥३॥
        एकचि स्वरूप सर्वान्तरिं तो आहे अद्वय । 
        यशकीर्ति तुम्ही गा रे त्याची होउनि तन्मय ।
        यमाचे भय नाहीं निरंजन जाला निर्भय ॥४॥

दत्तभक्त श्री निरंजन रघुनाथ स्वामी

आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता निद्रा करा अवधूता ||
चिन्मय सुखधामा चिन्मय सुखधामा जाउनी पहुडा एकांता ||
वैराग्याचा कुंचा घेऊनि चौक झाडीला स्वामी  चौक झाडीला ||
तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला  ||
पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती सुंदर नवविधा भक्ती ||
ज्ञानाच्या समया ज्ञानाच्या समया लावूनी उजळल्या ज्योती ||
भावार्थाचा मंचक हृदयकाशी टांगीला हृदयकाशी टांगीला ||
मनाची सुमने मनाची सुमने करुनि केले शेजेला ||
व्दैताचे कपात लावूनी एकत्र केले लावूनी एकत्र केले ||
दुर्बुद्धीच्या गाठी सोडून पडदे सोडियलें ||
अशा तृष्णा कल्पनेचा सांडून गलबला गुरुहा  सांडून गलबला ||
निरंजनी सद्गुरू स्वामी निजे शेजेला ||

ही श्री दत्त गुरूंची शेजारती दत्तसंप्रदायातील अनेक मंदिरात व मठात अत्यन्त श्रद्धेने म्हणली जाते. ही शेजारती श्री निरंजन रघुनाथ ह्यांनी लिहिली आहे.
श्री निरंजन स्वामींचे जन्मस्थान कळंब हे गाव परळी वैजनाथच्या जवळ आहे. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीधरपंत श्रोत्री असून ते गावाचे कुलकर्णी होते. निरंजनस्वामींचे पूर्वाश्रमीचे नाव अवधूत होते व त्यांचे गुरु श्री नाशिकचे श्री रघुनाथ भटजी ह्यांनीच त्यांचे नाव निरंजन असे ठेविले. नाशिक येथे गोदावरीच्या दक्षिण तीरावर श्री रघुनाथ भटजी ह्यांची संजीवन समाधी आहे. ह्याच समाधीवर अव्दैतेश्वर शिवलिंगाची स्थापना केली आहे. मंदिर छोटेसेच पण फार जागृत आहे. निरंजनस्वामींची बुद्धी अत्यंत तीव्र व भावनाशील होती. त्यांचे शिक्षण किती झाले होते त्याचा उल्लेख नाही पण वेदांताचा त्यांचा अभयास असावा असे त्यांच्या लिखाणावरून वाटते. त्यांच्या  घरची परिस्थती अत्यंत गरिबीची होती व वडिलांचे छात्र लहानपणीच हरवले. ह्यचे वर्णन त्यानी आपल्या स्वात्म प्रचिती ह्या प्रकरणात केले आहे. त्यांनी पुणे येथे थोडे दिवस नोकरी केली. बेलबाग मंदिर पुणे येथे शके १३३३ मध्ये ठाकूरदास ह्यांचे कीर्तन ऐकत असताना त्यांच्या मनात एकदम विरक्ती उत्पन्न झाली व ते पुणे येथून देहू येथे आले. तेथे संत तुकारामांना साक्षी ठेवून व हातात इंद्रायणीचे पाणी घेऊन त्यांनी संकल्प केला की आज पासून एक वर्ष सात दिवसात श्री दत्त गुरूंचा सगुण साक्षत्कार  नाही झाला तर प्राणत्याग करिन. येथून मग ते नासिक येथे आले व त्यांची गाठ श्री रघुनाथ महाराजांशी पडली व त्यांना शके १७३३ कार्तिक मास रात्री रघुनाथ महाराजांनी आत्म्याचा अपरोक्ष साक्षत्कार करून दिला. तेथेच त्याना कवित्वाची स्फूर्ती झाली व पहिले पाच अभंग करून त्यांनी सद्गुरूंना अर्पण केले.

