गुरु ताई सुगंधेश्र्वर

जन्म: राजस्थान १९४२
कार्यकाळ: १९४२-
गुरु: श्री गुळवणी महाराज
लग्न: लग्नानंतर सौ. कल्पनाबाई त्रिवेदी
विशेष: माडी चढताना उतरताना गुलाबाचा सुगंध येत असे म्हणुन सुगंधेश्वर नाव पडले. 

गुळवणी महाराज यांच्या परंपरेत गुरुताई सुगंधेश्र्वर यांचे नाव महत्त्वाचे मानावे लागेल. सुगंधेश्र्वर यांचे नाव सौ. कल्पनाताई यशवंत त्रिवेदी असे आहे. या राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील इंटाळी खेडा या गावच्या होत. यांनी गुळवणी महाराज यांच्या उपदेशानुसार राजस्थानात दत्तभक्तीचा मोठा प्रसार केला. यांचा जन्म सन १९४२ साली राजस्थानात झाला. लहानपणापासून यांना आध्यात्मिक व धार्मिक विषयांची आवड होती. वयात आल्यानंतर कल्पनाताई सुगंधेश्र्वर या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. माडी चढताना व उतरताना त्यांच्या अंगातून गुलाबाच्या फुलांचा सुगंध येत असे. म्हणून यांचे नाव सुगंधेश्र्वर असे पडले.

या प्रथमपासून शिवाच्या उपासक होत्या. ‘ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप त्या करीत असत. काही दिवसांनी यांचा विवाह झाला आणि त्या सौ. कल्पनाताई त्रिवेदी झाल्या. शिवमंदिरात यांना दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला. पुढे पतीबरोबर यांना यवतमाळ येथे रहावे लागले. नंतर या गिरगावात मुगभाट मोहल्लामध्ये राहू लागल्या. यांनी अनेक चमत्कार केले असले तरी त्यांची दैवी शक्ती सर्वांना आकर्षित करून घेई. गुरुपौर्णिमा, महाशिवरात्र, दत्तजयंती या उत्सवात त्यांचा मोठा सहभाग असे. यांना भक्तिमार्गाची गोडी सहज निर्माण झाली. गुळवणी महाराजांच्या उपदेशानंतर यांनी राजस्थानात दत्तभक्तीचा प्रसार केला. सुरत, अहमदाबाद, नागपूर, पुणे, चिंचवड, राजगुरुनगर, संगमनेर इत्यादी ठिकाणी यांचे अनेक भक्त आहेत.

गुरुताई सुगंधेश्र्वर यांनी दत्तभक्तीचा प्रसार करण्यासाठी इंटाली खेडा नावाच्या आपल्या गावी एक दत्तमंदिर तयार केले. येथे एक भव्य शिवपुरी नावाचे स्थान निर्माण झाले आहे. गुळवणी महाराजांची प्रेरणा असल्याकारणाने यांचे प्रचारकार्य महत्त्वाचे मानावे लागेल.

गुरुपरंपरा 

श्री वासुदेवानंदसरस्वती 
    ।
श्री गुळवणी महाराज 
    ।
गुरुताई सुगंधेश्वर