श्रीमद् रामचंद्र योगी

जन्म: ज्ञात नाही (इ. स. १०३४ चे दरम्यान वाडीत)
मार्गदर्शक: श्री नृसिंहसरस्वती 
संप्रदाय: दत्त संप्रदाय 
समाधी: ज्येष्ठ वाद्य चतुर्दशी 
विशेष: १०३४ पासून श्री नृसिंहसरस्वती १३४४ मध्ये येइपर्यंत वाडीतच तपाचरणी   

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या सुवर्णाक्षरमंडित वैभवशाली पारमार्थिक इतिहासाचे आद्य जनक म्हणून श्रीमद् रामचंद्र योगी हे चिरपरिचित आहेत. योगाभ्यासात अत्यंत निष्णात व आपण स्वतः पावन होऊ, अशा भावनेने कित्येक वर्षे सतत ध्यानस्थ बसून स्वतःचे जीवन 'स्वामींचे सहवासाने' सार्थक मानणारे श्री रामचंद्र योगी यावचंद्रदिवाकरो श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे वास्तव्य करून रहातात. त्यांची जिवंत समाधी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आहे. त्याची पूजा अर्चा पुजारी मंडळी नित्य करतात. परिवार देवतेमध्ये किंवा सनकादिक म्हणून पूजेत त्यांना अग्रस्थान आहे. त्यांची पूजा प्रथम होते. शंकराची पिंडी व शाळुंका स्वरूपात या ठिकाणी त्यांचे स्मारक आहे.

इ.स.१०३४ मध्ये या सतपुरुषांचे कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर वास्तव्य सुरु झाले. दैवी गुणाने संपन्न असणाऱ्या योगी महाराजांना तपश्चर्येच्या योगाने त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. हे स्थान भगवान दत्तात्रेयांचे निरंतर वास्तव्याने पुनित होणार अशी त्यांची खात्री होती. त्यानंतर शके १३४४ च्या सुमारास श्रीमन् नृसिंहसरस्वतींनी घनदाट अशा अरण्यात थंडी, ऊन व पाऊस इत्यादि सहन करीत पंचाग्निपूर्वक कठोर तपश्चर्या करणाऱ्या श्री रामचंद्र योगी ह्या आपल्या लाडक्या शिष्योत्तमाच्या विशुध्द मनातील हेतू पूर्ण करण्यासाठी या क्षेत्री आगमन केले. त्यानंतर योगी महाराजांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. दोन्ही सत्पुरुषांची भेट झाली. त्यांच्या चरणकमलांवर मस्तक ठेवून प्रेमाश्रूंचा अभिषेक केला. त्यांच्या स्पर्शाने समाधी अवस्थेपर्यंत पोहचलेले रामचंद्र योगी ब्रह्मानंदातून बाहेर आल्यानंतर प्राणप्रिय सद्गुरुंना आपल्या तप:स्थानाजवळ अतिशय आदराने नेल्यानंतर, "तुमच्या आशीर्वादाने मला ‘ध्रृवपद’ प्राप्त झाले आहे. आता मला भय नाही’ असे म्हणून रामचंद्रयोगींनी नमस्कार केला. त्यांचा नमस्कार स्वीकारून नृसिंहप्रभू औदुंबराच्या तळी जाऊन राहिले.

श्रीरामचंद्र योगी यांची समाधी
श्रीरामचंद्र योगी यांची समाधी

श्री नृसिंहवाडीतील सत्पुरूष श्रीरामचंद्र योगी 

श्रीनृसिंहवाडी ही श्रीनृसिंह सरस्वती स्वामींची तपोभुमी असल्याने ईथे अनेक सत्पुरूष व महान साधक होऊन गेले .त्यापैकीच एक श्री श्रीरामचंद्र योगी हे मोठे तपस्वी होते. त्यांना दृष्टांत झाला की श्रीनृसिंह सरस्वती महाराज संगम क्षेत्री येणार म्हणून ते याक्षेत्री येऊन त्यांची वाट पाहात होते. श्री गुरू तिथे आल्यावर त्यांनी श्रीरामचंद्र योगी यांच्यावर अनुग्रह केले. ते श्रीगुरूंची सेवा करीत राहीले. काहीकालानंतर त्यांनी श्रीगुरुच्या हस्ते जिवंत समाधी घेतली. त्यावेळी श्रीगुरू म्हणाले की कोणी तुमची सेवा केल्यास ती सेवा मला पोहचेल. म्हणून समस्त भक्त यांच्या समाधीला प्रत्यक्ष श्रीगुरूदेव दत्त समजून प्रदक्षिणा घालतात. श्रीरामचंद्र योगी यांची समाधी दत्तमहाराजांचे दर्शन घेतल्यावर पायऱ्या चढून वर आल्यावर श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या स्मृति देवालयामागे पिपंळाच्या कट्यावरील मारुतीच्या मंदीरामागे आहे. श्रीरामचंद्र योगी महाराजांच्या पूजेला अग्रस्थान दिले जाते.

काही कालानंतर पावनतम अमृत हस्ते त्रिभुवनी दुर्लभ अशा संजीवन समाधी योग रामचंद्र योगींच्या सारख्या परमभाग्यशाली तपोनिधीच्या नशिबी ब्रह्मदेवानेच लिहिला होता. जेष्ठ वद्य चतुर्दशीच्या भाग्यदिनी महाराजांना ‘संजीवन समाधी’ दिली. याच दिवशी नृसिंहप्रभूंनी रामचंद्र योगींना वर दिला की, "तुमची कोणी भक्त सेवा करतील ती मला प्राप्त होईल.” 

श्रीमद् रामचंद्र योगींच्या अत्युत्कट प्रेमाचे प्रतिक असलेल्या ह्या भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्याविषयीच्या अधिकारामुळेच आजतागायत अनेक आर्त, जिज्ञासू भक्तांचे मनोरथ पूर्ण झाले आहे. ही संजीवन समाधी श्री दत्तगुरुंच्या मंदिराच्या पश्चिमेला एका तत्कालीन अश्वत्थाच्या झाडाखाली आहे. त्या स्थानावर शिवलिंगाच्या स्वरूपात त्यांची समाधी दिसते. त्यांच्या समाधीची पूजा-अर्चा नित्य नियमाने येथील पुजारी करतात. 

उन्हाळ्यामध्ये समाधीला ‘दहीभाताची पूजा’ बांधून भक्तजन शांती, समृद्धी व कृपा प्राप्तीसाठी प्रार्थना करतात व भक्तांना त्यांच्या सहृदय अंत:करणाचा प्रत्यय आजही येतो.

भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याविषयीच्या व्यवस्था अन्य कोणत्याही क्षेत्री अस्तित्वात नाही. म्हणूनच दत्ताच्या राजधानीचे व योगी महाराजांचे दिव्य तपोबल हे ह्या क्षेत्राच्या सर्व श्रेष्ठतेचे व अद्वियतेचे मर्म आहे म्हणून तपोनिधींच्या मालिकेत ‘श्रीमद् रामचंद्र योगींचे स्थान’ अग्रमानांकीत आहे.