अध्यात्मिक दृष्ट्या स्वामी कृतकृत झाले तरी दत्त दर्शनाची ओढ व प्रतिज्ञा त्यांना स्वस्थ बसून देईना. तेंव्हा आपल्या सद्गुरूंची आज्ञा घेऊन ते निघाले. नासिक येथून ते कोकणात गेले तेथून ते सुरतला गेले व गिरनार येथे गेले. प्रतिज्ञा पुरतीस अद्यापि अवकाश असल्याने त्यांनी गिरनार पर्वतास प्रदक्षिणा घालण्यास सुरवात केली व ३ दिवस राहिले असताना ‘दिगंबरा येरे दयाळा मला भेट दे रे दत्ता’हे भजन म्हणत त्यांनी गिरनार चढण्यास सुरवात केली. ते गिरनार पर्वत चढून गेले. शके १७३४ च्या भाद्रपद वद्य अष्टमीस त्यांनी दत्त पादुकांपुढे धरणे धरले व तीनच दिवस राहिले तर दर्शन न झाल्यास प्राण त्यागाचा निश्चय केला.

निरंजन रघुनाथ यांचे हस्ताक्षर
श्री निरंजन रघुनाथ यांचे हस्ताक्षर 

ह्या प्रमाणे धरणे धरून बसल्यावर पहिल्या रात्री सोसाट्याचा वारा सुटला व पाऊस आला. त्यामुळे त्यांची दातखीळच बसली व मूर्च्छा अIली .तेवढयात एक सुवासिनी अIली व तिने ह्यांना खिचडी दिली. जागे होऊन पाहतात तो तेथे कोणीच नाही. दुसऱ्या दिवशी स्वप्नात एक वस्त्र व रुमाल मिळाला व जागे होऊन पाहतात तो वस्त्रे खरंच होती. तिसऱ्या दिवशी स्वप्नात एक ब्राह्मण आला व एक खडावांचा जोड देऊन गेला. तरी दत्त दर्शन झाले नाही. प्रतिज्ञेची मुदत संपली असे पाहताच स्वामी हताश झाले व जवळच एक दगड पडला होता त्यावर त्यांनी आपले डोके आपटले. दुसऱयांदा डोके आपटल्यावर ते छिन्न विच्छिन्न  झाले व निरंजन स्वामी बेशुद्ध झाले. ते बेशुद्ध पडले असता कोणीतरी कमंडलूतून तोंडात पाणी घातले. ते शुद्धीवर येऊन बघतात तो साक्षात दत्त महाराज सगुण रूपाने समोर उभे आहेत असे दिसले. त्याबरोबर सर्व जखमा बऱ्या झाला व दत्त महाराजनी सांगितले की तुझे सद्गुरू व मी दोन नाही व सद्गुरू सांगतात तेच कर.

गिरनारहून निरंजन स्वामी जहाजाने नाशिकला आले व तेथे गुरुं जवळ राहून स्वात्मप्रचिती व साक्षात्कार हे दोन काव्ये लिहून गुरूस अर्पण केली. तेथून ते जुन्नरला आले व तेथे त्यांचा ग्रंथ संग्रह जळाला. त्याची राख घेऊन ते सप्तशृंग गडावर ५ दिवस उपोषित बसले.

वदलो कविता I पद आणि ग्रंथ करुनिया I आज्ञेवरूनी I
जाळली कविता I रक्षा आली हाता मुष्टीभरूनि I जाळे विघ्न I
तेचि रक्षा  I आता बंधूनी पदरी  I सप्तशृंगावरी आलो स्वामी  I
निरंजन म्हणे I धावुनिया यावे ग्रंथ उठवावे  I जाळले ते  I
पाचव्या रात्री  श्री दत्तात्रेयांनी त्यांचा ग्रंथसंग्रह पूर्ववत करून दिला ह्याचे वर्णन श्री स्वामींनी आपल्या अभंगात केले आहे
ऐसे पाच दिन सरोनिया गेले  I रात्री स्वप्नी आले दत्तात्रेय  I
म्हणती निरंजना खेद ना करी I मना ग्रंथ अवलोकना उठ वेगीं I
जागे होवोनिया रक्षेसी पहिले I तव ते ग्रंथ झाले पाहिल्यावानी  I
निरंजन म्हणे धन्य आजी झालो I आनंद पावलो गुरुकृपे I

नंतर निरंजन स्वामी वळवडे कोल्हापूर येथे राहिले व तेथून ते मिरजेला आले आपले बहुतेक सारे ग्रंथ त्यांनी मिरज येथेच लिहिले. मिरजेला आल्यावर त्यांचा शिष्य संप्रदाय खूप वाढला. अशा रीतीने प्रपंच  व परमार्थ यथोचित  साधून श्री निरंजन रघुनाथ स्वामींनी शके १७७७ च्या प्रारंभी त्यांनी सन्यास घेतला व त्याच साली श्री कृष्णा नदीत जल समाधी घेऊन आपले अवतार कार्य संपविले.  निरंजन स्वामींच्या पश्चात त्यांच्या पत्नी बरीच वर्षे हयात होत्या.

निरंजन स्वामींची ग्रंथ संपदा गद्य व पद्य अशा दोन्ही स्वरूपात आहे, परंतु टी सारीच उपलब्ध आहे असे नाही व ती खालील प्रमाणे आहे.

१ ज्ञानेश्वरी वरील टीका गद्य
२ अमृतानुभवरील टीका गद्य
३ स्फुट पदे साक्षात्कार व आत्मप्रचिती पद्य
४ मांडूक्योपनिषद टीका गद्य
५ केनोपनिषद टीका गद्य
१ अनुभवामृत पद बोधिनी-  ही श्री ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभव वरील गद्य टीका आहे. श्री निरंजन स्वामींनी आळंदी जाऊन श्री ज्ञानेश्वरांची अमृतानुभव कळवा म्हणून प्रार्थना केली व ही टीका म्हणजे त्यांना स्वप्नात झालेला प्रसाद आहे.
२ स्वात्म प्रचिती-  हे एक पाच अध्यायांचे छोटे प्रकरण असून त्यात स्वामींनी पुणे सोडल्या पासून नाशिक येथे सद्गुरूंचा अनुग्रह मिळेपर्यंत  मजकूर सुबोध व रसाळ भाषेत लिहिला आहे.
३ साक्षात्कार-  ह्यात नासिक सोडल्यापासून गिरनार येथे  जाऊन श्री दत्त महाराजांचा अनुग्रह  होण्यापर्यंत वर्णन केले आहे. ह्यात स्वामींनी आपले त्रोटक चरित्र व तत्कालीन सामाजिक स्थितीचे वर्णन केले आहे.
४ श्री रघुनाथ भटजी चरित्र- ह्यात स्वामींनी आपले सद्गुरू ह्यांचे चरित्र ३९६ ओवीत लिहिले आहे.
५ केशव चैतन्य कथातरु- ह्यात श्री तुकारामांचे गुरु केशव चैतन्य ह्यांचे चरित्र वर्णिले आहे ह्यात श्री तुकाराम व गुरु ह्यांचे वर्णन सुरेख केले आहे.

आपणासी घडावे आचार्यसेवन I यास्तव गुरु करावा कोण  I
हे पुसावे देवालागून I म्हणुनी गेला पंढरीसी  I
करुनि साष्टांग नमस्कार I उभा राहिला जोडून कर  I
विनंती करी वारंवार I श्री विठ्ठमुर्तीसी  I
देवा  तूंचि माझी माता  I आणि तूंचि माझा पिता  I
तू माझा बंधू चुलत I आप्त सोईरा तू सर्व  I
देवा तू परम गुरु I करावा माझा अंगिकारू I
मज उपदेश करुनि परीकरु I जन्म मरण चुकवावे  I
मग बोले  रुक्मिणीकांत  I माझेच स्वरूप असे ओतूरात  I
तेथे केशव चैतन्य साक्षात  I यपदेश करतील तुजलागीं  I

६ पतिव्रता आख्यान- ह्यात सतीधर्माचे आख्यान केले आहे

ह्या शिवाय अनेक आरत्या शेजारत्या व अष्टके पण श्री स्वामींनी केली आहेत. आपल्या सद्गुरूंवर अभंग-

रघुनाथ माझा सद्गुरू सोयरा I  नाही पारावरा त्याचे गुणा I
बहुत जनांसी तारक तो झाला I  धर्म प्रगटला कालिमाजी  I
एका व्दिजालागी कIशी क्षेत्रामाजी  I दर्शन जी त्याने तेथे दिले  I
निरंजन म्हणे  व्दारके  माझारी  I दर्शन व्दिवारी मज झाले I

ह्याशिवाय त्यांची आणखीन पण ग्रंथसंपदा आहे. पण ती उपलब्ध आहे ह्या विषयी माहिती नाही. सांगलीचे श्री कोल्हटकर ह्यांनी १९३५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ ह्यात वरील सर्व माहिती सविस्तर दिली आहे.